Skip to main content

भोग आणि ईश्वर ९४

भोग आणि ईश्वर  ९४
 
आपल्याच नामाचा नाद ऐकण्याचा प्रयत्न हळूहळू करत, एका क्षणाला, आपण त्यात नक्की एकाग्र होण्यात यशस्वी होतो. त्यानंतर त्या नादात हरवून जायला शिकायचं. आपणच म्हणतोय, आपणच ऐकतोय. काही काळ याप्रकारे साध्य केल्यानंतर आपल्या नामाच्या नादाचा छंद मनाला आवडायला लागतो. मन हळूहळू त्यात हरवून गुंग होतं. कधी कधी यात श्वासाचा आवाजही येतो. पण जसजसं आपण शांत होत जाऊ तसतसा श्वासही हलके हलके येतो आणि फक्त नामाचा नाद ऐकू येतो. तो आवाज आतून येतो आहे हे जाणवेल. त्या जाणिवेपर्यंत जायचं आहे. 

मनाला त्या बिंदूवर एकाग्र होण्याची सवय लागते. याला काही दिवस लागतात, कदाचित एखाद्याला कमी दिवस एखाद्याला जास्त दिवस लागू शकतात. पण नेट आणि चिकाटी सोडायची नाही आणि जमत नाही असं वाटलं तरी प्रयत्न सोडायचे नाहीत. कारण व्यक्तिपरत्वे मनाची लवचिकता कमी अधिक असू शकते आणि हे बसल्या जागी करायचं असल्यामुळे, याला फक्त वेळ द्यायचा आहे, बाकी काही शारीरिक श्रम नाहीत. मात्र मनाला श्रम आहेत, पण ते प्रयत्नाने साधू शकेल. 

या नादात हरवून जाण्याची मात्रा, एकदा लागू पडली की, त्याचा कालावधी हळूहळू वाढवत न्यायचा. म्हणजे काही क्षण ते काही मिनिटं अश्या पद्धतीने. नन्तर याची एकदा गोडी लागली की, नाम घेतानाचा आवाज थोडाथोडा खाली न्यायचा, पण हळूहळू, प्रयत्नपूर्वक. इथे काही काळाच्या प्रयत्नामुळे साध्य झालेली मनाची गुंतवणूक कामी येते आणि  ध्वनी हळूहळू कमी करत जाऊन, त्याचाही नाद मनाला स्पष्ट ऐकू येतो,हे लक्षात येईल. अंतर्मुख होण्याच्या प्रयत्नातील ही दुसरी पायरी आहे. 

पण पहिली पायरी आपण यशस्वीपणे गाठली, याची खात्री झाल्यावरच, दुसऱ्या पायरीकडे वळावे. आता याची खात्री करण्याचं निश्चित असं परिमाण आहे का. तर ते एकच आहे. आपला वैखरीतील जप, आपण डोळे बंद करून, कानांनी ऐकण्याचा प्रयत्न करत असताना, मन तिथे एकाग्र झालेलं जाणवेल. क्षणमात्र पासून काही मिनिटं इथपर्यंतचा प्रवास झाल्यानंतर, त्या मिनिटांचा व त्या मिनिटातील नादाचा आनंद घेण्यातील सुख मनाला जाणवेल आणि मग मनच आपोआप तुम्हाला यापुढील पायरीसाठी पुढे नेईल. 

ही स्थिती येण्यासाठी अभ्यास आणि मनाचा निग्रह कामी येतो. पण कुठेही जबरदस्ती करून उपयोग नाही. मनाशी संवाद साधत त्याला याकडे वळवणं गरजेचं आहे आणि ते वृत्तीनुसार कमी अधिक काळात जमतं. का, तर आपण मानव आहोत आणि मानवालाच या नियंत्रणाची गुरुकिल्ली दिली आहे, ती म्हणजे आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती. या दोन गोष्टी योजून पुढे गेल्यास प्रथम पायरी साध्य होईल.  जिथे आपल्याच नामाच्या नादात, मन गुंग होऊन जाईल, वृत्ती स्थिरावतील आणि मनच तुम्हाला पुढे जाण्यास साहाय्य करेल. 

दुसऱ्या पायरीवर येताना वा आल्यावरसुद्धा, कोणतीही जोर जबरदस्ती उपयोगाची नाही. मन हा आपला सच्चा सखा वा मित्र आहे, हा भाव नित्य जागृत असणं आवश्यक आहे. त्यामुळे त्याला त्या पद्धतीने सन्मानित करत, संवाद साधला की, ते सोबत येणारच हे नक्की. दुसऱ्या पायरीवर काही काळ वैखरीत चालू असलेल्या जपाचा ध्वनी हळूहळू कमी कमी करत आपण त्यावर एकाग्र होण्याचा प्रयत्न करावा. 

पहिली पायरी जमली की, या पायरीवर मनाची साथ ही मिळत जाईल आणि जाणीवपूर्वक व प्रयत्नाने आपला ध्वनी कमी होत असल्याचं जाणवेल. यासाठी मन गळ्याजवळ स्वरयंत्रावर अथवा वाणीवर अर्थात आवाजावर एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा.  

वरील दोन प्रयोग पायरी पायरीने, पण हळुवारपणे करण्याचा प्रयत्न करा,जाणवेल की जमतंय आणि क्षणमात्र ते काही मिनिटं हा प्रवास जमेल. पुढे काय हे उद्याच्या भागात बघूया. पण हा प्रयोग आपले नित्य नाम करून मगच करावं, म्हणजे न जमल्यास मनात खेद राहणार नाही, कारण आपण नित्यनाम घेऊन मग या प्रयोगाचा प्रयत्न करतोय याची आपल्यालाच जाणीव असेल.

उद्या पुढे जाऊ, पण तोपर्यंत नामात रहा, नित्य नाम घ्या, तेच तुम्हाला तारणार आहे. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०४/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...