Skip to main content

भोग आणि ईश्वर ११८

भोग आणि ईश्वर  ११८
 
मागे आपण कल्पनानादशक्तीचा उपयोग करून नाम कसं घ्यायचं किंवा एकाग्रता कशी साधायची हे पाहिलं. कल्पने तील किंवा मनातील नामाचा नाद ऐकण्याचा अभ्यास करत करत मनाची शक्ती वाढवण्याचा हा प्रयोग आहे. त्याची थोडी उजळणी करू आणि पुढील पायरी बघूया. वैखरीत जप करताना डोळे मिटून आपला आवाज ऐकायचा प्रयत्न करायचा. 

हे जमतंय असं वाटलं की, टप्प्याटप्प्याने आवाज कमी कमी करत करत, त्याचा ध्वनी ऐकण्याचा प्रयत्न करायचा. एका विशिष्ट वेळी वा दिवशी आपला आवाज पूर्ण बंद होईल आणि जप फक्त जिव्हा हलत सुरू राहील. तो ऐकण्याचा प्रयत्न करायचा. त्या नादाला धरून, पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. 

त्यांनतर जिव्हा हलवणं बंद करून, फक्त मनात जप करायचा आणि त्याचा ध्वनी वा त्याचा  साद वा त्याची  कंपनं ऐकण्याचा प्रयत्न करायचा. या पायरीला येईपर्यंत आपण एकाग्रतेचा चांगल्याप्रकारे अभ्यास केला असेल किंवा घडला असेल. या मनात किंवा कल्पनेत घडणाऱ्या नामाचा नाद ऐकायचा प्रयत्न म्हणजे कल्पनानादशक्तीचा ध्वनी ऐकणं. आता इथे आल्यानंतर आपण शांतपणे आत अर्थात मनात व मनोमार्गे देहात जाण्याचा प्रयत्न करूया.

इथे आपल्याला आपल्याच हृदयाची कंपनं जाणवतील किंवा त्याचा विशिष्ट ठेका जाणवेल. यावर काही काळ किंवा दिवस एकाग्र होऊया. या हृदयाच्या ठेक्यावर एकाग्र होताना कधीकधी ते वाढलेत अशी जाणीव होईल. असं होण्याचं कारण म्हणजे, आपण एखाद्या इंद्रियांवर वा अवयवावर एकाग्र होतो, तेंव्हा मनाची सर्व शक्ती व ऊर्जा तिथे केंद्रित होते. अर्थातच त्यामुळे रक्ताभिसरण त्याप्रमाणे वाढतं. म्हणूनच रक्तदाब असलेल्यानी शक्यतो हे प्रयोग करू नयेत किंवा केले तर वैद्यकीय सल्ला घेऊन मग करावे. 

हा मनाच्या शक्तीचा वापर, आपल्याला नन्तर करायचा आहे. हृदयाचे ठोके काही क्षणानंतर हळूहळू पूर्ववत होत जातात आणि आपला श्वाससुद्धा त्यानुसार संथ होत जातो. श्वास धिमा आणि हृदयाचे ठोके मंद मंद होण्याच्या पायरीवर एक विलक्षण शांतता, एकाग्रता आणि आनंदाचा अनुभव येतो. इथे एक ध्यानात ठेवायचं की, या ठिकाणी पोचताना कधी मनात चाललेला जप बंद होतो किंवा कधी श्वास व ठोके यांवरील लक्ष विकेंद्रित होतं. पण हे सुरवातीला काही काळ होणार. कारण मनाला आपण नाम श्वास आणि हृदयाचे ठोके अश्या एका विशिष्ट टप्प्यावर नेत आहोत. 

जे अशांत आणि चंचल मनाला सुरवातीला जड जाईल.पण इथे कोणतीही जोरजबरदस्ती वा मनाला मुद्दाम खेचून आणण्याचा प्रयत्न करू नये. जितक्या सावकाश, विनम्रतेने, नैसर्गिकरित्या हे जमेल, तितका त्याचा सकारात्मक आणि अपेक्षित परिणाम दिसेल आणि तो कायमस्वरूपी असेल. कारण कोणत्याही व्यक्तीचं मन हे बालकाप्रणाने असतं. कोणतीही गोष्ट मुद्दामहून करायला लावली की ते तिथून मैलोगणती दूर जाणार. 

म्हणून अगदी सावकाशपणे आणि कितीही दिवस लागले तरी,  हा प्रयोग इथपर्यंत जसा जमेल तसा करत जा, म्हणजे हळू हळू जमत जाईल. काहीजणांना नामाऐवजी एखाद्या देवाची, देवीची किंवा सद्गुरूंची प्रतिमा डोळ्या समोर आणून हा प्रयोग करायचा असेल तरी, करू शकता फक्त त्यात एक समस्या अशी आहे की, माणसाचं शरीर प्रतिमेपेक्षा  ध्वनीवर जास्त लवकर केंद्रित होतं आणि एकाग्र होतं. तरीही आपल्या सवयीनुसार करू शकता. 

या पायरीपर्यंत प्रवास नीट जमायला काही दिवस नक्की लागतील, म्हणूनच काही काही भागानंतर एक एक पायरी सांगत आहे.  खरतर आपल्या मनात अमर्याद शक्ती, ऊर्जा, चैतन्य आणि अवकाश अर्थात स्पेस, देवाने माणसाला भेट म्हणून दिलं आहे. पण आपण व्यर्थ चिंता, काळज्या, समस्या यावर मनाची हीच शक्ती, चैतन्य व ऊर्जा वाया घालवून, गरज नसलेल्या म्हणजेच unwanted फाईल्स मनात निर्माण करून, मनाचं अवकाश अर्थात मनाची ही स्पेस व्यापलेली असते. यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. 

भोग आणि ईश्वर भाग १ या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे. शंभराच्यावर पुस्तकांची नोंदणी झाली आहे.बाकी तपशिलासाठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२८/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...