अध्यात्म विराम १९०
ज्ञान, वैराग्य आणि कर्म या मार्गांनी विवेक जागृती कशी होते, हे आपण मागील काही भागात पाहिलं. आता भक्तीचा मार्ग अनुसरून, मनुष्य, विवेकाची प्राप्ती कशी करू शकतो, याचा विस्ताराने विचार करूया. मुळात भक्त हा इश्वरापसून विभक्त नसेल तरच, त्याला भक्त हे संबोधन दिलं गेलेलं आहे. म्हणजे जो इश्वराशी अविभक्त राहून आपलं सांसारिक, पारमार्थिक जीवन व्यतीत करतो, तो भक्त.आता यातील ईश्वराशी अविभक्त म्हणजे काय अपेक्षित आहे, याचा विचार करूया.खऱ्या भक्ताची व्याख्या ईश्वराने स्वतः, गीतेतील ९ व्या अध्यायात २२व्या श्लोकात केलेली आहे. तो श्लोक खाली उधृत् करतो.
अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्।।९.२२।।
या श्लोकाचा विस्तृत अर्थ आपण लेख क्र ७० ते ८० या दरम्यान विस्ताराने पाहिलेला आहेच. त्यामुळे त्या विस्तारात पुन्हा न जाता, आपल्या विषया संदर्भात अर्थ बोध घेऊन,चिंतन पुढे नेऊया.या श्लोकात भगवंतांनी, त्यांना प्रिय असलेल्या भक्त या व्यक्तीत्वाची व्याख्या स्पष्ट शब्दात सांगितली आहे. जो जो कोणी अनन्यतेने माझं नित्य आणि अभियुक्त होऊन, चिंतन करेल, त्याचं सर्व क्षेमकुशल मी वाहीन, ही ग्वाही किंवा आताच्या भाषेत गॅरंटी, ईश्वराने स्व मुखाने, अर्जुनाला दिलेली आहे.
एक लक्षात घ्या की गीता ही प्रातिनिधिक माध्यम म्हणून सखा अर्जुनाला समोर ठेवून, भगवान श्रीकृष्ण, योगेश्वर यांनी सांगितली असली, तरीही ती समस्त जगतातील, सर्व प्रकारच्या भक्तांसाठी आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे,त्या सर्व भक्तांची चिंता मी वाहिन हे अर्जुनाला सांगायची, काहीच आवश्यकता नव्हती. फक्त अर्जुना संदर्भात, एकच व्यक्ती अर्जुन या बद्दल, त्यालाच व्यक्तिशः संबोधन करून,भगवंत बोलू शकले असते. सर्वांबद्दल बोलण्याची काहीच आवश्यकता नव्हती. पण त्याची आवश्यकता आपल्याला वाटली नसली तरीही, भगवंत जाणत होते की, या इथे काही वर्षात द्वापार युगाचा अंत होऊन, कलियुग हे घोर व खडतर युग सुरू होणार आहे.
त्यातील आपदा, विपदा व अनेकानेक संकटं, यातून खऱ्या ईश्वर साधकांची प्रचंड कुचंबणा होणार आहेच. पण भक्ती करणं हे देखील दुर्मिळ, दुष्कर आणि दुरापास्त होत जाणार आहे. अश्या विपरीत, कठीण आणि परिक्षा त्मक काळात, (ज्याची व्याप्ती कलियुग समाप्ती पर्यंत आहे), आपलं मन हेच आपल्या साधनेचा मार्ग, साधन आणि शक्ती आहे. भगवंतांनी त्रिकाल ज्ञानी असल्याचा प्रत्यय, या एका श्लोकात करून दिलेला आहे. अन्यथा इतकं शाश्वत, ठाम आश्वासन, ईश्वराने,अर्जुन या आपल्या सख्याच्या विषादाच्या माध्यमातून संपूर्ण जगताला दिलच नसतं.
म्हणजे एक स्पष्ट झालं की, भक्तीचा एकमेव मार्ग, जो या युगासाठी उपलब्ध आहे तो म्हणजे मन. याचं कारण, भक्तीचे बाकी सर्व मार्ग हे कलियुगातील परिस्थिती, माणसातील दानवी, विकृत वृत्ती, यांची वाढ, बेलगाम दहशत व कलीची या सर्व पाशवी वृत्तीला उद्युक्त करून प्रोत्साहित करणारी साथ, यामुळे माणूस भक्तिकडून, पाप आणि दुष्कर्म यांच्याकडे कळत व नकळत ओढला जाणार. विपरीत परिस्थिती आणि भुलोकीची दुःस्थिती यामुळे, भक्तिमार्ग अत्यंत कठीण होणार. त्यातही कलि युगाची खासियत म्हणजे आताच्या काळात बहुतेक जीवात्मे हे आपल्या संचितातील भोग भोगण्यासाठी या काळात आल्यामुळे, मायेचा, बुद्धीचा भ्रम निर्माण करणारी स्थिती सर्वत्र अस्तित्वात असणार.
याच्या परिणामाने, भक्ती, भक्त हे दुस्थितीत राहणार आणि दुर्मिळ होत जाणार, म्हणून ईश्वराच्या या गॅरंटी चं काय, यावर उद्याच्या भागात विस्ताराने चर्चा करून, श्लोकाचं विवेचन व त्या अनुषंगाने विषयावर चिंतन करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२४/०५/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment