Skip to main content

भोग आणि ईश्वर १०० (लेखमालेचा शतकोत्सव)

भोग आणि ईश्वर  १०० (लेखमालेचा शतकोत्सव)
 
आज सलग शंभर दिवस लिहिताना, इतके सर्व विचार, इतक्या सलगपणे, एखाद्या माळेत गुंफून, त्यांना लिखित स्वरूपात, तेसुद्धा सोप्प्या भाषेत व शैलीत, मांडणं, हे खरतर सद्गुरूकृपेशिवाय अशक्य अशी गोष्ट आहे. त्यासाठी प्रथम माझे सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा, मी जन्मोजन्मी ऋणी राहीन आणि हे ऋण कधीही फिटू नयेत अशी प्रार्थना करीन. कारण त्या ऋणाच्या उपकाराच्या संचितामुळे अनेक जन्म हे पुण्यकारक कर्म हातून होत राहील. त्यानंतर मी समस्त वाचकवर्गाचे आभार मानतो. मला ज्ञात आहे त्याप्रमाणे, अनेक ज्ञात व अज्ञात ग्रुप्सवर ही लेखमाला फिरत आहे. 

मला येणाऱ्या फोनकॉल्स व प्राप्त संदेशांवरून हे लक्षात येतं, की अनेकांना ही मालिका पुस्तकरूपाने हवी आहे. म्हणूनच प्रथम किडल/अमेझॉन वर ई पुस्तकरूपात, भाग १ म्हणून, ती उपलब्ध करून देण्यात आली आणि आता लवकरच छापील स्वरूपात ती उपलब्ध होईल. अनेकांनी नाव  नोंदणी केली आहे,त्यांच्याशी लवकरच संपर्क साधला जाईल. लवकरच त्यासाठीचं बुकिंग पेमेंट स्वीकारायला सुरवात करीन आणि गूगल पे, पेटीएम, बँक ट्रान्सफर इत्यादी सर्व डिटेल्स  देण्यात येतील. लवकरच भाग २ सुद्धा प्रकाशित होईल आणि भाग १ घेतलेल्या सर्वांना त्यात विशेष सवलत देण्यात येईल. आता विषयाकडे वळूया. 

ती शक्ती व त्या त्या भावनेची फाईल ओपन करायची की नाही, याचं नियंत्रण व त्याचा साधनेतील उपयोग या सर्वांवर आज चर्चा करूया. त्याआधी मनाची तुलना अवकाशाशी केल्यानन्तर आपल्या मनाचा पसारा, शक्ती, व्याप्ती आणि अव्यक्तता या सर्वांची कल्पना आली असेल.  त्याचप्रमाणे  विधात्याने ज्याप्रकारे या मनाची निर्मिती केली आणि त्याला इतक्याश्या देहात गुंफून आत्म्याला देहाकडून मूळ इप्सित साध्य करून घेण्याचं उद्देश दिलं.

मुळात आकाशाप्रमाणे, मन हे वाऱ्याने हलतं, डुलतं, डोलतं, झुकतं, पसरतं, अस्ताव्यस्त होतं, गडगडतं, बरसतं, शांत होतं, हरप्रकारे प्रकट होतं. सर्व प्रकारचे ऋतू, इथे मनात भावरूपात अस्तित्वात आहेत. त्या त्या प्रसंगी व कधी स्वेच्छेने प्रकट होतात. म्हणजेच त्यांचं अस्तित्व आतच असतं, पण बाहेरून त्यांना जागं करणारी एखादी घटना घडली की, आत सुक्ष्मरूपात अर्थात मायक्रोपेक्षाही लहान आकारात आणि अप्रकट स्वरूपात असलेले हे भाव आपलं सुक्ष्मरुप सोडून देहाच्या पटलावर वा पडद्यावर अर्थात स्क्रीनवर प्रकट होतात.

म्हणजेच म्हटलं तर ते तसेच सुक्ष्मरूपात आत दडलेले असले तरी तसा फार फरक पडेल असं नाही. पण एखादा प्रसंग, घटना, शब्द, नाद, धून, चेतना, अगदी टिचकीप्रमाणे कार्य करून, निर्गुणरूपात अस्तित्वहीन असलेल्या भावाला सगुणरूपात साकार करतात. म्हणजेच निर्गुणातून सगुणात येणं वा आणणं हे एखाद्या कारकावर अवलंबून आहे, अन्यथा ते अप्रकट स्वरूपात आहेत. 

मग ते दुःख असो, हास्य असो, सुखकारक भाव असोत, वैषम्य, द्वेष, मत्सर, किळस, राग (हलकासा) , क्रोध (आवेगाने व अमर्याद), घृणा, कंटाळा, आळस, शांतता, समाधान, निरवता, निर्मलता, पवित्रता, सात्विकता, ध्यान धारणा इत्यादी सर्व हे निर्गुणरूपात मनाच्या अवकाशात असतातच. 

फक्त एक कारक त्यांना टिचकीने जागं करून प्रकट अर्थात सगुणरूपात देहाच्या पटलावर अश्रू, हसू, राग, लोभ, मोह, मद, मत्सर इत्यादी रुपात प्रकट करतो. म्हणजेच आपण म्हणतो की त्याने मला दुखावलं म्हणून मला राग आला, हे सत्य नाही. तो भाव निर्गुणातून सगुणात त्याने आणला. पण आत तो सुप्तस्वरूपात होताच, सुप्तमानाच्या पातळीवर. फक्त ती फाईल, त्या एखाद्या वाक्यामुळे ओपन झाली इतकंच. पण मग भक्तीभाव, प्रेमभाव, सात्विकता, वैराग्य, विरहवेदना, कोसळून जाणं, उद्विग्न होणं, उत्शृंखल वागणं, शांत व सोशिक असणं या सर्व मनाच्या भावावस्था सगुण झाल्या तरच वर दिसणार अन्यथा त्यांना अस्तित्व नाही. 

मनाच्या याच निर्गुणरूपातील अप्रकट भावांना, प्रकट वा सगुण साकार करणाऱ्या बाह्य घटना, ज्यावेळी कमजोर वा अशक्त केल्या जातात वा होतात, त्यावेळी नको असलेले भाव प्रकट वा सगुणरूपात येणारच नाहीत. यालाच मनाचा सशक्तपणा वा शक्ती वा बल म्हणतात. म्हणजेच नियंत्रणा बाहेर भावांचं सगुणात्मक होणं हे एकप्रकारे मनाची दुर्बलता वा कमजोरी म्हणता येईल. पण मग यातील कोणते भाव सगुण व्हावेत व कोणते निर्गुण राहावेत हे कसं कळणार.

यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. परंतु तोपर्यंत, नामात रहा, मी  सांगितलेल्या सहाही पायऱ्यांचा अभ्यास करा, गुरुवंदन करा, नित्य नाम घ्या, तेच तुम्हाला तारणार आहे. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१०/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...