भोग आणि ईश्वर १०६
थोडंस कालच्या मुद्द्यावर. एक मत असं आलं की, गुरू करायचा नसतो, तर गुरूंनी शिष्य म्हणून तुम्हाला स्वीकारावं लागतं. यावर माझं मत मी विस्ताराने मांडतो. मुळात शास्त्रा प्रमाणे हा मुद्दा योग्य असला, तरीही काळाच्या कसोटीवर तो घासून व पडताळून पाहणं गरजेचं आहे. याचं महत्वाचं कारण असं की, धर्म आणि शास्त्र यांच्या मूळ चौकटी जरी कायमस्वरूपी असल्यातरी, काळानुरूप त्यात आवश्यक बदल होत जातात किंवा करावे लागतात. तरच धर्म प्रवाही राहून काळाच्या ओघात टिकू शकतो.
जसं युद्ध व राजनीतीमध्ये श्रीराम व श्रीकृष्ण यांनी काळा प्रमाणे अपेक्षित बदल, नीतीमध्ये आणि प्रत्यक्ष अंमल बजावणी मध्ये केले. जे त्यांच्या व्यक्तित्वातील भेददेखील स्पष्ट करतात. भगवंतानी सहावा अवतार भगवान परशुराम हा धारण करून, त्यावेळी आपला मूळ उद्देश विसरलेल्या क्षत्रियांना, दंडीत केलं. पण पुढील दोन अवतार क्षत्रिय धारण केले. कारण त्यावेळी असलेल्या राक्षस व कूट शत्रूंना भेदण्या साठी व वधण्यासाठी क्षत्रियत्व धारण करणं, ही काळाची गरज होती.
आता विषयासंदर्भात बोलताना असं म्हणता येईल की, सद्गुरू करणं नाही तर, प्राप्त होणं हे शास्त्राला अपेक्षित आहे. पण श्रीअवधुत अवतारी श्रीदत्तगुरूंनी चोवीस गुरू केल्याचा उल्लेख श्रीगुरुचरित्रात आहे. म्हणजे त्यांनी आपल्या मनाने, त्या त्या व्यक्तित्वाकडून काही शिकताना वा आत्मसात करताना त्यांना गुरुपदाचा दर्जा दिला. अर्थात हे शिक्षण वा ज्ञानग्रहण या संदर्भात येतं हे पूर्ण मान्य. तरीही गुरू ज्ञानप्राप्तीसाठी व मोक्षप्राप्तीसाठी, यात भेद करणं गैर आहे.
विषयाची आसक्ती सुटून मन निर्विषय होऊन सन्मार्गी लागण्यासाठी काही लक्ष गरजेचं आहे. त्या लक्षाच्या प्राप्तीसाठी काही कर्म, काही ज्ञान व काही साधना निश्चित जरुरी आहे, यात दुमत असू शकत नाही. विद्याप्राप्ती ही सहसा लौकिक वा व्यावहारीक अर्थाने वापरली जाते. पण ज्ञानप्राप्ती ही संज्ञा अध्यात्मिक वा पारमार्थिक संदर्भात, सहसा वापरली जाते. या ज्ञानाची आस आणि मनाला एका लक्ष्यावर स्थिर करून त्याला साधना मार्गात वळवणं आणि त्याला त्या मार्गाची गोडी लावणं, हे अत्यंत कठीण वा अशक्यप्राय आहे, तेही आताच्या मोह, माया, लोभ, इत्यादी वाढत असतानाच्या काळात.
मूलतः आजचे प्रश्न, समस्या, प्रलोभनं यांचा वाढता आलेख असताना व तो लक्षात घेता, मनाची स्थिरता राखणं आणि साधना करणं व करत असलेली साधना टिकवणं हे कर्म कठीण आहे आणि अजून कठीण होत जाणार. यासाठी मनाला बांधून ठेवणारा काही मार्ग असेल तर तो समर्पणभाव वा शरणागती हाच आहे. म्हणून या शरणागतीसाठी योग्य व्यक्तित्व काळाच्या ओघात दुर्मिळ होत जातं आहेत. म्हणून जे सत्पुरुष वा संतमहात्मे होऊन गेले आणि ज्यांनी आपलं जीवन सिद्ध केलं अश्यांना आदर्श मानून, त्यांना गुरुस्थानी कल्पून आपण निश्चीन्त मनाने साधना करणं, अत्यंत नैसर्गिक आहे आणि मनाचा समतोल राखण्यासाठी गरजेचं आहे.
याशिवाय, जे सत्पुरुष सद्यकाळात, देहरूपात नाहीत, पण त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे सामान्य माणसांना, ते गुरुस्थानी वाटतात, यात काही गैर आहे, असं व्यक्तिशः मला वाटत नाही. किंबहुना मनाची स्थिरता हा धर्मशास्त्र, अध्यात्म, परमार्थ, साधना, नामस्मरण आणि एकूणच मोक्षमार्गाचा पाया, गुह्य व गर्भ आहे. दुसरं त्यांचं चैतन्यरुप अस्तित्व आजही आहेच. कित्येकांना त्याचा प्रत्यय वा प्रचिती येते असा अनुभव आहे. पण त्यांच्या पात्रतेला पोचण्यासाठी मला स्वतःला सक्षम बनवणं गरजेचं आहे, याची जाण झाली की, त्या मार्गाला मी स्वतःहून जातो वा जाऊ शकतो.
ही माझ्याकडून त्यांच्या चरणी केलेली शरणागती वा समर्पण आहे आणि समर्पण हा भक्तिमार्गाचा आत्मा आहे. यात मी त्यांना आत्मरूपाने, मनाने व देहरूपाने त्यांना, स्व, अहं अर्पण केलं आहे. यात मी त्यांच्या चरणी याचक म्हणून जातो, हा भाव प्रत्येक साधकाच्या मनात असतो वा असणं जरुरी आहे. त्यात मला स्वीकृत करायचं की नाही हे ते ठरवतील. पण मला अध्यात्म मार्गात जाण्याचा अधिकार आहेच हे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी लिहून ठेवलं आहे की,
राजहंसाचे चालणे ll जगी झालिया शहाणे ll
म्हणुनी काय कवणे ll चालुची नये
या चरणाप्रमाणे अध्यात्मिक वाट जोखण्याचा अधिकार सर्वांना आहे. कारण माऊलींना अभिप्रेत असलेलं चालणं हे देहाचं चालणं नसून अध्यात्मिक मार्गावर स्वतःला उन्नत करण्यासाठीचं चालणं अपेक्षित आहे. तो प्रत्येक जीवाचा, अर्थात देहधारी जीवाचा अधिकार आहे आणि त्यासाठी भक्ती, साधना व सद्गुरुशरण हा धर्म आहे, चार पुरुषार्थां पैकी एक.
अर्थात गुरूंनी स्वीकृती द्यायची की नाही हे सर्वस्वी माझ्या पुण्याईवर आहे, जी मला संमार्गी व नाममार्गी होऊन कमवता येते. ती कदाचित एकाच जन्मात मिळेल असं नाही. पण प्रयत्नशील राहणं, माझं कर्तव्य आहे आणि त्यासाठी सद्गुरु शरण मनात संकल्पून पुढे जात राहणं हे कर्तव्य आहे. यामध्ये, मी शरण जाणं इतकंच माझ्या हाती आहे, पण ती शरणागती स्वीकारणं सद्गुरुच ठरवतील.
मला जे योग्य वाटलं ते मांडण्याचा हा प्रयत्न. अंती सर्व सद्गुरू समर्पित. तेच योग्य व अयोग्य काय हे ठरवतील. पण मार्गात राहणं माझ्या हाती आहे आणि त्यासाठीची प्रेरणा, चैतन्य व शक्ती सद्गुरू आहेत.
आज इथेच थांबू. छापील पुस्तकसंदर्भात अंतिम तपशील उद्या देणार आहे. ज्यामध्ये पुस्तकाची किंमत, प्रकाशन व उपलब्धता कधी आणि पेमेंट बद्दल तपशील व लिंक दिली जाईल. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर भोग व ईश्वर भाग १ वाचकांना मिळण्यास सुरवात होईल. बाकी तपशील उद्या.
उद्याच्या भागात पुन्हा भेटूच. पण तोपर्यंत गुरुवंदन करा, नित्य नाम घ्या, तेच तुम्हाला तारणार आहे.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१६/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment