भोग आणि ईश्वर १२१
मनाला बांध घालणं हे अशक्य आहे. पण शास्त्र सांगतं की,ज्या गोष्टीला बांध घालता येत नाही त्या गोष्टीचा, शक्तीचा,ऊर्जेचा प्रवाह वळवून तिला कार्यार्थ वापरता येऊ शकतं. याच तत्वाचा वापर आपण करणार आहोत. अनिष्ट गोष्टीत, अविचारात आणि मायामोहाच्या जाळ्यात वाया जाणाऱ्या मनाच्या अतिरिक्त उर्जेला, शक्तीला आणि अवकाश अर्थात नको त्या गोष्टी साठवणाऱ्या स्पेसला आपण सद्विचारार्थ वापरणार आहोत.
ज्या गोष्टीकडे मन जास्त आकर्षित होतं, त्या गोष्टीत वा विचारात, नामाचा विचार आणायचा आणि त्या विचाराचा माग न धरता, नामाचा विचार करायला सुरुवात करायची. मनाची एक सवय असते. त्याला दोन विचार दिले की पहिला विचार की दुसरा विचार या द्विधा स्थितीत ते जातं. याच गोष्टीचा फायदा घेऊन सद्सद्विवेक जागा करायचा किंवा जागाच ठेवायचा. ज्यायोगे मनातील अनिष्ट, अविचार इत्यादीचा वेग मंदावेल. एकदा वेग मंदावला की, त्या विचारांना लागणारी अतिरिक्त ऊर्जा आपल्या कार्यार्थ वळवून घ्यायची.
हे थोडं नाजूक काम आहे, पण प्रयत्न केल्यास जमू शकेल. यात अजून काही सकारात्मक गोष्टींचा वापर करू शकता. जसं, चांगली धार्मिक व वैचारिक अथवा ध्यानधारणेस योग्य अशी गाणी वा धून अथवा जप, मंत्र इत्यादी,. शांत बसून त्यावर ध्यान आकर्षित करण्यास सुरुवात करायची. एका ठराविक पातळीवर, ज्यावेळी मूळचे नको असलेले विचार मागे पडले की, आपल्या साधनेस सुरवात करायची.
यात अजून एक मार्ग जो काल मी सांगितला, त्यावर जरा विस्ताराने बोलूया. मनाचा मनाशी संवाद. ज्यावेळी आपण शांत असतो वा तसा वेळ मुद्दाम काढून, ही सवय मनाला लावून घेऊ शकतो. शांत बसून मनातल्या विचारां बद्दल, मनातच विचार करायचा म्हणजे आपल्याच विचारांना आपणच पारखायचं, त्याचं चिंतन करायचं. ज्यावेळी चुकीचे विचार वा दुःख क्लेशकारक गोष्टींच्या आठवणी मनात येऊन आपल्याला त्रास देतात, त्यावेळी या संवादांचा सुयोग्य वापर करता येऊ शकतो.
मुळात या विचारांनी आपण त्रस्त का होतो हे जाणण्याचा प्रयत्न करा. कारण ते जीवनातील काही कटू वा क्लेश कारक वा दुःखदायक असे अनुभव असतात. त्यावर दोन प्रकारे उत्तर मिळतं. एकतर ह्या घटना आपल्या हातून घडलेल्या चूका असू शकतात किंवा त्या आपल्या नियंत्रणाबाहेर असू शकतात. जर घटना आपल्या शक्ती व नियंत्रण दोन्ही बाहेर असेल तर आपण त्यामुळे त्रस्त होणं अहितकारक आहे.
दुसरं, ती दुःखद घटना हा, आपल्याच पूर्वकर्मातील फलानुसार आपल्याला प्राप्त झाली. अन्यथा ती घटना आपल्याबाबत का घडली. कारण क्षणक्षण घडणारं कर्म आणि समोर येणारं फल हे कार्यकारण भावाशिवाय होत नाही अथवा घडत नाही. म्हणजेच हे दुःख वा अनुभव आपल्याला प्राप्त होणारं काहीतरी कर्म, आपण पूर्वायुष्यात वा पूर्वजन्मांत केलेलं आहे हे नक्की. त्याचं हे प्रायश्चित्त आहे हे नक्की समजावं.
शास्त्रवचनानुसार भोग वा प्रायश्चित्त शरणागत होऊनच भोगावं. जर असे भोग, कोणताही राग वा अहितकारक भाव ठेवून भोगल्यास, त्या भोगाचा प्रभाव अथवा ते आपल्या आयुष्यात येण्याचा कर्मफल उद्देश, साध्य होत नाही आणि आपण त्या फलातून पूर्ण मुक्त होत नाही. हे तर आपण जाणतो की, अर्धवट राहिलेलं वा अपूर्ण असलेलं कोणतंही कर्मफल हे पुन्हा येऊन, आपलं नैसर्गिक कार्य करून मगच शांत होणार, हे प्रारब्ध आहे आणि कर्मफल नियमानुसार आहे. म्हणून या विचाराने आपल्या भाग्यातले भोग भोगून संपवणे इष्ट आहे. यात सद्गुरू बळ आणि बुद्धी देतील आणि कृपा झाली तर त्यातून लवकर बाहेरसुद्धा काढतील.
आता या त्रासदायक विचारांचं कारण, आपल्याला ऐकावे लागलेले बोल असतील तर काय, यावर उद्या विचार करूया. तोपर्यंत नाम घेत रहा, गुरुचरणी लीन रहा.कारण हेच कर्म आपल्याला पुढे नेणार आहे.
भोग आणि ईश्वर भाग १ या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे. शंभराच्यावर पुस्तकांची नोंदणी झाली आहे.बाकी तपशिलासाठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
३१/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment