Skip to main content

भोग आणि ईश्वर ११७

भोग आणि ईश्वर  ११७
 
परवाच्या आमी कालच्या विवेचनात एक लक्षात येईल की, प्रत्येक गोष्ट,घटना अगदी क्षण क्षण जे घडतं, त्यामागे, आपल्याच, मागील विचारांची प्रेरणा वा कर्मफलाची शक्ती कार्यरत असते. म्हणजेच अगदी क्षणक्षण आपण स्वतः केलेल्या कर्माने प्रेरित असतो. पण मग विचार येतो की,काळ आणि ईश्वर यांची सत्ता असते कुठे, जर माझ्या आयुष्यात घडणारं सर्व मीच ठरवतो. 

इथे पुन्हा गीतेतील एका चरणाचा विचार करावा लागेल. आपल्या प्रत्येक कर्मावर आपली सत्ता आहे अर्थात सत्ता म्हणजे कर्म करण्याची वा न करण्याची मुभा. पण त्यातून निर्माण होणाऱ्या फलावर आपला अधिकार नाही. अर्थात ते फल जरी आपल्यालाच प्राप्त होऊन आपल्यालाच भोगावं लागणार असेल तरी त्या फलाचा पक्व होण्याच्या क्रियेवर आपलं नियंत्रण नाही. त्याची वेळ आपण कर्म करताना निश्चित केलेली आहे.

म्हणजेच जर एखाद्याचं सहेतुक वाईट केलं, अगदी नुसती मनात तसा विचार जरी आला, तरी त्या घडलेल्या कर्माचं फल तुम्हालाच प्राप्त होणार आहे. कारण आपण काया वाचा व मन तिन्ही मार्गांनी कर्मरत असतो. पण मग ही अशी कर्म कधी पक्व होऊन फलप्राप्ती होते. याचं निश्चित कोष्टक विधातासुद्धा सांगू शकणार नाही. कारण ते काळाहाती सोपवलेलं आहे. पण सर्वसाधारणपणे असा अंदाज करता येईल की, जोपर्यंत आपला पुण्यकाळ अथवा पुण्याईची थकबाकी शिल्लक असते तोपर्यंत अश्या नकारात्मक फलाचा येण्याचा मार्ग प्रशस्त नसतो. 

म्हणूनच सहसा त्या पुण्यकाळात आपल्याला नकारात्मक गोष्टींचा त्रास जाणवत नाही, किंवा त्याचा परिणाम हा एकतर 
 कमी होतो किंवा क्वचित नष्ट होतो. म्हणजेच आपल्याला निश्चितपणे काही चुकीची वा अनिष्ट कर्मफलं त्या काळात जाणवत नाहीत आणि जाणवली तरी परिणाम फार लक्षात येत नाही. एकप्रकारे आपल्याच पुण्यकारक कर्माचं कवच आपण स्वतःभोवती विणलेलं असतं. याच कारणाने ज्यावेळी असा काळ संपतो किंवा चांगल्या कर्माचं फलित भोगून होतं, त्या नंतर बरेचदा संकटं एकत्र येतात. अर्थातच ती संकटं नसून आपल्याच चुकीच्या, अनिष्ट कर्मांची परिपक्व फळं आहेत. 

याच काळात आपण वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करून त्या संकटांपासून वा भोगांपासून पळण्याचा प्रयत्न करतो. पण कर्माच्या सिद्धांतानुसार आलेलं फल चांगलं किंवा वाईट, मान्य असो वा मान्य नसो, भोगूनच संपवावं लागतं. आपण अश्या काळात हमखास चुकीचे विचार आणि मार्ग यांचा अवलंब करतो. जसं, कोणीतरी माझ्या वाईटावर आहे, कोणीतरी काहीतरी मुद्दाम करतय इत्यादी इत्यादी. मग अनेक मार्ग जसे गंडेदोरे, इत्यादी चुकीचे मार्ग अवलंबले जातात, ज्याची आवश्यकता नसते.

आवश्यकता असते कर्मगती सुधारून, मनात नित्य क्षमा याचना करून, सद्गुरूचरणी स्थिर राहून आणि आपल्या नित्य साधनेत राहून मनावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. संकटांना तोंड द्यावं, भोग भोगण्याची मानसिक तयारी करावी, श्रद्धा दृढ ठेवून साधनेत राहावं. मुळात एक गोष्ट ध्यानात घ्या तुमच्या कर्माच्या खात्यात काही पुण्यसंचय नसेल तर कोणी काही करू शकणार नाही.

त्यातून वाचण्याचा मार्ग म्हणजे संचित सुधारून, चांगली सकारात्मक कर्म करून, नित्य गुरुचरणांशी प्रार्थना करून स्थिरबुद्धी राहणं. कारण अश्या काळातून तुमचा दृढ विश्वास, श्रद्धा, कर्मातील सुधारणा (म्हणजे काया वाचा आणि मन तिन्ही दृष्टीने सकारात्मक बदल), नामस्मरण साधना करत राहून गुरुकृपेचे पाईक होण्याचा प्रयत्न करावा. 

कारण अश्या काळातून आणि भोगातून फक्त गुरुकृपा आणि ईश्वरकृपा आपल्याला तारू शकते. पण त्यासाठी आपण स्वतःला पात्र करण्यासाठी चांगल्या व वाईट दोन्ही काळात समान साधना करणं, मन वाचा व काया यावर सतत लक्ष ठेवून नकारात्मक वाईट व चुकीची कर्म टाळण्याचा प्रयत्न करणं, हा मार्ग धरून त्यावर स्थिर राहून पात्रता वाढवणं. 

म्हणूनच फार पूर्वीपासून म्हटलं जातं, कर भला तो हो भला. कोणतं चांगलं कर्म कधी कुठे उपयोगाला येईल हे ईश्वरसुद्धा सांगू शकणार नाही. म्हणून नित्य नामात रहा, याचप्रमाणे गुरु चरणी स्थिर रहा त्यातूनच पुढील गती मिळत जाईल. 

भोग आणि ईश्वर भाग १ या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे. शंभराच्यावर पुस्तकांची नोंदणी झाली आहे.बाकी तपशिलासाठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२७/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...