भोग आणि ईश्वर ११४
कालचा विषय पुढे नेऊया.
अनुभवाने सांगतो की, जिथे आपण चुकणार वा आयुष्यात भरकटणार, पदभ्रष्ट होणार, भोगामुळे मानसिक दृष्ट्या खचणार, निश्चयापासून ढळणार, असं सद्गुरुंना वाटेल, त्यावेळी किंवा त्या त्या वेळी, ते नक्कीच आपणहून सहाय्य करायला येतीलच, त्या नवीन चालायला शिकत असलेल्या मुलाच्या पालकांप्रमाणे. पण, कोणत्याही सद्गुरूंना सतत व अवाजवी आणि विनाकारण धावा करणारे साधक कसे आवडतील.
तुम्ही तुमच्या अध्यात्मिक वाटचालीत स्वकष्टाने, स्वानुभवाने आणि साधनेची पराकाष्ठा करत पुढे जात आहात, ही त्यांना सर्वात जास्त सुखावणारी गोष्ट आहे. तुमच्या सांसारिक जीवनात ईश्वर अथवा सद्गुरू कधीही ढवळाढवळ करत नाहीत, करणार नाहीत. जे भोग तुमच्या क्षमतेनुसार आहेत आणि कर्माधिष्टीत योग्य आहेत, ते भोग सहन करण्याचं सामर्थ्य सद्गुरू नेहमी देतात.
ज्या ठिकाणी आपली शारीरिक, मानसिक व आत्मिक शक्ती कमी पडते वा कमकुवत होते आणि तरीही त्या काळात आपण लढतो, सहन करतो आणि कोलमडून पडत नाही, त्यावेळी हे नक्की जाणावं की हे अधिकचं मिळालेलं बळ, हे त्यांच्याकडून व त्यांच्या प्रेरणेने प्राप्त झालेलं होतं.
त्या भोगांच्या काळात सद्गुरू नेहमी आपल्यासोबत असतातच. कारण एकदा साधकाला त्यांनी आपला मानला की, आपल्या अध्यात्मिक उन्नत्तीची चिंता, त्यांनाच अधिक असते. ते नित्य त्याचसाठी कार्यरत असतात. तुमच्या सांसारिक गोष्टींची चिंता वा काळजी त्यांना नसते असं नाही, परंतु त्यातील अडचणी, अडथळे व भोग हे तुमच्या साधनेच्या आड येत नाहीत,
तोपर्यंत ते त्यात दखल देत नाहीत आणि तुम्हाला शक्तीप्रदान करून पुढे पुढे नेतात. त्यांच्या तप साधनेचा व पुण्ययीचा विनियोग, ते साधकांच्या आत्मिक उन्नत्तीसाठीच विशेषतः करतात. त्यासाठी त्यांना कायम जागृत राहावं लागतं. चैतन्यरूपातील त्यांचं अस्तित्व, त्यांना याचसाठी प्राप्त झालेलं असतं.
मुळातच त्यांना देहधारणेची आस व देहात असताना जीवनाची आसक्ती नसते. त्याबाबत ते उदासीनच असतात. किंबहुना तुकोबाराय व एकनाथ महाराज, यांसारखे संत व सत्पुरुष, हे संसारात राहून असंसारी असतात आणि वैवाहिक असून मनाने विषयात आसक्त व रत नसल्यामुळे पारमार्थिक दृष्टीने ब्रह्मचारीच असतात. कारण सांसारिक जीव हे सर्व गोष्टी, शारीरिक दृष्टीने पाहतात, पण अध्यात्मात वा ईश्वराच्या दृष्टीने मनाची व आत्म्याची शुद्धता पाहिली जाते.
अन्यथा अनेक लुटारू लुटलेले व कित्येक जीव घेतलेले वाल्याकोळी, तपसाधनेच्या आधारे महर्षी वाल्मिकींमध्ये परिवर्तित झाले नसते. महानंदासारख्या एका देहाद्वारे चरितार्थ चालवणाऱ्या गणिकेला, प्रत्यक्ष महेश्वर येऊन मुक्ती देऊन गेले नसते. अशी कित्येक उदाहरणं देता येतील. पण यात मूळ तत्व हेच आहे की, ईश्वर वा सद्गुरू आत्म्याची सुंदरता, मनातील विषयाची उदासीनता, साधना यांनाच पाहतात आणि त्यांनाच महत्व देतात.
इथे अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की, आपल्या वाट चालीत सांसारिक अडचणी, भोग, ताप इत्यादी जर सदर मार्गात विघ्न निर्माण करत असतील, तर सद्गुरू त्यात हस्तक्षेप करून, त्यातून आपली सुटका वा मुक्तता जरूर करतात. परंतु जे भोग, कष्ट, ताप, दैन्य इत्यादी आपल्या गत कर्माचं परिमार्जन वा प्रायश्चित्तस्वरूप आहेत आणि जे आज वा भविष्यात कधीही भोगणं क्रमप्राप्त आहे, ते भोग वा ताप, कोणतेही सद्गुरू, सहसा विनाकारण, दूर करण्याचा प्रयत्न करत नाहीत.
मग सद्गुरू काय करतात. तर त्या भोगांना भोगण्याची, त्यातून सुखरूप सुटण्याची, त्यांना सहन करण्याची नैतिक, मानसिक व आत्मिक शक्ती व पाठबळ नक्की देतात. किंबहुना ते सोबत असतात, म्हणूनच बरेच वेळा, तो काळ संपल्यावर आपल्याला आश्चर्ययुक्त जाणीव होते की, अरे मीच त्या काळातून गेलो आणि ते सहन करण्याचं सामर्थ्य मला कसं प्राप्त झालं, मीच इतक्या भोगातून जाऊन कसा टिकू शकलो.
ही जाणीव झाली की, नक्की समजावं आपले सद्गुरू आपल्या सोबत होतेच. म्हणूनच भोगाच्या काळात, ही जाणीव, सतत जागृत ठेवावी की, सद्गुरू सोबत आहेतच आणि ते तुम्हाला पडू देणार नाहीत, अगदी योग्यवेळी हात व आधार जरूर देतील, पण ती योग्यवेळ आली तरच.
इथे एक गोष्ट मुद्दाम पुन्हा पुन्हा सांगतो की,ज्यांनी, लौकिक अर्थाने, सद्गुरू केले नाहीत, त्यांच्यासाठी त्यांचं नामचं गुरुस्वरूप आहे आणि ती साधना गुरुप्राप्ती पर्यंत गुरुपदी असेल. योग्यवेळी ती साधना त्यांना, त्यांच्या प्रारब्धातील गुरूंकडे, घेऊन जाईल, कदाचित या जन्मात वा पुढील जन्मात. म्हणूनच अश्या साधकांनी आपलं नाम हेच गुरुस्वरूप व गुरुस्थानी कल्पून मार्गक्रमण करत राहावं. त्यांची साधना गुरुरूपात त्यांना मार्गदर्शन करत राहील.
चिंतन करा, चिंतन हा साधनेचा प्राण आहे. नाम घ्या, घेत रहा. गुरुचरणी स्थिर रहा त्यातूनच पुढील गती मिळत जाईल.
भोग आणि ईश्वर भाग १ या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा. बाकी तपशिलासाठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२४/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment