Skip to main content

भोग आणि ईश्वर ११२

भोग आणि ईश्वर  ११२
 
कालच्या लेखात म्हटल्याप्रमाणे आत्म्यावर व मनावर  वासना, माया, मोह आणि कर्मफलितांचा असलेला, जन्मानु जन्माचा पडदा, हा प्रत्येक जन्मात इतका दाट आणि गडद होत जातो की, त्यायोगे मनःचक्षूंना, वास्तव चित्र दिसत नाही. त्यामुळे जे दिसतं ते चुकीचं असतं, दिशाहीन करणारं आणि वादळात सापडलेल्या नावेप्रमाणे असतं.

त्यामुळेच आपण दुःखात, भोगात, विपरीत परिस्थितीत ईश्वराला दोष देतो, नशिबाला दोष देतो आणि आपलं समाधान करून घेतो. खरतर हे आपल्याच अनेकानेक जन्मांच्या कर्माचं फलस्वरुप आहे आणि असतं. ईश्वर कधीही कोणाच्याही प्रारब्धात अकारण आणि अहेतुक ढवळाढवळ करत नाही. किंबहुना त्यानेच निर्माण केलेल्या सृष्टीच्या आणि कर्म व संचित सिद्धांताप्रमाणे तसा अधिकार, ईश्वराने स्वतः जवळ ठेवलाच नाही. 

मुळ निर्गुण रुपात एकतत्वात रत व ध्यानस्थ ईश्वराला, सृष्टीतील त्रिगुणांनी, सगुणात आणलं. या सगुण साकार रुपाला प्रत्येकाने, आपल्या दृष्टिनुसार, नामाभिधानं दिली. निर्गुण निराकार तेजाला, ज्यावेळी ज्यांनी ज्यांनी आपल्या साधना तपसामर्थ्य व पुण्यकर्म या द्वारे पाहिलं, त्यावेळी त्या निर्गुण रुपाला, त्यांनी ज्या स्वरूपात पाहिलं, त्यानुसार त्यांनी त्यांनी त्या स्वरूपाला नाम दिलं. 

फक्त मानवी रूपातील त्यांचे अवतार त्या त्या काळातील व त्या काळानंतरही सामान्य जीव पाहू शकले वा शकतात. ईश्वराचं खरं स्वरूप आत्मरूपात एक तेजाचा महाप्रचंड, महाकाय सर्व ब्रह्मांडव्यापी प्रकाश या स्वरूपात प्रकट होतो. त्या पुण्यवान जीवांना दर्शनहेतू, ती विश्वात्मक शक्ती त्या त्या सौम्यरुपात स्वतःला प्रकट करते. 

या आत्मतेजाचा प्रकाश, देहरूपातील सर्वसामान्य जीवांना साहजिकच सहन होणार नाही, हे जाणूनच सात्विक सगुण रूपात, त्या चैतन्यशक्तीने प्रकट होऊन, आपली भक्त वत्सलता व पुण्यात्म्यांच्या साधनेला, त्याच सौम्य रुपात प्रतिसाद दिला. अश्या या ईश्वरी अंशातून, ब्रह्मांडात येऊन, पंचमहाभूतरुप देहात, प्रवेश केल्यानंतर, त्याच आत्मतेजाचा अंश असलेल्या आपल्याला, त्या चैतन्यमय रूपाचा विसर पडतो. इथेच सोहमचा कोहम होतो.

ब्रह्मांडात प्रवेश करताच, माया सर्वप्रथम जीवाचा ताबा घेते आणि ईश्वराच्या अंशाला विश्वापित्याचा सर्वप्रथम विसर जन्म घेतला की, होतो. जोपर्यंत तो जीव आत्मरूपात वावरत असतो, तोपर्यंत त्या जीवाला सर्व ज्ञान स्मरत असतं. गर्भात सुद्धा त्याला सोहम ज्ञात असतं. पण गर्भात जसजसे बाह्य जगातील संस्कार होत जातात तसतसे गूढ व गुह्य रूपातील त्या ज्ञानाचा आणि स्वतःच्या आत्मरूपाचा जीवाला विसर पडायला सुरुवात होते. म्हणूनच गर्भसंस्कार हे अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्याचं प्रत्यक्ष प्रमाण म्हणून अभिमन्यूचं नाव कायम घेतलं जातं आणि जाईल. 

त्या गूढ ज्ञानाचा अंश सूक्ष्मरूपाने सुप्तमनात वास करत असतो आणि मुलाधारात कुंडलिनी रुपात ती शक्ती निद्रिस्त असते. किंबहुना विश्वशक्तीकडे जाण्याचा मार्ग कुंडलिनी स्वरूपात, एखाद्या कुपीत बद्ध असतो. ज्याला सर्पाकार म्हटलं जातं. ही शक्ती जागृत करून, तिला मस्तकापर्यंत, सहस्त्रार चक्रात, नेऊन स्थिर करणे म्हणजे कुंडलिनी जागृती. अतींद्रिय ज्ञान, विश्वाचं व विश्वापलीकडील ब्रह्मांडाच्याही पलीकडील अतिगुढ, गुह्य रहस्य या शक्तीच्या जागृतीने उलगडत जातं. 

एकप्रकारे आत्मरुपाला समजून घेण्याचा महामार्ग हा कुंडलिनी शक्तीत आहे. त्याच्या जागृतीचे मार्ग अष्टांग योगसाधना, ध्यानधारणा, शक्तिपात इत्यादी अनेक आहेत. परंतु हे फक्त मार्गदर्शनाने प्राप्त करण्याचे आहेत. ते तितकेच कष्टदायकसुद्धा आहेत. म्हणून आपणहून या मार्गावर विनामार्गदर्शन चालणं म्हणजे आत्मघात करून घेण्यासारखं आहे.

पण मग सर्वसामान्य जीवांना, या ज्ञानाला जाणून घेण्याचा काही साधा सोपा मार्ग नाही का. याचं उत्तर हो आहे. तो म्हणजे भक्ती, ईश्वरआराधना, ईश्वर स्मरण आणि त्या स्मरणाचं सतत आवर्तन अर्थात नामस्मरण रुपात, त्या स्मरणाच्या समिधा, साधनेच्या स्वरूपात, सतत आत्म्यातील ईश्वरावर अभिषेक म्हणून वाहात राहणं. हा मार्ग सहजसोप्पा विनाकष्टाचा आणि साधा आहे. फक्त इथे वेळ लागेल, तरीही लक्ष साध्य होईल. भरकटलो तरी घात नाही. 

म्हणूनच जर सद्गुरू हात हाती धरला तर या मार्गात भटकण्याची शक्यता अजिबात नाही. फक्त सद्गुरू हात अर्थात दृढ श्रद्धेने धरून ठेवणे. यावर अधिक बोलू उद्याच्या भागात.  तोपर्यंत नाम घ्या, गुरुचरणी स्थिर रहा त्यातूनच पुढील गती मिळत जाईल. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२२/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...