भोग आणि ईश्वर २७४ वास्तविक आपण सुरवात, ईश्वराच्या आराधनेला नाम घेत लगोलग त्याच्या स्मरणाने करतो आणि इथेच आपण खरतर चूक करतो. आपल्या मनाला अनेक वर्षे सवय नसते, त्यात सध्याची व्यवधानं, व्याप, व्यस्तता इतकी आहे की, नामस्मरण सुरू करा असं म्हणणं आणि नामस्मरणाची गोडी लागणं, यात खूप अंतर आहे. अर्थात असंही म्हटलं जातं की, एकदा सुरू करा , गोडी त्यामागून आपोआप येईल. पण याबाबतीत माझं मत थोडं वेगळं आहे. मनाला त्याबद्दलची ओढ लगेच लागली नाही किंवा मन त्यात गुंतलं नाही तर चांगली गोष्ट वा सवय किंवा उपासना व साधना असूनही, मधेच सुटण्याची शक्यता आहे. याचबरोबर त्यातून अवेळी मनाची निवृत्ती होण्याची शक्यता आहे आणि असं झाल्यास वृत्तीतील अनिष्ट प्रवृत्ती जास्त जोरात डोकं वर काढण्याची शक्यता आहे. याच करता आपण दोन भागात बघितलं त्याप्रमाणे आधी श्रवण, मनन, चिंतन, श्रवण केलेला नामाचा, प्रार्थनेचा, कल्पनेतील नादाचा आनंद अनुभवण्याची सवय व गोडी एकदा लागत गेली की, तद्नंतर नामाकडे त्याला हळूहळू वळवता येईल, असं माझं प्रामाणिक मत आहे. मुळात जन्माला येण्याआधी आणि मागील जन्मातील देह सोडल्य...