Skip to main content

भोग आणि ईश्वर ९९

भोग आणि ईश्वर  ९९
 
आपण मागील काही भागात मनात नाम घेऊन ते ऐकण्याचा अभ्यास केला. तिथपर्यंतच्या पायऱ्या जमत असतील वा जमल्या नसतील तर जमतील. त्यामुळे आज आपण त्याच्या पुढच्या पायरीचा विचार करूया. इथपर्यंत आपलं वैखरी नाम आता बंद झालंय. ( हा प्रयोग बाकीचं नित्याचं नाम वा जप सुरू ठेवून करायचा आहे) आपण मनात नाम घेत आहोत. आता हेच नाम आपण पूर्ण मनात जाऊन वा मनाच्या कोषात शिरून घेत आहोत असं समजा.

आता इथे, जर तुमची एकाग्रता पूर्ण साधली गेली, अगदी काही क्षण, तर तुम्हाला बाहेरचा कोणताही आवाज येणार नाही. फक्त तुम्ही आणि नाम. त्या मनात चालू असलेल्या नामाच्या लहरींचा कोष, हळूहळू तुमच्या भोवती गुंफला जातोय. या मनातून आलेल्या लहरी, वैखरीने केलेल्या जपापेक्षाही जास्त परिणामकारक असतात. जसं एखाद्याने मनातून आशीर्वाद दिला किंवा मनातून राग व्यक्त केला तर तो जास्त परिणाम करतो, त्याचप्रमाणे.

कारण जेंव्हा एखादी व्यक्ती कोणतीही भावना व्यक्त करते, तेंव्हा तिचं अस्तित्व त्या व्यक्तीच्या मनातून संपतं. पण जेव्हा एखादी व्यक्ती कोणतीही भावना व्यक्त करत नाही, त्यावेळी त्या भावनेची ऊर्जा शक्तीस्वरूपात मनात साठवलेली असते. मन हे अवकाशासमान आहे. 

अवकाशात ज्याप्रमाणे अगणित जागा, ऊर्जा आणि शक्ती असते आणि आसमंतातील परिस्थितीनुसार, तिला चालना मिळते. त्या चालनेप्रमाणे, त्याचा परिणाम, वातावरण या अदृश्य पण परिणाम करणाऱ्या व करून घेणाऱ्या एका घटकावर होऊन पुढे तो क्षणक्षण बदलणाऱ्या ऋतूंना चालना देतो. 

मनाला निर्माण करताना विधात्याने त्या मनाला अवकाश, वातावरण व ऋतू या तिन्हीना एकत्र करून तयार केलं. त्यामुळे मनात अमर्याद शक्ती, ऊर्जा त्या उर्जेचं रूपांतरण शक्तिमध्ये करणारं वातावरण आणि अवकाशाप्रमाणे बाह्य गोष्टीचा परिणाम होऊन वातावरणातील बदलणाऱ्या ऋतूंप्रमाणे स्वभाव हे सर्व अद्भुतपणे सामावलेलं आहे. विधात्याच्या अस्तित्वाचा याहून मोठा पुरावा देताच येणार नाही. 

आपल्या स्वभावाचे सर्व पैलू, हे आतच अदृश्य स्वरूपात दडून बसलेले असतात. एखादी बाह्य घटना, दुःखद वा सुखद, वाईट वा चांगली हे मन ठरवतं, त्या प्रकारचे भाव व्यक्त करून. कारण अशी कोणतीही घटना हा मनातील त्या अदृश्य आणि कुलूपबंद भावनेचा पासवर्ड वा किल्ली असते. त्या बाह्य घटनेने आतील त्या भावनेची फाईल ओपन होऊन, ते भाव देहाच्या स्क्रीनवर अथवा डॅश बोर्डवर व्यक्त स्वरूपात दिसतात.

आता हे त्या त्या भावनेचे पासवर्ड वा किल्ली त्या त्या भावनेला तेंव्हाच उघडतात जेंव्हा त्या फाईल पर्यंत आपण ते पोचू देतो किंवा त्या फाईलपर्यंत ती किल्ली पोचते. एक उदाहरण घेऊ. खूप वेळा जवळची एखादी व्यक्ती गेलेली असते, त्यावेळी त्या व्यक्तीच्या मागे उरलेल्या साथीदाराला, मग तो वा ती कोणी असो, पती, पत्नी, वडील, मुलगा इत्यादी. पण समोर सदर व्यक्तीच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून कुटुंबाला सावरायचं असल्यामुळे क्वचित वा बरेचवेळा त्या भावनेच्या फाईल्सचा पासवर्ड लपवून ठेवावा लागतो वा त्या फाईल्सपर्यंत पोचू न देण्याचं कसब करावं लागतं. 

कारण डोळ्यासमोर उभं राहणं, आयुष्यात पुढे जाणं, कुटुंबाला उभं करणं हे दिसत असतं. भले अश्या व्यक्ती एकांतात भाव व्यक्त करून मोकळ्या होत असतील, पण त्यामुळे त्या कमजोर न ठरता श्रेष्ठ ठरतात. कारण भाव व्यक्त करणारी फाईल, त्यांनी तेंव्हाच ओपन केली, ज्यावेळी त्यांना ते एकांत मिळाल्यामुळे शक्य झालं. म्हणजे भाव व्यक्त करायची वेळ व त्या भावनेची व्यक्तता परिस्थितीवश जरी असली तरी ती त्यांनी नियंत्रित केली.

म्हणजेच भाव असतात की आपण त्या भावनेची किल्ली तिथपर्यंत पोचू देतो हे तुम्हालाच ठरवायचं आहे. म्हणजे या उदाहरणात तुम्हाला दिसेल की किल्ली तिथपर्यंत जाऊ द्यायची की नाही व ते भाव असलेली फाईल ओपन करून तो भाव देहाच्या स्क्रीनवर येऊ द्यायचा की नाही व ती केंव्हा व्यक्त करायची की व्यक्त करायची नाही, हे तुम्ही ठरवून नियंत्रित करू शकता. हे अतीव दुःखाचं उदाहरण यासाठी घेतलं की त्यामुळे मुद्दा जास्त स्पष्टपणे लक्षात येईल. हेच आनंदासह सर्व भावांना लागू आहे. म्हणूनच बघा तुम्ही काही व्यक्ती या खूप संयत असतात. 

मनाची ऊर्जा, त्या उर्जेला नियंत्रित करून  त्या नियंत्रणात्मक शक्तीचा उपयोग आपण अत्युच्च लहरी निर्माण करण्यासाठी करू शकतो. हा अंदाज वा ती नियंत्रणाची शक्ती तेंव्हाच येईल, जेंव्हा मनाला तशी सवय लावली जाईल. 

सर्व वेद शास्त्र, स्तोत्र, मंत्र, तंत्र, अध्यात्म, पूजा, व्रतवैकल्य इत्यादी सर्व, त्या मनाला त्या ऊर्जेची, त्या शक्तीची आणि त्या शक्तीच्या परिणामांची जाणीव व्हावी आणि ती जाणीव सदोदित जागृत ठेवून फक्त आणि फक्त सकारात्मक भाव मनातून निर्माण करून, त्या लहरी, त्या वातावरणात प्रसारित कराव्या, यासाठी सर्व आहे. या सहा पायऱ्या नीट अभ्यासाने व प्रयासाने केल्यास त्या शक्तीची जाणीव जागृत होईल. 

ती शक्ती व त्या त्या भावनेची फाईल ओपन करायची की नाही, याचं नियंत्रण व त्याचा साधनेतील उपयोग या सर्वांवर उद्या चर्चा करूया. 

परंतु नामात रहा, मी  सांगितलेल्या सहाही पायऱ्यांचा अभ्यास करा, गुरुवंदन करा, नित्य नाम घ्या, तेच तुम्हाला तारणार आहे. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०९/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...