Skip to main content

भोग आणि ईश्वर १०५

भोग आणि ईश्वर  १०५
 
कालच्या चर्चेतून हे लक्षात येईल की अनेक संत, महंत, महान आत्मे, सत्पुरुष, साधू, संन्यासी, अगदी अवतारी पुरुष यांनीसुद्धा सद्गुरू चरणातूनच अध्यात्मिक अधिकार, मुक्ती, मोक्ष इत्यादी सर्व प्राप्ती केली. म्हणजेच अध्यात्मिक उन्नती, साधनेत अत्युच्च प्रगती, गती हे सर्व गुरुकृपेचे फलित आहे. 

श्रीकृष्णाने मुक्ती, मोक्ष याचे मुख्य मार्ग कर्म, ज्ञान व भक्ती हे गीतेत सांगितले आहेत. अर्थात या तिन्हींमध्ये अर्पण वा समर्पण किंवा शरणागती हा सर्वश्रेष्ठ आचार सांगितला आहे. कारण काही न जमल्यास मामेकम् शरणं व्रज. म्हणजेच मला शरण ये आणि मला शरण आल्यास बाकी योगक्षेम मी वाहीन. म्हणजेच तुझा भार मी वाहीन. 

अर्थातच इथे भार वाहीन म्हणजे भौतिक जगतातील नसून अध्यात्मिक, मुक्ती व मोक्ष या वाटचालीतील तुझा भार, तुझ्या अडचणी, त्यातील अडथळे हे मी पाहीन. पण शरणागती म्हणजे कुठेतरी त्या परम आत्म्याला श्रेष्ठ कल्पून चरण धरणे व शरण जाणे म्हणजे एकप्रकारे गुरुच मानणे क्रमप्राप्त आहे. 

गुरुपौर्णिमा ज्यांच्या नावाने साजरी केली जाते ते महर्षी श्रीवेदव्यास यांचा एकदा विचार करू. भूमितीच्या दृष्टीने सर्व विश्व वा ब्रह्मांड हे वर्तुळाकार आहे. त्याचा व्यास म्हणजे श्रीवेदव्यास महर्षी आणि त्या व्यासाचा मध्य अर्थात वर्तुळाच्या परिघापासूनची केंद्रापर्यंतची लांबी म्हणजे त्रिज्या. अर्थात त्याचा केंद्रक व्यास किंवा गुरुतत्व. 

स्वतः महर्षी श्रीवेदव्यास हे विष्णुरुप मानले जातात.  म्हणजेच या ब्रह्मांडातून आत्म्याला मुक्तीचा मार्ग हा केंद्रकातून अर्थात गुरुत्वातूनच जातो. स्वयंभू व सर्वसाक्षी ईश्वरसुद्धा मानवी देहात आल्यावर गुरुकृपेला पात्र होऊन मगच मुक्त होऊ शकतो, तर आपण सर्वसामान्य जीव आहोत.

आता या प्रदीर्घ दोन भागातील विवेचनातून एक स्पष्ट होतं की गुरुशिवाय या मर्त्य जगतातून मुक्तीचा मार्ग अन्य दुसरा नाही. किंवा स्वतः जरी, स्वयंप्रेरणेने,  परमेश्वर भक्ती केली तरीही त्याच ईश्वराला, ज्याची आपण साधना करत आहोत,शरण जाऊनच ध्येय, इप्सित वा उद्देश साध्य होऊ शकतं. अर्थात जे साधन वा नाम वा जप करत आहोत, त्याच नामाच्या देवतेला गुरुस्थानी मानून, त्यांना संपूर्ण शरण जाऊन साधना करण्यात हित आहे. कारण गुरू हेच माध्यम आहे, अध्यात्मात वा भक्तिमार्गात उन्नत होण्याचा. 

अर्थात जरी लौकिक अर्थाने अश्या साधकांनी गुरू केला नसेल व स्वयंप्रेरणेने जप सुरू केला असेल, तरी त्याच जपाच्या वा नामाच्या देवतेला मनात संकल्प करून, गुरुस्थानी मानून, मग नित्य जाप करणे हे इष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गुरू कल्पून साधना करताना आपल्याला माया पाशात बद्ध करू शकत नाही. कारण भक्तीत समर्पण हे मायेच्या बांधनांना व पाशांना तोडू शकतं. 

तिसरं म्हणजे समर्पणाने वा शरणागतीने अहं जाळला जातो वा नष्ट होतो. भक्तिमार्गात अहं जाळून पुढे जाणं, खूप महत्वाचं आहे. अन्यथा केलेलं सर्व साधन व्यर्थ आहे. यासाठीच भगवंतानी श्रीवेदव्यास व श्रीदत्तात्रेय यांसह अनेक रुपात गुरुतत्वाची निर्मिती करून, बद्ध जीवांना मुक्त करण्याचा मार्ग उघडून दिला.  म्हणून प्रत्यक्ष गुरू न केल्यास आपले साधन व त्या साधनेचा आत्मा अर्थात नाम हेच गुरू कल्पून, त्यास संकल्परुपाने शरण जाणे क्रमप्राप्त आहे. किंवा मुक्तीचा, उन्नतीचा, प्रगतीचा तोच एक मूलमंत्र आहे. 

बहुतेक आजच्या चर्चेतून, एका प्रातिनिधिक प्रश्नावर आपण 
योग्य, सकारात्मक आणि पूर्ण चर्चा केली. उद्याच्या भागात पुन्हा भेटूच. पण तोपर्यंत  गुरुवंदन करा, नित्य नाम घ्या, तेच तुम्हाला तारणार आहे. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१५/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...