Skip to main content

भोग आणि ईश्वर १२२

भोग आणि ईश्वर  १२२
 
आपण कित्येकदा एखाद्याच्या बोलण्याने व्यथित वा नाराज अथवा निराश होतो.  कारण सकृतदर्शनी ते बोल विनाकारण  ऐकावे लागलेले असतात. त्यात आपली काही चूक असते वा नसते. उदाहरणार्थ एखाद्यावेळी आपण चांगल्या मनाने व उद्देशाने, एखादा वाद वा विसंवाद सोडवायला जातो आणि आपल्यालाच चार शब्द ऐकून घ्यावे लागतात. किंवा कधी कधी आपण कशातही नसताना आपल्या प्रतिमेबद्दल वा स्वभावाबद्दल चुकीचं बोललं जातं वा वागणुकीतील नसलेले दोष दाखवले जातात.

या किंवा अश्या प्रसंगात दोन गोष्टी शांतपणे मनात विश्लेषित करायच्या. सर्वात प्रथम, नेहमी आपला सद्सद्विवेक जागा ठेवायचा आणि त्यासाठी आपलं डोकं, बुद्धी आणि मन, अशी गोष्ट वा वाक्य  ऐकत असताना वा ऐकल्यावर, शांत ठेवायचा प्रयत्न करायचा. इथेच नाम क्षणमात्र का होईना पण उत्तम कार्य करतं. दहा आकडे मोजण्यापेक्षा दहावेळा नाम घेतलेलं सर्वात उत्तम. 

जर आपण शांत राहिलो आणि आपला विवेक जागा राहिला, तर एक गोष्ट मनात स्वतःला विचारायची की, या व्यक्तीने आता माझ्याबद्दल जे बोल बोलले त्याप्रमाणे मी आहे का. उत्तर हो असेल, तर मग ती व्यक्ती सत्य कथन करत आहे, मग रागावण्याचा प्रश्न येत नाही. 

जर सत्य नसेल तर, एकतर ते त्या माणसाचं दूषित मत म्हणजे wrong perception आहे. त्यामुळे हा व्यक्तिगत मतांतराचा मुद्दा आपण विचारात घेऊन फायदा नाही. शिवाय त्या व्यक्तीला त्या क्षणी समजावून सांगण्यात अर्थ नसतो. म्हणून त्या क्षणी बोलणं गैर असतं. जर ती व्यक्ती मुद्दाम तसा समज पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यात त्याला त्याच्या या कुकर्माचं फल मिळणार हे नक्की. 

आपण यात काही करण्याचा प्रयत्न केल्यास, त्यावेळी ती व्यक्ती मोह माया यांच्या प्रभावात असल्यामुळे, आपले कष्ट वायच जातात. योग्यवेळी, त्या व्यक्तीला, त्याचा चुकीचा  मुद्दा वा आपला स्वभाव वा आपला खरेपणा कळेल. आपण हताश, निराश वा उद्विग्न होण्यात काही अर्थ नसतो. त्या क्षणी ती व्यक्ती, मुद्दामहून करत असल्या कारणाने किंवा बुद्धिभ्रमामुळे ती व्यक्ती काही ऐकणार नसल्याने, व्यर्थ श्रमात वेळ, शक्ती व मनाची शांतता आपण घालवून बसतो. 

या सगळ्या व्यर्थ विचारात वेळ व शक्ती खर्च करण्यापेक्षा आपण तोच वेळ नामात सत्कारणी लावू शकतो. त्याने दोन फायदे होतील. एक मन त्यावेळी शांत होईल, त्या विचारातून बाहेर येईल आणि नामाच्या साधनेचा अतिरिक्त आणि उपयुक्त लाभ होईल तो वेगळाच. अजून एक विचार यातून आपल्याला बाहेर काढेल. एक साधा विचार करा की, ज्याअर्थी अश्या प्रकारचे दूषित बोल, अकारण आपल्याला ऐकण्याची वेळ आली, त्याअर्थी आपल्या पूर्वकर्मातील काही अनिष्ट फल, आपण भोगून संपवलं वा संपवतो आहोत. 

कदाचित पूर्वकर्मात वा पूर्वजन्मांत आपण, हे दूषित फल प्राप्त करण्यायोग्य काहीतरी कर्म, केलेच असेल, ज्ञात वा अज्ञातात. त्यामुळे त्या कर्माचं फलित आपल्याला प्राप्त होऊन ते कर्म शांत झालं. आता  यामध्ये आपण त्या व्यक्तीला पुन्हा काही बोलून वा त्यांच्याबद्दलचं अनिष्ट चिंतन मनात करून, एका नवीन कर्माला जन्म देत असू.  म्हणजे पुन्हा एकदा असाच प्रसंग वा अशीच वेळ आपल्यावर आपणच ओढवून घेत असू शकतो. 

त्यामुळे निदान आपल्यापुरती ही कर्मसाखळी तोडण्याची दैवी संधी, आपणच आपल्या अविचाराने वा अविवेकी कृतीने वाया घालवता कामा नये. कारण आपला जन्म हा, हीच कर्म साखळी भेदण्यासाठी आहे. हाच कर्माचा चक्रव्यूह भेदण्या साठी विधात्याने हा मानवी जन्म देऊन एक संधी दिली आहे, हे लक्षात घ्या.

त्यामुळे ते टाळणं आपल्याच हाती आहे आणि निदान ते टाळण्याची वा त्यावर पुनर्विचार करण्याची सद्बुद्धी, आपला सद्सद्विवेक जागा ठेवून, त्या ईश्वराने एक सुसंधी आपल्याला दिली आहे. असा विचार करून ती गोष्ट मनातून काढून टाकायची. आपल्या प्रारब्धातील व संचितातील एक दोष आपण भोगून नष्ट केला, हा आनंद जास्त आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. मी माझ्या व्यक्तिगत जीवनात याचा वापर केला आहे आणि करतो. कारण कोणते भोग कधी समोर येऊन, आपल्याला भोगावे लागतील, हे ईश्वरसुद्धा सांगू शकणार नाही. याकारणे मौनं सर्वार्थ साधनम् . 

अजूनही काही मुद्दे यात बाकी आहेत.त्यावर उद्या पुढे चर्चा करूया. तोपर्यंत नाम घेत रहा, सद्गुरुवंदन नित्य करा. त्यानेच इप्सित साध्य होईल.

भोग आणि ईश्वर भाग १ या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे. शंभराच्यावर पुस्तकांची नोंदणी झाली आहे.बाकी तपशिलासाठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०१/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...