भोग आणि ईश्वर ११०
खरतर भोग भोगणाऱ्या माणसाला सल्ला देणं, म्हणजे नदीत बुडणाऱ्याला काठावर बसून वाचवण्याचा प्रयत्न आहे, असं कुठेतरी वाटत राहतं. पण अश्या काळात आणि गर्तेत अडकलेल्याना काही मार्ग सापडावा किंवा कुठेतरी, त्यांच्या भोगांचं कारण, त्यांच्याच गतजन्मांत आहे आणि ते त्यांना जाणवून, त्या जाणिवेतून काही सकारात्मक व्हावं, हा उद्देश प्रत्येक मार्गदर्शक, सद्गुरू, संत महंत व स्वतः ईश्वर या सर्वांचा असतो.
ही जाणीव जागृत होऊन, आपल्या घडलेल्या, पण ज्ञात अज्ञात असलेल्या, कर्माचं परिमार्जन करून, त्या भोगातून आत्मपरीक्षण व्हावं, हाच उद्देश विधात्याचा आहे आणि असतो. अन्यथा मनुष्य सोडून इतर प्राणीयोनीतील जीवां प्रमाणे फक्त एक भोगयोनी निर्माण करून ईश्वर स्वस्थ बसू शकला असता. पण या सर्वाचा विचार करायला लागणारी बुद्धी मन आणि आत्म तत्वाची जाग येण्यासाठी, जाणीव नावाचं सर्वात महत्वाचं माध्यम, विधात्याने निर्माणच केलं नसतं.
या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करता, माणूस काय होऊ शकला असता आणि काय झाला आहे, हे आपोआप लक्षात येईल. सर्व उपकरणं, तंत्रज्ञान, लहरींवर कार्य करणारं आणि अमर्याद शक्ती असलेलं मन, विचारांचा वेग व आवेग हे इतकं अलौकिक बहाल केलं आहे की खरतर विधाता हा खूप मोठ्या प्रयोग शाळेतील मुख्य शास्त्रज्ञ वाटतो.
आपली अत्युच्च निर्मिती असलेला मानव, एखादा रोबी होऊ नये, यासाठीच त्याने, मन नावाचं अवकाशाला गवसणी घालणारं, अदृश्य पण अस्तित्वात असलेलं, एक रसायन, तयार करून, ते बुद्धी आणि आत्मा यांना धरून राहील आणि अविश्रांत काम करून, माणसाला सतत प्रेरित करत राहील याची पूर्ण व्यवस्था केली. तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज अशी ही उच्च निर्मिती ब्रह्मांडात उतरवून ईश्वर स्वानंदात रममाण झाला.
पण विधात्याच्या कल्पनेतील या अद्भुत निर्मितीने अजाणतेपणी वा जाणूनबुजून निर्मात्याच्या मूळ निर्मिती उद्देशांनाच हरताळ फासला आणि जन्मजन्मांतरीच्या खेळाचा भाग बनून, एका चक्रव्यूहाच्या चक्रात, स्वतःला जखडून घेतलं. कर्मबंधनाची साखळी आणि त्याबद्दलची जाण, जाणिवेत मनाच्या विशाल गाभाऱ्यात ठेवून, ती जाणीव जागृत होऊन माणूस त्या जाणिवेनुसार सुधारणा करत जाईल, या समजात विधाता राहिला. म्हणूनच माणसाच्या कोणत्याही भौतिक प्रगतीत त्याने हस्तक्षेप केला नाही.
किंबहुना त्याने मानवाला दिलेल्या स्वयंचलित, स्वयंसिद्ध यंत्रणेमुळे आणि विचार, आचार, उच्चार व कर्म यांच्या स्वातंत्र्यामुळे विधाता कधीही या कर्मबंधनाच्या शृंखलेत हस्तक्षेप करण्यास आला नाही. कारण विश्वाची ही रचना, तिचा वेग, तीचं चलनवलन यात कुठेही, क्षणाचा खंड वा बदल होऊ नये वा होणार नाही, याची पूर्ण जबाबदारीने खबरदारी, निर्माता म्हणून ईश्वराने घेतली.
अगदी अपवादात्मक परिस्थितीत घडलेल्या गोष्टी ज्या चमत्कार स्वरूप भासल्या वा वाटल्या, तरीही त्या कुठेतरी कर्माच्या साखळीशी निगडित होत्या. उदाहरणार्थ द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगात पुरवलेली वस्त्र, ही, आधीच्या युधिष्ठिर राज्याभिषेकाच्या प्रसंगी, शिशुपाल वधाच्या वेळी, सुदर्शनचक्र परत घेताना, झालेल्या जखमेवर, द्रौपदीने लावलेल्या चिंधीतील, प्रत्येक धाग्याशी जोडता येऊ शकेल.
म्हणजेच जेंव्हा एखादी गोष्ट प्रेमाने ईश्वराला अर्पण केली जाते, त्यावेळी, त्याची जाण ठेवून, योग्यवेळी त्याची अनेक पटींनी परतफेड करून, विधाता कृतज्ञता व्यक्त करतो. इतकं सगळं असूनसुद्धा ज्यावेळी मानव आपल्याच मदात, धुंदीत, विचारहीन, अमर्यादित उपभोग घेत, विधात्याच्या निर्मितीचा व त्याने दिलेल्या शारीरिक व मानसिक शक्तीचा दुरुपयोग करतो, त्यावेळी, विधाता किती कष्टी होत असेल याची संवेदनशील मनाच्या व्यक्तींना, निश्चित कल्पना येईल.
याचंच अजून चिंतन उद्याच्या भागात करूया. तोपर्यंत नाम घ्या, गुरुचरणी स्थिर रहा त्यातूनच पुढील गती मिळत जाईल.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२०/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment