भोग आणि ईश्वर ११६
कालच्या भागात योग म्हणजे काय आणि आयुष्यातील योग म्हणजे काय हे पाहिलं. कर्माधिष्टीत सर्व गोष्टी असल्या कारणाने प्रत्येक क्षण हा एका सुकृताला धरून, संचितातील फल घेऊन आणि त्याला जोडून पुढे जात असतो आणि पुढे नेत असतो. मग आपल्या हातात काय आहे. फक्त कर्म करणं. म्हणजेच गीतेत श्रीवासुदेवांनी हेच म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्या या थोडक्यात सांगण्याचा मतितार्थ आज लक्षात येत असेल.
जर घडणारं प्रत्येक कर्म फल घेऊन येईल हे नक्की, कधी येईल ते माहीत नाही, तर मग माझ्या हाती फक्त कर्म करणं शिल्लक राहतं. त्यामुळे तेवढंच मी करणं विधात्याला, ईश्वराला व माझ्या संचिताला अपेक्षित आहे. विधात्याने प्रत्येक गोष्टीला एक ऊर्जा आणि शक्ती दिली आहे आणि ती त्या त्या गोष्टीची प्रेरक आहे वा असते.
याचाच अर्थ प्रत्येक कर्मफल हे, ती गोष्ट वा व्यक्ती वा कर्मफल पक्व झाल्यानंतर, आपल्याला प्राप्त होण्यासाठी वा आपल्याप्रत किंवा आपल्याकडे येण्यासाठी, त्या त्या गोष्टीला प्रेरित करून आपल्याकडे घेऊन येतं किंवा आपल्याला त्या वस्तू, गोष्टी वा व्यक्तीकडे घेऊन जातं.
किंवा दोन्हीकडे समान बल व शक्ति लावून त्यांना निहित कर्मफल भोगण्यासाठी एकत्र आणतं. अर्थात ही शक्ती कर्मफलात आपण केलेल्या कर्मातूनच येते, तेच त्या फलाच्या उर्जेचं आणि शक्तीचं मूलस्थान आहे. एखादं उदाहरण घेऊ म्हणजे लक्षात येईल. एखाद्या व्यक्तीची अचानक भेट, एखाद्या व्यक्तीची ओळख, त्याचं मैत्रीत वा नात्यात रूपांतर, एखादी ठराविक व्यक्ती पाहून पसंत येणं, संबंध जुळून नाती निर्माण होणं, अशी अगणित उदाहरणं देता येतील.
म्हणजेच आपल्याला एखाद्या ठिकाणी जाण्याची झालेली प्रेरणा अथवा बुद्धी किंवा मनात आलेला विचार आणि त्यानुसार आपण त्या ठिकाणी जाण्याची केलेली कृती आणि त्याचवेळी आपल्या ओळखीतील दुसरी एखादी व्यक्ती, तिथे येऊन भेटणं, या गोष्टी हा योग आहे हे काल पाहिलं. पण त्या विचारांना मिळालेली प्रेरणा ही घडणाऱ्या गोष्टीची जाण कर्मफलाला असल्यामुळे, त्या शक्तीने प्रेरित होऊन आपण त्यासाठीची कृती केली. म्हणजे प्रत्येक क्षण हा सूत्रबद्ध आहे, आधीचं भोगण्यासाठी आणि पुढील भोग निर्माण करण्यासाठी.
बरेचदा आपण एखादी चूक वा गोष्ट अनवधानाने आपल्या हातून घडून गेल्यानंतर म्हणतो, मला हे करण्याची बुद्धी कशी झाली हेच कळत नाही, मी असं कधी वागत नाही, पण त्यावेळी काय झालं कळत नाही. त्या घडणार असलेल्या घटनेमागची प्रेरणशक्ती, तुमच्याच निहित कर्मफलातून प्राप्त झाली. म्हणजे मागच्याच कोणत्यातरी कर्मातून हे फलरूप येणार होतं आणि ते भोगण्यासाठीची कृती व बुद्धी तुम्हाला झाली.
म्हणजेच गीतेत म्हटल्याप्रमाणे कर्मण्ये...... कर्म कर फल तुझ्या हाती नाही. याचाच अर्थ फक्त आता घडत असलेलं कर्म तुझ्या हाती आहे. पण त्याची सुद्धा प्रेरणा मागील कर्मफलातून येते. म्हणजे प्रत्येक क्षण एक एक फल आपल्याला त्या त्या कर्मात बांधत पुढे नेते आणि आता घडणारं एक एक कर्म पुढील फलासाठी आपल्याला बद्ध करत जातं.
म्हणजे एकप्रकारे आपणच सर्व करतो आणि ते भोगण्या साठी आपणच पुन्हा पुन्हा कर्म करत जातो. ही अनंतापर्यंत जाणारी वा नेणारी एक साखळी आहे. त्या साखळीच्या घडण्यासाठी व ती साखळी तुटत नाही तोपर्यंत प्रत्येक क्षण आपण स्वतःला या आणि पुढील जन्माच्या कर्म, कर्मफल आणि त्यासाठी पुन्हा कर्म या बंधनात बांधून ठेवतं. म्हणजेच प्रारब्ध, नियती, संचित आपणच आहोत, वर्तमानसुद्धा आपणच आणि घडणारं भविष्य आपणच आहोत.
मग ही साखळी तोडायची कशी. तर बुद्धी, मन व आत्मा ज्या ज्या वेळी एकत्र येऊन आपल्या निर्मात्याचं स्मरण करेल, तो तो प्रत्येक क्षण ही साखळी तोडण्यासाठी आपण एक एक पाऊलपुढे जात राहू. अर्थात उरलेले सर्व क्षण विश्वनियंत्याला स्मरत स्मरत, त्याच्या चरणी प्रत्येक कर्म अर्पण करत करत, जर पुढे गेलो, तर त्या प्रत्येक अर्पणकर्माचं फलित योग्य करून आपल्यापर्यंत पोचवणं हे त्याचं कर्तव्य असेल. तोच गुरुरूपात सर्व गोष्टी, संगती आणि फल सुधारून घेण्याचं काम करेल.
आता लक्षात येईल, भगवद्गीतेत श्रीकृष्ण का म्हणतात की मला स्मरून केलेल्या प्रत्येक कर्माचं व मला समर्पण भावात शरण आलेल्या प्रत्येकाचं योगक्षेम मी वाहातो. हा योग म्हणजे घडणारा प्रत्येक क्षण असा व्यापक अर्थ आहे आणि तोच श्रीकृष्णांना अभिप्रेत असावा. म्हणून प्रत्येक क्षण किंवा मिळेल तो प्रत्येक क्षण नाम घ्या, घेत रहा, तरच त्याच्या चरणी स्थिर राहता येईल. त्याचप्रमाणे गुरु चरणी स्थिर रहा त्यातूनच पुढील गती मिळत जाईल.
भोग आणि ईश्वर भाग १ या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा. बाकी तपशिलासाठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२६/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment