भोग आणि ईश्वर ९२
आत्मबलशक्ती जन्मतः जागृत असलेली व्यक्ती निरंतर आत्म्याच्या प्रभावात असते आणि स्थल काल यांचा कोणताही परिणाम, त्यांच्या वृत्तीवर, उक्तीवर आणि कृतीवर होत नाही. लोकोत्तर कार्य केलेल्या अनेक व्यक्ती याचं उदाहरण म्हणून सांगता येईल. अश्या लोकांना संकटं ही आव्हानात्मक वाटतात. किंबहुना संकटात त्यांच्या शारीरिक, बौद्धिक व मानसिक शक्ती तीव्रतेने जागृत होऊन अलौकिक ऊर्जा व प्रज्ञा त्यांना संकटावर मात करायला नेहमी कार्यरत असतात.
वासनेचा प्रभाव अश्या लोकांवर कधीच होत नाही. म्हणूनच सर्व संत महंत नेहमी सांगत असतात की, वासनेवर नियंत्रण मिळवा. याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे वासना नियंत्रण आत्मबलशक्ती वृद्धिंगत होण्यास मदत करते. आत्मबल शक्ती म्हणजे आत्म्याचं सर्व कार्यावर पूर्ण नियंत्रण. साधनेचा जोर वाढवून आणि सर्व प्रकारच्या वासनांवर नियंत्रण करून माणूस आत्मबल शक्ती वृद्धिंगत करू शकतो.
एक उदाहरण घेऊ. आपण ज्यावेळी आजारी असतो आणि अशक्तपणा आलेला असतो, त्यावेळी आपण अगदी साधा कप जरी उचलला तरी हात थरथरतात किंवा थोडा कंप हातांना जाणवतो. पण जस जशी आपली शक्ती पूर्ववत होते तसतसा हा कंप कमी कमी होऊन सरतेशेवटी कंप पूर्ण नाहीसा होतो. आपली सद्यस्थिती ही त्या अशक्त माणसा समान आहे. कारण आपण वासना, माया, प्रारब्ध, संचित आणि कर्मफल गतीच्या फेऱ्यात सापडले आहोत. त्यामुळे आपली आत्मबलशक्ती अत्यंत क्षीण आहे.
यातून नामस्मरण व तद्नंतर सद्गुरुकृपा हीच आपली आत्मबलशक्ती वाढवण्यास सक्षम आहे. म्हणून साधना पूर्ण प्रामाणिकपणे व नियमित करत गेल्यास आणि आपण करत असलेल्या नामाचे जे सद्गुरू आहेत त्यांना नित्य प्रार्थना करत गेल्यास, त्यातून प्राप्त ऊर्जेच्या व चेतनेच्या लहरी आपली मनोबल वृद्धी करतात आणि त्यायोगे आत्मबलशक्ती वाढीस लागते. हे एकप्रकारे आत्मविश्वास मिळवण्यासारखं आहे.
यासाठी सर्वात प्रथम निःशंक मनाने आपलं नामस्मरण सुरू ठेवावं. कारण नाम हे सर्वश्रेष्ठ आणि सर्वशक्तिमान असल्यामुळे, ते घेत असताना निर्माण होणाऱ्या लहरी एक प्रकारचा कोष साधकाभोवती निर्माण करतात, ज्यामुळे साधक इच्छित ध्येयाप्रत पोचण्यास मदत होते.
परंतु हा कोष अधिकाधिक घट्ट करण्याचं काम, साधनेतील चिकाटी, नियमितता, आत्मसंयम आणि प्रामाणिकता करतात. जसजसं आपण नित्य नामस्मरणा कडे जाऊ, तसतसे त्याचे परिणाम मनाची ताकद, सकारात्मक ऊर्जा, आत्मसंयम आणि आत्मबलशक्ती यावर अर्थातच सकारात्मकपणे जाणवायला सुरवात होईल.
आता वरच्या परिच्छेदात आपण आत्मसंयम हा शब्द दोन तीन वेळा पाहिला. आत्मसंयम म्हणजे एकप्रकारे मनावर व शरीरावर स्व अर्थात आत्मा याचं नियंत्रण. आपण भावनेच्या, वासनेच्या, संसारातील अनेक मोहमायेच्या प्रभावात आणि जगराहाटीमुळे नित्य मायेच्या प्रभावात असतो. अशावेळी देह आणि मन ठरवतं आपण काय करायचं, काय खायचं, काय प्रतिक्रिया द्यायची, काय कर्तव्य करायचं इत्यादी.
म्हणजेच एकप्रकारे देह आणि मन हेच संपूर्ण व्यापार बघत असतात आणि आपण म्हणजे मूलस्वरूप आत्मा हा आपलं अस्तित्व जवळजवळ हरवून बसलेला असतो. हा हरवून बसलेला आत्मा हळूहळू मूळ पदावर आणून त्याच्या हातात मनाचा आणि देहाचा लगाम देणं म्हणजे आत्मसंयम करणं.
यावर विस्ताराने चर्चा उद्याच्या भागात करूया. तोपर्यंत नामात रहा, नित्य नाम घ्या, तेच तुम्हाला तारणार आहे.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०२/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment