भोग आणि ईश्वर १०४
काही जणांच्या मनात शंका असते की आम्ही गुरू केला नाही, मग आम्ही करत असलेल्या नामस्मरणाचं काय. म्हणजे आम्ही करतो ते योग्य की अयोग्य. याबाबत काही उदाहरणं घेऊ म्हणजे विषय लक्षात येईल. माझ्या माहिती प्रमाणे, यात तीन प्रकारचे लोक असतात. एक ज्यांनी अनुग्रह घेऊन गुरूंची त्यांच्या चैतन्यमय अस्तित्वातील समाधीवर, मस्तक ठेवून अनुग्रह घेतला असेल असे. ही पद्धत काही सद्गुरुंकडे परंपरेने चालत आलेली आहे.
दुसरा प्रकार म्हणजे ज्या सद्गुरुंच्या मठात वा आश्रमात वा गादीवर अशी पद्धत नाही, तिथे आपण स्वतःहून जायला सुरवात करून, आपल्या मनाने, त्यांना गुरुस्थानी मानलं, असे लोक. तिसरे म्हणजे ज्यांनी कोणालाही सद्गुरू न मानता, आपणहून कोणत्यातरी नामाचा स्वीकार करून, त्या नामाची साधना सुरू केली आणि भक्तिभावाने व श्रद्धेने ते, तो जाप करतात.
यात साशंकता तिसऱ्या श्रेणीतील लोकांच्या मनात साहजिक असते, की आपण योग्य मार्गात आहोत का, आपली साधना योग्य आहे का, इत्यादी अनेक शंका व प्रश्न त्यांच्या मनात सतत येत असतात. त्यातील काही माझ्या मनात योजून व काही माझ्यापर्यंत आलेले प्रश्न गृहीत धरून आज हा विषय विस्ताराने पाहूया.
यात एक गोष्ट मुळात लक्षात घ्या, की जे सद्गुरू देहरूपाने आज अस्तित्वात आहेत, त्यांनी दिलेला अनुग्रह हा प्रत्यक्ष अनुग्रह पहिल्या श्रेणीतील. जे सद्गुरू देह त्याग केल्यामुळे वा समाधी ग्रहण केल्यामुळे चैतन्य शक्तीरुपात आहेत, त्यांच्या समाधीच्या ठिकाणी वा त्यांच्या मठामध्ये त्या प्रकारची, समाधीवर वा मठातील गादीवर अथवा त्यांच्या प्रतिमेवर, अनुग्रह देण्याची प्रथा, परंपरा वा प्रघात किंवा पायंडा पडला असेल, तर असा अनुग्रह दुसऱ्या श्रेणीतील. यामध्ये अजून एक प्रकार आहे, काहींना पूर्वसुकृत व पूर्वपुण्याईमुळे स्वप्नदृष्टान्त वा संकेतरुपात सद्गुरू स्वतः अनुग्रहित करतात. हा विरळा आणि अपवादात्मक श्रेणीतील प्रकार आहे.
चवथ्या श्रेणीतील प्रकार म्हणजे, आपण स्वतःहून एखाद्या, मठात, आश्रमात नियमित जाऊन, किंवा एखाद्या अनुभवामुळे, वा प्रसंगोपात अथवा कोणाच्या सोबत जायला लागल्यामुळे, त्या सद्गुरू परंपरेशी आपो आप जोडले जातो. पाचवा प्रकार म्हणजे आपण कोणत्याही गुरुपदाशी वा गुरु परंपरेशी कोणत्याही प्रकारे जोडले न जाता फक्त साधना सुरू करतो आणि ती साधना आपल्या मनात संकल्प करून नित्य करतो. या प्रकारातील लोकं काही प्रमाणात साशंक असतात. आता या विषयावर बोलूया.
इथे काही उदाहरणं घेऊ मग पुढे चर्चा करू. सर्व गुरुपदी पोहोचलेले महात्मे हे कुठेतरी कोणा महान गुरूंना आपले गुरू करून घेण्यासाठी झटले, त्यात त्यांना यश आलं, त्यांनतर त्यांनी त्या साधनेचा या देही अभ्यास केला. त्यात त्यांना यश आलं, अधिकारप्राप्ती झाली आणि तद्नंतर त्यांनी आपली गुरुपदाची परंपरा सुरू केली. केली म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडून जनहितार्थ ते घडलं.
प्रत्यक्ष भगवान शंकर प्रभू रामचंद्राना अवतारपूर्व कित्येक युगांपासून गुरू मानतात. श्रीहनुमान प्रभू रामचंद्राना स्वामी व गुरुरूपी मानतात, श्रेष्ठ धनुर्धर अर्जुन द्रोणाचार्यांना, भीष्म कर्ण, भगवान परशुराम यांना, प्रत्यक्ष भगवान श्रीराम मानवी देहात आल्यामुळे महर्षी विश्वामित्र यांना आणि श्रीकृष्ण सांदीपनी ऋषींना, आपलं गुरू मानून शास्त्र, शस्त्र इत्यादी विद्या ग्रहण करते झाले, प्रत्यक्ष अवतारी सत्पुरुष, माऊली ज्ञानोबाराय यांनी ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ महाराज यांना गुरुपदी मानून श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानेश्वरी-भावार्थ दीपिका लिहिली .
अशी अगणित उदाहरणं देता येतील. पण सारांशाने हे नक्कीच म्हणता येईल की, या भूलोकावर जे जे परम पुण्यवान, अलौकिक आत्मे, मानवी देहात आले, ते कितीही उच्च कोटीचे आत्मे असोत वा प्रत्यक्ष भगवान विष्णू असोत, शिष्यत्व कोणालाही चुकलं नाही. किंवा गुरुचरणी लीन झाल्याशिवाय त्यांनाही या देहातून मुक्त होता आलेलं नाही.
यावरील पुढील चर्चा उद्याच्या भागात करूया, कारण विषय मोठा आहे आज पूर्ण होणं शक्य नाही.
कल्पनानादजपाचा सुद्धा अभ्यास करा, अर्थात नादजप सुद्धा जमू लागेल, तो करा, प्रयासाने सर्व साध्य होतं. , गुरुवंदन करा, नित्य नाम घ्या, तेच तुम्हाला तारणार आहे.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१४/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment