अध्यात्म विराम १९६
विधात्याने आत्मारूप तबकडी मधे स्थापित केलेली शुद्ध सत्वयुक्त आत्मज्योत, कालांतराने अशुद्ध होत जाते. त्याला ही अशुद्धी चुकीच्या कर्माने, विचाराने, चिंतनाने, बुद्धीने क्षण क्षण येत जाते. अर्थात चांगल्या कर्माने, धर्माने, शुद्ध पुण्य कर्माने, आचरणाने त्यावरील काजळी थोडीफार दूर होते, तात्पुरती. पण आपली कर्म नित्य सुरूच असतात त्यामुळे, ही काजळी पुन्हा गडद होते. या सर्व काजळीने, ईश्वराची आज्ञावली, धूसर होत जाते आणि त्यावर आपल्या कर्माची, अज्ञानाची, आज्ञावली (programme), आपण लिहितो आणि जन्मोजन्मी तिच आज्ञावली, कर्मफल रुपात, पाठलाग करते.
नुसता पाठलागच करत नाहीत, तर अनेक विघ्न, भोग, दुःख, दैन्य, चिंता, क्रोध, काम या स्वरूपात पुन्हा पुन्हा त्याच कर्मात फिरवत राहतात. आता हे सर्व जसं आणि जितकं सांगायला आणि समजावायला सोप्पं आहे, तितकं ते निस्तरायला आणि सुधारायला सहज आणि सोप्पं नाही. कारण त्या सर्व कर्मरुप आज्ञावलीचा ताबा हा मायारूप ब्रम्हाकडे असतो. त्यामुळे ही आपण लिहिलेली आज्ञावली, माया, आपल्या कडून लिहून तर घेतेच, पण आपल्याकडून लिहिलेल्या या आज्ञावलीवर आपल्याला कार्यरत करते.
म्हणजे या आत्मरूप तबकडीवर विधात्याने लिहिलेली आज्ञावली मागे सारून, देहरुप, बुद्धिरूप व मनरुप संगणकाला आपली स्वतःची आज्ञावली लिहायला भाग पाडणारे अनेक घटक, या भुलोकात, जगण्यासाठी ईश्वराने निर्माण केलेल्या, येथील विशिष्ट स्थिती, भुस्थिती व पंचमहाभूत रूप परिस्थिती मुळे, अस्तित्वात आहेत. हे सर्व घटक, मूळ आज्ञावली, पुसण्यासाठी अथक प्रयत्न करतात. ज्यांचा परिणाम म्हणून, मन, बुद्धी, वाचा व देह हे सर्व या चुकीच्या आणि मार्ग भ्रष्ट करणाऱ्या युक्त्या, गोष्टी यात अडकतात.
आता आपल्याला प्रश्न समजला आहे. पण उत्तर शोधणं खूप क्लिष्ट काम आहे. या मार्गात आपल्याला भ्रष्ट करणारे जे जे घडक आहेत,त्यांना अवरोध करून, त्यांना अटकाव करून, मूळ आत्मतत्वाची आज्ञावली स्थापित करणं, यासाठी अनेक उप आज्ञावल्या (अर्थात programmes) ईश्वराने आपल्यासाठी योजून ठेवल्या आहेत. ज्यांना नवविधा भक्ती, अष्टांग योग, ज्ञान प्राप्ती, वैराग्य,सन्यास,संयम,मनाची स्थिरता,एकाग्रता, कुंडलिनी शक्ती जागृती, अश्या अनेक नावांनी ओळखलं जातं.
या सर्वांचा उद्देश मूळ आज्ञावली स्थापून, देहाकडून, बुद्धिकडून, वाचेकडून, वाणी कडून व मनाकडून मूळ आज्ञावली नुसार, देहारुप जीवाला, कर्म शुन्यतेकडे घेऊन जाणं. याचाच विचार, विस्ताराने, आपण पुढच्या भागात करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०५/०६/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment