Skip to main content

अध्यात्म विराम १८९

अध्यात्म विराम १८९
 
जगतात एकमेव सत्य म्हणजे कर्म. श्रीमद् भगवत गीते मध्ये भगवंतांनी म्हंटल्याप्रमाणे, कोणताही प्राणी कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजेच काहीही न करणं हे देखील एक कर्मच आहे, हे नक्कीच.पण कर्म करणारा, आपल्या प्रत्येक कर्मात, नवनवीन फलांची बीजं पेरत पुढे जात असतो. त्याचवेळी तो मागील कर्मांची फल भोगत भोगत पुढे जातो. हा वास्तविक एक सलग, सरळ आणि नित्य नैसर्गिकरीत्या चालू असलेला चक्राकार मार्ग आहे. म्हणजे आज केलेलं कर्म कधी फल देईल, हे ईश्वर जाणे. पण मागील कर्माचा हिशोब मी आज चुकता करतो. 

पण गफलत कुठे होते तर, आज मी सत्कर्म करताना, मागील गैर कर्माच फल समोर येतं आणि आपण गोंधळून जातो. म्हणजे आज मी पैसे साठवून ठेवी बँकेत जमा केल्या आणि मागील कर्ज समोर येऊन, त्यासाठी या ठेवी मोडाव्या लागल्या.अर्थात हा सहज प्रकार अनेकांना माया, अज्ञान आणि भ्रम यामुळे, सहसा अनेक जन्मात लक्षात येत नाही. पण आपल्याच उत्तम कर्माच्या परिणामाने, ही संगती अनेक जन्म अशीच वागवत आपण फल आणि पुन्हा पुन्हा चुकीचं कर्म, याचं चक्रात राहतो. 

चुकीची कर्म म्हणजे, आज मी उत्तम कर्म करताना मागील भोग समोर आले आणि ते भोगत असताना मन चुकीचा निष्कर्श काढून विवेकाला गोंधळून टाकत. माणूस विचार करतो की इतकं चांगल कर्म मी करतोय, इतकी चांगली साधना, भक्ती मी सुरू केली आहे आणि ईश्वराला त्याचं काहीच नाही. भोग माझ्या मागे लावून दिलेत.या विचाराने आपण द्विधा मन:स्थितीत, चांगली आणि वाईट, योग्य आणि त्याज्य अशी सर्व कर्म करतो. त्याचा परिणाम काय होतो की, चुकीच्या व त्याज्य कर्मांचा परिणाम पूर्ण शक्तीने होतो आणि त्याचवेळी योग्य व चांगल्या कर्मांचा परिणाम हा पुन्हा शून्यवत होतो.

म्हणजे पुन्हा येरे माझ्या मागल्या आणि आपण यावर म्हणतो काय की, बघा कितीही चांगलं केलं किंवा चांगलं वागल तरी माझं नशीब बदलत नाही. पण याच चक्रात असच फिरत असताना, माणसाला जाणीव होते की, हे चक्र नित्य अविरत आहे, तर यातून बाहेर येण्याचा काही मार्ग असावा.अथवा या प्रश्नांच्या उत्तरात फिरताना, मनातील प्रश्नांच्या वासना, माणसाला श्रध्दा, सद्गुरू आणि साधना, या त्रयीकडे ओढून नेतात. याचं कारण म्हणजे मनातील विचारांच्या, प्रश्नांच्या आणि या समस्यांनी गांजलेल्या जाणिवांच्या तीव्र लहरी, ब्रम्हांडात फिरत असताना, त्यांचा संयोग सद्गुरू रूप चैतन्य लहरिंशी होतोच होतो.

म्हणूनच अपेष्टाचा, हालांचा, कष्टांचा, चिंता, काळज्या यांचा जेंव्हा अतिरेक किंवा कडेलोट होतो, त्यावेळी सदगुरू कृपेचा ओघ सुरू होतो. जर या जन्मात मृत्यू पर्यंत अश्या चिंता कष्ट यांनी आयुष्यभर पाठ सोडली नाही आणि मृत्यू त्याचं योगात आला, तर पुढील जन्म हा अत्यंत कृपामय येतो. कारण ईश्वराच्या लेखी, देह हा येणे जाणे या परिवर्तन कोष्टकात असला तरीही आत्मा हा एक अविनाशी धागा या सर्व देहांना बांधून ठेवतो. म्हणूनच आपण एखाद्याला जन्मापासून विरक्त व योगी वृत्तीचे पाहतो. याची दोन कारणं असतात.

एक म्हणजे त्या आत्म्याने मागील देहात अपार यातना, कष्ट, चिंता, दुर्दशा भोगली आहे किंवा सुखाची, उपभोगांची परिसीमा मागील जन्मात उपभोगली आहे. या दोन्ही कारणांनी मृत्यू समयी,जगण्याची, मिळवण्याची विरक्ती येऊन, त्या देहातून आत्मा बाहेर पडला. आपण हे तर जाणताच की, अंते मती सा गती. हा विधात्याचा नियम आहे.म्हणूनच अत्युच्च भोग, किंवा उपभोग जे कर्माची परिणती आहेत, त्यातून विरक्ती वा वैराग्य आणि त्या वैराग्यातून विवेक जागृत होतो. 

अर्थात ही प्रक्रिया दोन किंवा त्याहून अधिक जन्मात घडेल किंवा या एकाच जन्मात सद्धा घडू शकते.तशीच विवेकाची जागृती अनेक योगी, तपस्वी, संत सज्जन याना आलेली आपण वाचलं आहे आणि जाणल आहे. ही विवेक जागृती कर्माच्या फलाच्या चक्रातून अविरत फिरत असताना, त्यातून बाहेर पडण्याच्या मनातील दृढ व दुर्दम्य इच्छाशक्तीने साध्य होतं. 

हाच विषय आपण पुढील भागात चर्चेला नेऊन, वैराग्य आणि विवेक यावर चिंतन करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२३/०५/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...