भोग आणि ईश्वर १०७
आपण खूपवेळा असं वाचतो किंवा म्हणतोसुद्धा की, सद्गुरू वा पुण्यात्मे हे चैतन्यशक्तीच्या रुपात वावरत असतात. मुळात याचा अर्थ समजावून घेऊ. मूळ आत्मा हा परम आत्म्या पासून अंशरूपात या ब्रह्मांडात येऊन पंचमहाभूतरुप देह धारण करून जगाच्या, संसाराच्या जंजाळात गुंतला वा ओढला जातो. जसजसे त्यावर या मर्त्यलोकातील संस्कार होत जातात, मायेचे पाश पडत जातात, विचार, विकार आणि आचार यांनी तो दूषित होत जातो, तसतशी आत्म्याची शुद्धता ही कमीकमी होत जाते.
त्याच श्रेणीनुसार वा पायरीनुसार आत्मा आपली शक्ती गमावून बसतो आणि शुद्ध स्वरूपात परमात्म्याने ब्रह्मांडात घडलेला हा आत्मा शरीर, मन व बुद्धी यांच्या व्यापारातून आणि या तिघांनी केलेल्या कर्मफलाच्या साखळीत अडकत जातो व सुरू होतो जन्मजन्मांची शृंखला. हीच शुंखला जीवाला अनंत यातना, भोग, पाप व दुष्ट कर्माची फळं भोगायला भाग पाडतो. आपण या जन्मात अनंत जन्मांची फळं भोग वा उपभोग या रुपात ग्रहण करतो.
त्यामुळे मुळात सुखात व दुःखात हे लक्षात ठेवलच पाहिजे की, हे आपण आपल्याच कर्माचं फलित ग्रहण करतो आहोत. सुखात चांगल्या कर्माची फळं आणि दुःखात आपल्या कुकर्माची, चुकांची, वासनेच्या मोहाच्या मायेच्या प्रभावात केलेल्या अनेक कर्मांची ही शिक्षा किंवा बक्षिसी आहे. म्हणून बक्षिसी घेताना हे ध्यानात धरलं पाहिजे की, कोणत्याही बक्षिसीने आपली जबाबदारी वाढते आणि शिक्षेने आत्म्याचं तेज उजळून निघतं. पण ते उजळून निघालेलं तेज, आपल्या हातून पुनः पुनः होत असलेल्या अगणित कर्मानी झाकोळलं जातं.
आपण घरात देवासमोर लावत असलेल्या दिव्याभोवती खूपदा काच लावून, दिव्याला वाऱ्यापासून संरक्षण देतो. विशेषतः नवरात्रात ज्यांच्याकडे अखंड नंदादीप आहे, त्यांना हे माहीत असेल. त्या काचेला काही दिवसानंतर काजळी जमा होते. किंवा घरात दुधाच्या पातेलीला, जास्त काळ आंच दिल्यास, दूध करपून काजळी जमते. अश्यावेळी ती काच किंवा ते पातेलं साफ करून मग पुनः वापरासाठी घेतलं जातं.
याचप्रमाणे, आपण क्षणोक्षणी करत असलेल्या कर्मातून निर्माण होणारी काजळी, आत्म्याला किती अशुद्ध करत असेल, याचा विचार करा. त्यात अजून एक गोष्ट लक्षात घ्या की, कर्म करणारा देह वेगळाही असू शकतो. पण भोग भोगणारा देह वेगळा असू शकेल. कारण असेही लोकं माझ्या पाहण्यात आहेत जे या जन्मी सदवर्तनी, पापभिरू आणि कोणालाही न दुखावलेले असूनही, अनेक वर्षे भोगातून जात आहेत. म्हणजेच आता या जन्मात, आज याठिकाणी, हे समजल्यावर, आपली स्वतःची देह म्हणून आणि मन व बुद्धी यांची जबाबदारी कितीपट आहे, याची जाण आली असेल.
या जाणिवेतून जर आत्म्याच्या शुद्धीचे प्रयत्न केले तरच आपण पुढील जन्मांसाठी, चांगल्या कर्माची, काही मिळकत, आत्म्यासोबत पुढे पाठवू शकतो. याचसाठी शास्त्र, वेद पुराणं, ऋषीमुनी, संत महात्मे यांनी चित्तशुद्धी आणि आत्मशुद्धीचे मार्ग सांगितले आहेत. परंतु या सर्वात जर शुद्धी होऊनही आणि पुन्हा पुन्हा काजळी धरत राहिली तर, आपण परत परत त्याच स्थितीला येत राहू. म्हणून नामस्मरण करताना हा भाव दृढपणे मनात धरलाच पाहिजे की, यात मन, बुद्धी, देह आणि यायोगे आत्मा शुद्ध करण्याचा एक शुद्धीकरण विधी आपण करत आहोत.
हा भाव दृढ धरला की, कितीवेळा, कितिकाळ व कधीकधी नामस्मरण करावं हा विचारच मनात येणार नाही. कारण देहशुद्धी, चित्तशुद्धी व आत्मशुद्धी या तीन पायऱ्या, सध्याच्या जन्मात जितक्या जास्त वर चढत जाऊ, तितकं आपल्या या व पुढील जन्माचं हित आहे. यात अजून एक गोष्ट ध्यानात धरावी की, सध्या मी भोगत असलेले भोग वा सुख यांचा या शुद्धीकरण विधी अर्थात नामस्मरण यावर कोणताही परिणाम होणार नाही, याची खबरदारी आपल्यालाच घ्यायची आहे.
मन हे विचार करणार आणि प्रत्येकवेळी एखाद्या प्रसंगात वा भोगात नाराज होऊ शकेल. पण अशावेळी हे लक्षात ठेवावं की, हे गत कर्माचं फळ आहे आणि तरीही या आत्मशुद्धी यज्ञात रोज वा क्षणाक्षणाला मला नामस्मरण आहुती द्यायचीच आहे. कारण आज जरी मी त्रास भोगत असलो तरीही नित्य साधना आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आजार आला की, आपण औषध घेऊन बरे होतो.
पण ते बरे होत असताना आजारामुळे अशक्तपणा, जीवनसत्वांची कमतरता या मार्गाने जातो, त्रास सहन करतो आणि औषधांचा परिणाम होईपर्यंत वाट पाहतो आणि स्वस्थ झाल्यानंतर, अशक्तपणा जाण्यासाठी जीवनसत्व अर्थात व्हिटॅमिन्सची कमतरता भरून काढतो, पण देहाची मूळस्थिती येईपर्यंत वाट बघतो. यात भेद असा आहे की, देहाच्या आजाराबाबत आपल्याला लक्षणं, उपचार व सुधारणा हे दिसतं किंवा त्याच्या टेस्ट करून कळू शकतं. पण भोग भोगताना वा सुख उपभोगताना आपल्याला तसा प्रत्यक्ष संबंध कळत नाही.
पण हे कळण्याच्या काही कसोट्या असतात का, जेणेकरून आपल्याला हे कळू शकतं का, यावर उद्या बोलू आणि मग आजच्या लेखातील पहिल्या वाक्याकडे वळू.
-------------------------------------------------------------------
हे आवाहन पुढील काही दिवस प्रत्येक लेखाखाली असेल.
श्रीगणेशाय नमः पुस्तक : भोग आणि ईश्वर भाग १ बद्दल.
भोग आणि ईश्वर या माझ्या लेखमालेला, माझ्या वाचकांनी उदंड प्रतिसाद देऊन, ते छापील पुस्तक स्वरूपात प्रकाशित करण्याची कल्पना आणि प्रेमळ आग्रह करून, छापील पुस्तक घेण्याची तयारी दर्शवून एक पाऊल पुढेच टाकलं. या प्रेमळ सुचनांचा सन्मान राखून, मी लगेच पुस्तकाच्या कामाला सुरवात केली आहे. आता सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
सदर लेखमाला अजून सुरू असल्यामुळे आता, लेख क्रमांक १ ते ५९ पर्यंतच्या लेखांचं पुस्तक, "भोग आणि ईश्वर भाग १" म्हणून प्रकाशित होणार आहे.
म्हणून अत्यानंदाने हे जाहीर करत आहे की, गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर पुस्तक प्रकाशित होऊन विक्रीसाठी उपलब्ध होईल व कुरियर करण्यात येईल.
सदर पुस्तकाची छापील किंमत रु. १५०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल, पण प्रकाशनपूर्व पैसे भरून नोंदणी केल्यास सवलतीची रु. ११०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल. प्रकाशनपूर्व सवलत गुढीपाडव्यापर्यंतच असेल. ज्यांना स्वतः घेऊन जाणं शक्य आहे, त्यांच्यासाठी पुणे , मुंबई (खार) , डोंबिवली व बदलापूर येथे पुस्तक उपलब्ध करून देण्यात येईल व त्यांना पोस्टेज/कुरियर खर्च आकारला जाणार नाही.
पेमेंटसाठी खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आगाऊ रक्कम भरून नोंदणी कन्फर्म करावी. पेमेंट नन्तर व्हाट्सऍप क्रमांक 9049353809 वर त्याचा तपशील पाठवावा. ज्यांचे व्हाट्सऍप क्रमांक आहेत, त्यांना ही पोस्ट व्यक्तिगत कळवण्यात येईलच.
G Pay no 9049275866
IDBI A/c no
Name of A/c holder: Prajakta P Athavale
A/c No. 0455104000227179
IFSC : IBKL0000455
Phonepay id : 9049275866@ybl
पुस्तकाचे लेखक: प्रसन्न आठवले
प्रकाशिका : सौ. प्राजक्ता प्रसन्न आठवले.
-------------------------------------------------------------------
उद्याच्या भागात पुन्हा भेटूच. पण तोपर्यंत गुरुवंदन करा, नित्य नाम घ्या, तेच तुम्हाला तारणार आहे.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१७/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment