Skip to main content

अध्यात्म विराम १९८

अध्यात्म विराम १९८

आपण अनेक प्रकारच्या गोष्टींचे, इच्छेचे, घटनांचे, व्यक्तींचे स्मरण नित्यनेमाने करत असतो. यातील काही स्मरण हे चिंतन स्वरूपातील असतं. ते आपण दीर्घकाळ मनात बाळगतो, त्यावर सखोल विचार करतो आणि बहुतेक वेळा त्यावर कार्य करतो.काही आपल्या विचारात येतं आणि फार वेळ तग न धरता, निघूनही जातं. पण काही काही इच्छा घटना वा स्वप्नं या स्मरण प्रकारात येतं हे रुजत ते तण स्वरूपात व मनात त्याची वाढ होते. असं स्मरण हे बहुतेक वेळा,नकारात्मक ऊर्जा, शक्ती असलेलं तण असतं. हे सहसा संशय, शंका कुशंका, वाद विवाद, वांझोटे परामर्ष, अश्या प्रकारच्या विचारांना जन्म देत.

हेच तण अनियंत्रित आणि अविचारी वाढ असलेलं स्मरण, अनेक टाकाऊ, निरुपयोगी, वर्ज्य, निरुत्साही आठवणी, प्रसंग, मान अपमान यांची गणना, दान धर्माच्या उपकार स्वरूपातील आठवणी, यश व अपयश यांच्या घटनांच्या नोंदी आणि अनेक उपद्रवी नोंदी यांच्या स्मरणांना मनात साठवून ठेवून, ते अयोग्य व चुकीच्या वेळी आपल्याला स्मरणात आणून देण्याचं कार्य, हे तण करतं. यातील अनेक आठवणी, खरतर माळ्यावर साठवलेल्या टाकून देण्याच्या लायकीच्या वस्तुंसारख्या असतात. 

त्यांची आठवण आपल्याला अयोग्य वेळीच अनेकदा होते. या आठवणी अहेतूक वा सहेतुक असतील. अहेतूक म्हणजे आपण त्या आठवणी मुद्दाम कुरवाळत नाही, पण काही प्रसंग,त्यांना आपल्या समोर आणून उभ्या करतात. अश्या सर्व गत काळातील अनावश्यक व मनाची अनाठायी ऊर्जा व शक्ती खर्च करणारी स्मरणं, अहेतूक असली तरी अशी स्मरणं, आपली ऊर्जा व शक्ती यांचा ह्रास करतात. शिवाय अनेक अनिष्ट कर्म निर्माण करतात. 

अनेक वेळा अश्या अनावश्यक गोष्टींच्या स्मरणात आपण सध्याचा बहुमूल्य, उत्पादक वेळ, ऊर्जा व शक्ती खर्च करतो. कर्माचा आणि धर्माचा असा दोन्हींचा कालापव्यय अर्थात वेळ चुकीच्या चिंतनात आपण खर्च करतो. कारण अश्या स्मरणाने आपल्याला लाभदायक काहीही प्राप्त होत नाही. उलट वेळेचा, शक्तीचा आणि ऊर्जेचा अपव्यय होऊन, अनिष्ट कर्मफल वाढीस लागतात. समर्थांनी सुद्धा दासबोधात आणि मनाच्या श्लोकात सांगितलं आहे, त्याचही सार हेच आहे की, उत्तम ते सोबत घ्यावे आणि टाकाऊ अथवा नीचतंम ते सोडून पुढे जावे. त्यांच्या सांगण्याचा मतितार्थ, अश्याच निरुपयोगी, टाकाऊ आणि ताण तणाव वाढवणारे असे सर्व प्रकारचे स्मरण सोडून द्यावे आणि पुढे जावे, हाच आहे.

कारण अश्या स्मरणात, हाती काही लागत नाही. उलट, मनाची ऊर्जा शक्ति व ईश्वराने आपल्याला आयुष्याचा दिलेला उपलब्ध काळ अनाठायी खर्च होतो. आता या दीर्घ चिंतनातून, आपल्या मनात एकच विचार येतो की, मग कोणते चिंतन उपयुक्त, उर्जात्मक, सदुपयोगी व कायमस्वरूपी लाभ देणारे आहे. असे काय चिंतन करावे, जेणेकरून, अविचार टळतील, विवेक जागृत राहील आणि योग्य ते कर्म घडतं राहील. म्हणजे असं काय चिंतन संत महंत, योगी महायोगी, साधुजन, कर्मयोगी, ज्ञानयोगी, भक्त करत असतील किंवा त्यांनी करावे, जे अहित टाळून, हित घडवून आणेल. 

इथे एक स्पष्ट करतो की, देहाच्या संदर्भात जे हित कारक आहे ते या भौतिक जगताशी संबंधित आहे. ते सर्व ज्ञान मानवाला देहात आल्यावर व जन्म घेतला की, प्राप्त होतं. ते ज्ञान देह, बुद्धी व मन, माया, जगताचा जगण्याचा नियम, जगणं हेच श्रेष्ठ आहे हे उपजत ज्ञान या सर्वातून प्राप्त झालेलं असतं आणि होत असतं. त्यामुळे ते ईश्वराला मुद्दाम येऊन, किंवा अन्य कोणत्याही व्यक्ती, इत्यादी माध्यमातून द्यावं लागत नाही. 

उदाहरणार्थ मुंगीला साखर कुठे आहे, हे कुणीही सांगावं किंवा दाखवाव लागत नाही किंवा मधमाशीला फुलांचा पत्ता द्यावा लागत नाही किंवा सूर्योदय झाल्यावर उमलावे हे फुलाला शिकवावे लागत नाही आणि भूक लागली की अन्न ग्रहण करावे, हे शिकवावे लागत नाही. त्याचप्रमाणे हे उपजत ज्ञान प्रत्येक देहात आत्मा प्रस्थापित झाल्यावर, आपोआप उघड होतं, उमलतं. 

मग प्रश्न असा उरतो की कोणत्या गोष्टीच्या स्मरणांच ज्ञान उपजत असूनही, सांगावं, शिकवावं व मनात दृढ करून, त्याची जाणूनबुजून सवय करून घ्यावी लागते. यावर पुढील लेखात आपण चिंतन करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
हे कॉपी राईट नोंदणीकृत लेखन आहे. त्यामुळे हे नावासकट प्रसारित करावे. 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१०/०६/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...