Skip to main content

राम अनुज भरत भाग ८

राम अनुज भरत भाग ८

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

स्नेहयुक्त भावाने, भरताने आपले व मातेचे नेत्र पुसले आणि तो मातेला म्हणाला.

माते, आता काय आज्ञा आहे." 

माता कौसल्या म्हणाली.

" हे नरश्रेष्ठ, पुत्र भरता, आता शीघ्र, गुरुदेव वसिष्ठ, यांची भेट घेऊन, त्यांना पुढील कार्याबाबत पृच्छा करून, मगच निर्णय घे. कारण राम वनात गेलेला असल्यामुळे, त्याच्या नंतर तूच ज्येष्ठ आहेस. त्यामुळे आता तूच निर्णय घेणारा राहिला आहेस.म्हणूनच गुरुदेवांना विचारून, तुझ्या योग्य मतीने तू निर्णय घे. आम्ही त्या निर्णयात, तुझ्या सह सोबत आहोतच." 

" जशी आपली आज्ञा" असं नम्रपणे बोलून आणि आपले नेत्र पुसून, भरत त्वरेने, राजप्रासाद परिसरातील, श्री गुरुदेव यांच्या, विश्राम गृहाकडे, रथ घेऊन रवाना झाला. राज पासादाच्या भव्य परिसरात, राजपुरोहित असलेल्या श्री वसिष्ठ महर्षींना उतरण्यासाठी आणि विश्रामासाठी खास तयार केलेल्या वनराईतील पर्णकुटी संकुला मधे, मुनिवर महर्षी श्री वसिष्ठ आपलं नित्य नैमित्तिक उपासना पूजा, अर्चना, याग करण्यात मग्न होते. 

 गुरुदेवांच्या विश्राम स्थानी पोहोचताच, अनेक पर्णकुटीत वनराईत सर्वात मध्यभागी असलेल्या, पर्णकुटीत भरत पोचला.अर्थात गुरुदेवांना संदेश धाडला असल्यामुळे, गुरुदेव आपल्या पर्णकुटीबाहेर आले. भरताने आदर पूर्वक, गुरुदेवांना चरण स्पर्श करून, प्रणाम केला आणि त्यांच्या कृपाशीर्वादाची प्राप्ती व्हावी असा आर्जव केला. गुरुदेव त्याला आशीर्वाद देऊन, वदले.

" हे कुलभूषण, राजपुत्र भरत, प्राप्त परिस्थितीत आपल्याला दोन महत्वाची कार्ये संपन्न करणे आवश्यक आहे. एक म्हणजे स्वर्गीय महाराज दशरथ यांचं निधन पश्चात प्रेतकार्य, श्राद्ध कार्य, त्या अनुषंगाने मुक्तीचे सर्व संस्कार आणि दुसरं म्हणजे तुझा राज्याभिषेक." 

त्यांना विनम्रतेने मधेच थांबवून, भरत म्हणाला.

" क्षमा करा गुरुदेव. पण अयोध्येच्या राजसिंहासनावर स्थापित होण्याचा अधिकार, जर कुणाला असेल, तर तो फक्त आणि फक्त कमलनयन, रघुकुल भूषण, ज्येष्ठ दशरथ पुत्र श्री रघुनाथ यानाच आहे. त्याना त्या स्थानी पाहिल्या शिवाय मी काहीही करू शकणार नाही. आता पर्यंत जे झालं, ते एक दुःस्वप्न समजून, विसरून, सर्वात प्रथम, मला श्रीराम याना घेऊन, येणं अती आवश्यक आहे. 

त्यामुळे मी आपल्यासह समस्त पुरोहित कुलगुरूंना विनंती करतो की, आपण निघण्यास सज्ज राहावे. बाकी सर्व व्यवस्था मी आर्य सुमंत याना करण्याची आज्ञा देऊन, रथ, गजदळ अश्वदळ, पददळ, अश्वशकट, वृषभ शकट इत्यादीसह, सर्व सैन्य आणि प्रजाजन या व्यवस्थेसह, तीनही माता, राज परिवार व उचित सेवकवर्ग आपल्या कडे घेऊन निघणे करावे लागेल. आपण निघण्याची तयारी करण्याची आज्ञा आपल्या सर्व मंडळींना करावी. आपल्यासाठी उत्तम अश्व जोडलेले रथ आणि सेवकवर्ग पाठवण्याची व्यवस्था मी करतो. " 

मुनिवर वदले 

" हे राम प्रिय भरता, आम्ही लगेच तयार होतो. तू सर्व व्यवस्था करून, सेवकांना इथे पाठवून दे." 

गुरुदेवांची अनुमती घेऊन, भरत,क्षणमात्र वेगात आपल्या रथातून, महालांकडे रवाना होतो.त्याच्या गमना पश्चात, ऋषिवर व सर्व विप्रवर्ग निघण्याच्या तयारीला लागतात. भरत आर्य सुमंत याना भेटून, राज्याची सर्व हालहवाल विचारतो. त्यांना सर्व परिस्थिती समजावून, त्वरित ससैन्य, गजदळ, अश्वदळ, रथ, रथी महारथी पददळ यांसह  सर्व दलभार तयार करून, श्रीराम याना आणण्या साठी लगोलग निघण्याची आज्ञा देतो. सुमंत त्याला रूकार भरून, सर्व तयारी करण्यास्तव, राजप्रासादाबाहेर गमन करून, सर्व मंत्रीगण, अधिकारी, सेवकवर्ग यांची व्यवस्था लावण्यासाठी कार्यतत्पर होतात. 

भरत आपल्या मातांच्या कक्षात प्रवेश करून, कैकयी lसह सर्व माता,  बंधू शत्रुघ्न व इतर सर्व सगेसोयरे याना विनाविलंब तयार होऊन, ज्येष्ठ भ्राता व कुल श्रेष्ठ श्रीराम याना आणण्यासाठी आपण निघणार आहोत, हा संदेश देतो. श्रीराम भेटीसाठी तीनही माता, ज्येष्ठ श्रेष्ठ स्नुषा यांसह सर्व राजपरिवार, लगबगीने निघण्यासाठी तयार होतात. 

भरताच्या या निर्णयाने, अनेकांचे, भरताबद्दल झालेले गैरसमज दूर होतात. सर्वांना लक्षात आलेलं आहे  की, मातेच्या या पापकृत्यात, पुत्र म्हणून भरताचा काहीही सहभाग नाही. किंबहुना मातेने केलेल्या कृत्याचा, आपल्या प्रमाणेच राजकुमार भरत याला देखील तितकाच क्रोध आला आहे. म्हणूनच श्रीरामांनी परत यावं, या आर्जवासाठी प्रत्येक गृहातून, ग्रामातून, नगरा तून जनसामान्य, मुख्य चौकाचौकात जमू लागले. कारण भरत ससैन्य,रघुकुल भूषण ज्येष्ठ राजकुमार महापराक्रमी श्रीराम याना विधि पूर्वक आणण्यासाठी जात आहे.

या वार्तेने सारा सेवकवर्ग, सेविका, प्रत्येक नगरनिवासी जन, जनसाधारण हर्शोल्ल्हासित झालेला होता. त्यामुळे वनात गेलेल्या श्रीरामांना परत माघारी येण्याची विनंती करण्यास, प्रत्येक जण उत्सुक होता. भरताने आधी, मार्ग पाहणी आणि आखणी करण्यासाठी, काही उत्तम उत्तम कुशल कारागीर आणि कर्मचारी मंडळी पुढे पाठवून, त्यांना मार्ग सुलभ, सुसज्जीत आणि ससैन्य जाता येण्यासाठी निर्धोक करण्यासाठी आगाऊ पुढे धाडून दिले. 

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१६/०६/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...