भोग आणि ईश्वर ९६
नामाच्या एकाग्रतेचा अभ्यास करताना आपण त्यातील चार पायऱ्या पाहिल्या. एक म्हणजे डोळे मिटून आपलाच आवाज मनाने कानातून ऐकण्याचा प्रयत्न करणं. ही स्थिती काही क्षण इथपासून ते काही मिनिटं इथपर्यंत जमायला लागली की, आपण पुढील पायरी अर्थात आपला आवाज हळूहळू कमी करून मनाने व कानाने तो ऐकण्याचा प्रयत्न करूया.
तिसऱ्या स्थितीत आपण आवाज पूर्ण कमी करून आणि तरीही त्या नामावर व त्यातील नादावर एकाग्र होण्याचा प्रयत्न केला. वरील सर्व पायऱ्या हळूहळू पण नियमित व नेटाने पार करत आपण चवथ्या पायरीवर येतो, जिथे आपण नामातील शब्दांवर एकाग्र होण्याचा प्रयत्न करत आहोत. थोड्याश्या अभ्यासाने आणि नियमित प्रयासाने हे चार टप्पे पार करणं शक्य होईल. वास्तविक याला काही दिवसांचा अभ्यास व प्रयास जरुरी आहे.
हा अभ्यास पूर्णपणे मनात आणि देहात रुजला की पुढील पायरी म्हणजे आपला नामाचा ध्वनी पूर्ण बंद करून, ओठांची हालचाल सुद्धा बंद करून, आपल्या मनात उमटणारे नामाचे शब्द ऐकणे. अर्थातच पहिल्या चार पायऱ्यांनी मन एकाग्र झालेलं असल्यामुळे, आपण प्रत्यक्ष जप न करता, मनात जप करू आणि त्या नादावर मनाला व देहाला डोलायला लावू.
इथे वैखरी बंद झाली आहे आणि जप मनातल्या मनात चालू आहे आणि मिटलेल्या डोळ्यांनी, आपण आत वळून, मन कानावरून स्वरयंत्रावर वा हृदयावर केंद्रित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मनातील नाम, मनात म्हणत, मनातच ऐकण्याचा आनंद खरा सात्विक आनंद असेल. इथपर्यंत चार पायऱ्यातून गेलेलं मन हळूहळू नामाचा जाप करायला सुरुवात करेल आणि आपण तटस्थपणे ते ऐकण्याचा प्रयत्न करूया.
या सर्व गोष्टी करताना आपापल्या सद्गुरूंना स्मरूनच या प्रयासाला सुरवात करायची आहे. कारण गुरुकृपेशिवाय या जगी तरणोपाय नाही. ज्यांनी लौकिक अर्थाने गुरू केले नसतील, त्यांनी आपलं नाम हेच आपले सद्गुरू आहेत असे कल्पून, त्यांना मनात प्रणाम करून या अभ्यासाची सुरवात करावी.
कारण सद्गुरू ही दुसरी माऊली आहे. एक माऊली या जगात आणते त्यामुळे ती श्रेष्ठ. कारण आत्म्याच्या उद्धाराचा मार्ग हा मानवरूपातच साध्य होतो. या देहाशिवाय मुक्ती ही शक्य नाही, हे त्रिवार सत्य आहे हे जाणावे. त्यानंतर या देहातून आणि विश्वातून मुक्त होण्यासाठी सद्गुरू ही दुसरी माऊली आहे. सद्गुरू आपल्या साधकाला त्याच्या साध्यापर्यंत बोट धरून नेतात.
अपात्र असलेल्यांना पात्र बनवतात, मूढ असेल तर त्या साधकाला उन्नत करून घेतात, न्यून असल्यास त्यास सुधारून घेतात आणि त्यांच्या परमदयाळू वृत्तीमुळे आणि गुरुपदाच्या अधिकारामुळे, प्रत्यक्ष परमेश्वरालासुद्धा, प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य आणि अशक्य ते शक्य करण्याची शक्ती सद्गुरुंच्या पाशी असते.
त्यांना साधकाला, त्यांच्या त्यांच्या साधनेतील प्रगतीनुसार, पुढे नेण्यात विलक्षण संतोष व आनंद मिळतो. खरे सद्गुरू हे आपल्या साधकांच्या प्रगतीने उत्साहित होतात आणि त्यांना हरप्रकारे हरसमय सहाय्यभूत होण्यास तत्पर असतात. आपण त्यास पात्र होण्याचा प्रयत्न सतत केला पाहिजे. यासाठी मुख्य नियम सद्गुरू सेवा म्हणजेच त्यांनी सांगितलेलं साधन वा नाम वा जप नित्य, जेंव्हा जेंव्हा शक्य आहे तेंव्हा आणि साधल्यास अखंड करावं आणि तीच खरी गुरुसेवा होय.
प्रत्यक्ष परमेश्वर ज्यांच्या शब्दखातर काहीही करण्यास बद्ध असतो, किंवा खरे सद्गुरू परमेश्वराला आपल्या साधना व सिद्धी या आधारे, वशीभूत करतात. अर्थात त्यांच्या विनंतीला परमेश्वरदेखील टाळू शकत नाही. तरीही खरे सद्गुरू याचा दुरुपयोग करत नाहीत. सद्गुरू, साधकाला त्याच्या संसारात गुरफटून साधनेचा विसर पडेल, अश्या भौतिक जगतातील गोष्टी, कधीही देत नाहीत. पण जिथे साधकांच्या प्रगतीत, एखाद्या संकटामुळे वा समस्येमुळे, अडचण वा अडथळा निर्माण होऊ शकणार असेल, तर त्या समस्या व ती संकटं दूर करण्याचा प्रयत्न सद्गुरू नक्कीच करतात.
अर्थातच साधक साधनेच्या मार्गात नित्य राहील आणि त्या मार्गात असताना, त्यातील संकटरूप काटेकुटे, माया, अनिष्ट गोष्टी इत्यादी जरूर बाजूला करून, साधकाचा साधनेचा मार्ग निष्कंटक करतात. परंतु प्रारब्धाने आलेले भोग कमी वा टाळून साधकाला पुढे नेत नाहीत. पण तसे भोग जर साधकाला मार्गभ्रष्ट करणार असतील किंवा विचलित करून साधनेतील बाधा बनणार असतील तर सद्गुरू ते दूर करण्यास सक्षम असतात.
सद्गुरुकृपेवर अजूनही थोडा विचार करूया पुढील भागात.
पण तोपर्यंत नामात रहा, मी वर दिलेल्या पाच पायऱ्यांचा अभ्यास करा, गुरुवंदन करा, नित्य नाम घ्या, तेच तुम्हाला तारणार आहे.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
०६/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment