Skip to main content

गीत विश्लेषण : विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशले

गीत विश्लेषण : विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशले  

रचना – संत ज्ञानेश्वर
संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर – लता मंगेशकर

विश्वाचे आर्त माझे मनीं प्रकाशले ।
अवघेचि जालें देह ब्रह्म ॥१॥

आवडीचें वालभ माझेनि कोंदाटलें ।
नवल देखिलें नभाकार गे माये ॥२॥

बाप रखुमादेवीवरू सहज नीटु जाला ।
हृदयीं नीटावला ब्रह्माकारें ॥३॥

ज्ञानोबा माऊलींचा विलक्षण आणि गहन अर्थ असलेला हा अभंग आज विचारार्थ घेतलाय. माऊलींची आर्तता, उमाळा त्यांनी मोजक्या आणि सार्थ शब्दात मांडली आहे. आपण त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. 
माऊली म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्णाचा कलियुगातील अवतार. 

माऊलींचा काळ म्हणजे ज्ञानाचा सागर काही मोजक्या हातात बद्ध होऊन कुंठित झालेला. अवघ्या विश्वाचा आधार , चेतना, प्रेरणा, शक्ती, बुद्धी, तेज, ओज जे भगवंतांनी स्वमुखे अर्जुनाला सांगितलं, ते गीतेतील अमूल्य,  विश्वात्मक ज्ञान, वेदव्यासांकरवी विश्वासाठी खुलं करून दिलेलं. कल्पना अशी होती की,हे हस्ते परहस्ते पुढे पुढे जात भोग भोगत, दुःखात, अज्ञानात आणि अज्ञानाच्या अंधःकारात पिचत असलेल्या सामान्य जनांसाठी खुलं करून दिलं जाईल आणि त्यायोगे त्या सकल सामान्य जनांचा उद्धार मार्ग , त्यांना ज्ञात होईल. 

पण नुसतं ज्ञात होऊन उपयोगाचं नव्हतं, तर त्याची जाणीव होणं महत्वाचं होतं. ती जाणीव जागृत होणं, हे आयुष्यात खूप महत्वाचं आहे. त्याचसाठी भगवंतांनी मानवी देह धारण करून, अशक्य असे भोग भोगले. कदाचित त्या भोगांची, त्या तापांची कल्पनासुद्धा आपण आजच्या काळात करू शकणार नाही. 

इतके अद्भुत आणि विलक्षण भोग भोगूनही, ज्या समाजाने ते भोग दिले, ज्या वेदना दिल्या, त्या ब्रह्मवृंदांबद्दल व समाजाबद्दल चकार शब्द वा राग वा क्रोध वा व्यक्त न करता, त्या वेदनेतून जागी झालेली जाणीव म्हणजे जर मी उच्च जमातीतील असून इतका ताप, भोग, दैन्य, वेदना व अवमान हे माझ्या वाट्याला येऊ शकतं, तर ज्यांना युगानुयुगे फक्त अवहेलना, यातना, भोग हेच मिळालं, त्यांची अवस्था भवसागरात काय असेल. त्यासाठी कदाचित हा जन्म असेल.

या जाणिवेची जाग आली आणि माऊलीं वदल्या की, या विश्वातील वेदनांची आर्तता, त्या वेदनांची करुणा, सहानुभूती संवेदना, कळकळ, तळमळ माझ्या या अंतरात जागी झाली. अर्थात ती अस्तित्वात होती पण मला त्याची जाणीव नव्हती. ती जाणीव झाली म्हणजेच त्या वेदनेची तळमळ मला जाणवली आणि मनात लक्ख्ख प्रकाश पडला की, हा जन्म का झाला . या प्रकाशात अवघा देह उजळून निघाला आणि देहाच्या अस्तित्वाचं कारण समजलं. त्यालाच माऊली देहब्रम्ह असं म्हणतात.

म्हणजे हा देह ब्रम्हाने अर्थात सृष्टीकर्त्याने का दिला आणि या जगतात का धाडलं ही उमगलं,  त्याबद्दलची जागृती झाली. आजपर्यंत मी माझ्या स्व मधेच इतका गुंतलो होतो की, दुसऱ्या कशाचही भान नव्हतं. आवडीचे वालभ म्हणजे समस्यांमध्ये, माझ्या मनातील माझ्या दुःखाच्या वेदनांमध्ये, ज्या माझ्या स्वतःच्या असल्यामुळे मी त्यांनाच कवटाळून होतो. त्या वेदनाच मला सुखकर वाटत होत्या. 

कधी कधी असं होतं, जास्त भोग, वेदना, दुःख भोगणारे त्या कोशात स्वतःला बंद करून घेतात आणि ठराविक काळानंतर त्या वेदना, ते दुःख, ते भोग हेच आपलं विश्व आहे, असं त्यांना वाटायला लागतं. त्यानंतर माझ्या दुःखापुढे जगाचं दुःख काहीच नाही, असं वाटून माणूस त्या वेदनेत सुखावतो की, माझ्याइतका दुःखी कुणी नाही. ती वेदना हाच त्या व्यक्तीचा अहंकार होतो. त्याच वेदनेच्या सुखाचा फुगा फुटून, मला विश्वातील इतर दुःखितांच्या दुःखाचा, भयाण चेहरा दिसला आणि जाणीव झाली की, या साठी मला कदाचित पाठवण्यात आलं असावं.

या नवीन नवल जाणीवेने मी स्वप्रकाशीत झालो आणि त्या आत्मप्रकाशाची नभाकार प्रभा समोर दिसली आणि दृष्टी नभाप्रमाणे विशाल झाली. अमर्याद आत्मशक्तीचा मला प्रत्यय आला. त्या सर्वसाक्षी बाप रखुमाईवर, पांडुरंगाच्या कृपेने, जे अंधुकसुद्धा कधी दिसलं नव्हतं त्या जाणिवेची आत्मज्योत हृदयात प्रकटली, प्रकाशित झाली आणि हृदयात त्या आत्म प्रकाशाने जीवनाचं उद्दिष्ट समोर ब्रह्मरूप होऊन स्पष्ट झालं. 

माऊलीच्या या स्वप्रकाशाची, आत्मज्योतीची, जाणीव जागृत झालेली रचना तितक्याच अद्भुत चालीत हृदयनाथजींनी बांधली आणि आपल्या स्वर्गीय स्वरात लतादीदींनी ती कानातून थेट हृदयात आत्म्यापर्यंत पोचवली आहे.

बाकी यावर अधिक काही लिहिण्यापेक्षा, हा अर्थ नजरेसमोर ठेवून , या अलौकिक अभंगाचा आनंद स्वतः घ्यावा. 

©® संकल्पना, विचार आणि लेखन : प्रसन्न आठवले
१३/०३/२०२१
१८:५०

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...