अध्यात्म विराम १९४
पूर्ण श्रद्धावान म्हणजे, या जगतात माझं अस्तित्व शून्यवत असून, जगतपालक हा एकमेव श्रेष्ठ आणि पुरुषोत्तम आहे, ही यांची धारणा स्थिर आणि अतुलनीय असते. याचा परिणाम म्हणून त्यांच मन अत्यंत स्थिर, अचल आणि सतत सकारात्मक असते. यांचा विचार, चिंतन व विवेक कायम जागृत असतो. मनात आंदोलनं होत नाहीत असं नाही, फक्त कमी असतात. पण त्यावर विवेकाने नियंत्रण मिळवण्याची हातोटी त्यांना प्राप्त असते. शांतपणे विचार करण्याची पात्रता त्यांच्या अंगी असते.
अशी पात्रता त्यांना अर्थातच, त्यांच्या कर्म ज्ञान व भक्ती यांपैकी एका किंवा बहु मार्गांनी त्यांना प्राप्त झालेली असते. कारण तशी साधनेची बैठक त्यांच्या पाशी मागील जन्मा पासून आलेली असते. मुळात असे जन हे अनेक जन्माच्या त्यांच्या साधनेचा, त्या पुण्याचा परिणाम म्हणून यांना या जन्मात जन्मतः अशी उत्तम मानसिकता, विवेकाचा पाया आणि शांत चित्तवृत्ती, प्राप्त झालेल्या असतात. याना आपल्या पूर्व संचिताने आणि सद्य कर्माने जे जे प्राप्त होते, त्या सर्वामागे ईश्वरी प्रेरणा आणि अधिष्ठान आहे, याची पूर्ण जाणीव यांच्या मनात जागृत असते.
ईश्वराला कायमस्वरूपी, अर्पण वृत्तीने, हे जन प्रत्येक कर्म व कार्य करतात. नव्हे तर ईश्वर आपल्याकडून हे सर्व करवून घेत आहे, अशी यांना मनोमन खात्री असते. त्यामुळे सदा समर्पित भावाने व शरणागत वृत्तीने यांचं जीवन प्रेरित असतं. आपल्या देहात स्थित अंतरात्मा हा सुद्धा ईश्वराचा दुत वा अंश आहे, याची जाणीव त्यांना सतत, चुकीचं कर्म, कुकर्म, वाईट मार्ग, हे टाळायला, मार्गदर्शन करत असतं. त्यामुळे यांच्या विचारांची गाडी आणि विवेकाची नौका कधीही मार्ग सोडून भटकत वा भरकटत नाही.
यांची मनोवृत्ती यांना निगर्वी राखण्यास मदत करते. यांच्या मनामधे, उपजत श्रद्धा भावतून, नित्य, अविरत ईश्वर चिंतन होत असतं. नव्हे तर प्रत्येक कर्म, ईश्वराला अर्पण करत करत, करण्याची वृत्ती, मानसिकता व देहाला तशी सवय जडलेली असते. जगातील प्रत्येक गोष्ट आणि आयुष्यात घडणारी प्रत्येक छोटी व मोठी घटना, ही ईश्वराच्या एका व्यापक व विशाल योजनेचा भाग आहे. त्यामुळे, त्यामधे मी माझ्याकडून जर काही सहभाग देता आला तर पाहीन. पण अन्यथा जाही हस्तक्षेप किंवा त्याला अडथळा वा बाधा येईल असं काही करणार नाही.
किंबहुना तसं काही करण्याचे विचार त्यांच्या मनात, येणार नाहीत. कारण एकदा एक तत्व, सदगुरू वा ईश्वर या रुपात मानलं की, याना दुसऱ्या कोणत्याही प्रेरणेची, ध्येयाची, उद्देशांची व प्रणेत्याची आवश्यकता भासत नाही. शुद्ध सात्विक भावयुक्त मन ही यांची सर्वात मोठी कमाई असते. जी त्यांना साधना व भक्ती या मार्गाने प्राप्त झालेली असते. म्हणून जीवनातील अनेक खाचखळगे, टक्केटोणपे, खस्ता, भोग, दुःख यात याना कधीही काही गैर, अन्यायकारक व अहितकारक भासत वा दिसत नाही.किंबहुना ते आपल्याच गैर कर्माने प्राप्त आहे, हे त्यांना माहीत असतं आणि त्यावर त्यांचा दृढ विश्वास असतो.
त्यामुळे याना कधीही या सर्वातून, ईश्वराने आपल्याला सोडावावं असं वाटतं नाही. उलट यांची अशी मनोवृत्ती असते की, यातून गेलो की, कर्माची वाईट फल भोगून संपतील आणि ती जितकी लवकर संपतील तितकी आपल्या मनाची, आत्म्याची शुद्धता वाढेल, हे याना ज्ञात असतं. त्यावर यांची पूर्ण श्रद्धा असते.
हाच विषय उद्याच्या भागात सुरू ठेवूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०२/०६/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment