भोग आणि ईश्वर ११९
मनाच्या अमर्याद शक्तीचा आणि अवकाशाचा प्रत्यय तेंव्हा येतो, ज्यावेळी आपला कठीण काळ सुरू असतो. त्यावेळी आपल्या भोगांचा काळ असतो. त्यातही मागच्या एका भागात पाहिल्याप्रमाणे संकटंसुद्धा किंवा अडचणीसुद्धा एकाचवेळी येतात. याचं कारण आहे. जोपर्यंत घरावरचं छत वा आच्छादन हे मजबूत असतं, तोपर्यंत, कितीही सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस आला, तरीही एक थेंबसुद्धा आत येत नाही.
म्हणजेच, ज्यावेळी आपल्या पुण्याईच्या कर्मांची फल, आपण उपभोगत असतो, त्यावेळी त्या पुण्याईच्या छतामुळे काही काही संकटं, परस्पर येऊन, धडका देऊन, निघून गेलेली, आपल्याला कळतसुद्धा नाही. पण याउलट ज्यावेळी दुःख, संकटं आणि भोग यांचा काळ येतो, त्या काळात पूर्व पुण्याईचा जोर ओसरलेला असल्यामुळे, अर्थात त्याचं छत थोडं सैलसर झाल्यामुळे किंवा निघून गेल्यामुळे, आपल्या भोगाच्या फलाची पक्वता परिपूर्ण होऊन ती आपल्यापर्यंत पोचायला लागतात.
याच काळात मनाचा संयम, शांतता, सात्विकता राखून, धैर्य धरून ठेवण्याची, नितांत आवश्यकता असते. पण याच काळात ज्यांना साधनेची सवय नसते किंवा आधीपासून साधना करत नाहीत, ते मनाने कमकुवत वा दोलायमान होतात. काहीजण अश्या काळात साधना, नाम वा इत्यादी मार्गांकडे वळतात. यात काही गैर आहे, असं मला म्हणायचं नाही. पण ज्यावेळी आपल्याला तहान लागल्याची तीव्र जाणीव होते, त्यावेळी आपण पाण्याचा शोध घ्यायला सुरुवात केल्यानंतर, अर्थातच त्याची सोय होऊन, ते आपल्या हाती यायला जो वेळ जाईल, तो वेळ देणं गरजेचं आहे.
म्हणून ज्यावेळी आपल्याला गरज वाटत नाही, तरीही त्यावेळीसुद्धा नाममार्ग वा साधना वा सद्गुरूसेवा सुरू केली पाहिजे किंवा आधीपासूनच करत असाल, तर ती नित्य करत राहिली पाहिजे. हे सर्व आधीपासूनच करण्याचं मुख्य कारण म्हणजे त्या पुण्याईच्या काळात शक्ती, ऊर्जा व चैतन्य यांचा वापर कमी होतो. कारण आपण आपल्या पूर्वकर्मातील उत्तम कर्माच्या फलांचा उपभोग घेत असतो. म्हणजेच आधी केलेल्या गुंतवणुकीची फेड घेत असतो.पण हाच काळ,ही कमी होत जाणारी गुंतवणूक पुन्हा वाढवण्याचा आहे.
आणि कर्माच्या नियमानुसार प्रत्येक कर्म हे फलदायक असतंच असतं. म्हणूनच भोगाचा काळ येण्याची आणि त्या काळात, नाम जप ईश्वरस्मरण इत्यादी मार्ग अवलंबण्यापेक्षा, आधीपासूनच त्या मार्गावर चालत राहिल्यास, वाईट वा नकारात्मक काळात मनाचं धैर्य आणि संयम, दोन्ही कमकुवत पडणार नाही. भोग हे भोगूनच संपवायचे असल्यामुळे, त्या काळात मनाला स्थैर्य मिळणं जरुरी असतं आणि ते साधनेतून नक्कीच उत्तमरीत्या प्राप्त होऊ शकतं.
मनाला साधनेत गोडी निर्माण होण्यासाठी मी आधी सांगितलेल्या कल्पनांनादाचा वापर करता येतो. त्याचा हळूहळू सराव करून मनाला साधनेत उत्तम गती आणि गोडी निर्माण होईलच, नन्तर ते मनच तुम्हाला त्या साधनेकडे खेचून नेईल आणि वेळ देण्याची सवय निर्माण करेल. आपल्याला तर हे माहीतच आहे की, माणूस सवयीचा गुलाम आहे. पण नामसाधनेत हे दास्यत्व नक्कीच सकारात्मकरित्या वापरता येऊ शकेल.
बरेचदा मनात अनेक विचारांचा थवा जमतो आणि माणूस त्यात हरवून जातो. ही गोष्ट विशेषतः, आपण ज्यावेळी मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी जास्त प्रकर्षाने जाणवते. याचं कारण आपण वर्षानुवर्षे मनामध्ये अनेक विचारांचं ओझं तयार केलेलं असतं आणि त्यामुळे संगणकाप्रमाणे त्यात गरज नसलेल्या विचारांच्या फाईल्स तयार झालेल्या असतात.
त्यांचा निचरा करण्याची पद्धत माहीत नसल्यामुळे आणि त्याची सवय नसल्यामुळे, आपल्याला एकाग्र होताना, त्यांचा जास्त त्रास होतो. ही समस्या प्रातिनिधिक आहे. म्हणून याचं निराकरण करण्याचा मार्ग उद्या शोधूया आणि त्याचा अवलंब करून, आपला जीवनमार्ग आणि साधनामार्ग सुरळीत करूया.
सद्गुरुवंदन आणि नामसाधन सुरूच ठेवा, तेच तुम्हाला योग्य काळात साथ देईल, कारण ती एक सकारात्मक गुंतवणूक आहे आणि याचं व्याज अमर्याद आहे, त्यासाठीचे विश्वस्त, बँकर्स आपले सद्गुरू आहेत. त्यामुळे यात डोळे झाकून गुंतवणूक करा.
भोग आणि ईश्वर भाग १ या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे. शंभराच्यावर पुस्तकांची नोंदणी झाली आहे.बाकी तपशिलासाठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२९/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment