Skip to main content

भोग आणि ईश्वर १०३

भोग आणि ईश्वर  १०३
 
काल आपण चर्चा संपवताना जाणीव या शब्दावर  थांबलो आणि आज त्यावर चर्चा करूया. एखाद्या गोष्टीची जाण असणं म्हणजे ती गोष्ट माहीत असणं नाही. कारण माहिती,  ज्ञान ह्या बुद्धीच्या अवस्था आहेत. म्हणजे भौतिक दृष्टीने म्हणूया. पण जाण असणं म्हणजे त्या गोष्टीचं मनाला  आकलन होणं किंवा मन त्याबद्दल जागरूक होणं किंवा मनाला उमगणं. इंगजीमध्ये ज्याला knowledge आणि awareness ह्यामधील जो फरक आहे, तोच ज्ञान आणि जाणीव यात आहे. 

उदाहरण घेऊ. आपल्याला नोकरी सुरू केल्यावर ज्ञात असतं की, एक ठराविक वय झालं की आपण निवृत्त होणार. परंतु त्याची जाणीव मनाला त्यावेळी होते, ज्यावेळी खरच निवृत्तीचं वय उंबरठ्यावर येऊन ठेपतं. किंवा एखादी गोष्ट आपण उद्या बघू किंवा नंतर विचार करू, म्हणून आपल्या सोयीच्या दृष्टीने लांबणीवर टाकतो. पण त्याची जाण ती वेळ येते किंवा तो क्षण जवळ येतो, त्यावेळी आपल्याला होते. 

भौतिक जगातील अनेक गोष्टींबद्दलच्या जाणिवा या त्या त्या समयी जागृत होऊन, ते ते भाव, त्या त्यावेळी वा क्षणी निर्माण होऊन, मन त्याप्रमाणे देहाला कार्यरत व्हायला प्रवृत्त करतं किंवा त्याप्रमाणे भावांचं प्रकटी करण देहाकडून होतं. म्हणजेच देह हा फक्त एक माध्यम आहे किंवा मागे म्हटलं त्याप्रमाणे स्क्रीन. पण खरा मदरबोर्ड हे मन आणि प्रोसेसर मेंदू आहे. या दोन्हींच्या संयोगातून देहाला कार्यप्रवृत्त केलं जातं. म्हणजेच नुसतं कीबोर्ड वरून आज्ञा देऊन कार्य होत नाही, तर ती आज्ञा प्रोसेसरला समजणं आणि प्रोसेसरने त्यानुसार कार्य करून स्क्रीनवर उत्तर देणं हे महत्वाचं आहे. 

यात देहाच्या भाषेत मदरबोर्ड म्हणजेच ममत्व म्हणजे मन आणि प्रोसेसर म्हणजे कार्यकारक, म्हणजे मेंदू असे दोन घटक जाणिवा निर्माण करून त्यांना देहाप्रत नेण्यासाठी गरजेच्या आहेत. इथे मला ज्ञानोबा माऊलींच्या एका सुंदर अभंगातील एक चरण आठवतो. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. ही आर्तता आधी नव्हती का, तर ती ज्ञान रुपात मुळातच देहात जन्मोजन्मी आहेच व असतेच. पण ही आर्तता प्रकाशली म्हणजे जाणीव जागृत झाली. 

मनाला ती आर्तता समजली आणि त्या आर्ततेच्या प्रकाशाने मन उजळून निघालं. आधीसुद्धा प्रकाश होताच आणि तो मनाच्या आतच होता. पण त्याची जाणीव नव्हती. आज त्या प्रकाशावरील धूळ, मळभ, वृत्तीचं, वासनेचं, मायेचं आच्छादन काढलं गेल्यामुळे, आज मनात प्रकाश पडला, उमगलं, जाणीव झाली. मन व  देह आपल्याच मस्तीत, नादात, धुंदीत रत होतं. कारण पुढे माऊली सांगतात आवडीचे वालभ माझेनी कोंदाटलेll नवल देखिले नभाकार गे मायेll

म्हणजेच मनाला होणारी एखाद्या गोष्टीची जाण, उमग, समज ही खरी जाणीव आहे. आता आपल्या आयुष्या तील आज पर्यंत, आपण वाया घालवलेल्या, अगणित क्षणांची  आणि त्या क्षणांना जोडून, जमलेल्या काळाची, जाणीव जागी झाली असेल. ही जाणीव जर जागी झाली असेल, तर हेदेखील कळेल की, आपण भोगत असलेल्या किंवा भोगलेल्या काळात, क्षणात आपण किती काळ वा वेळ त्या नकारात्मक विचारांच्या नभात मनाला आणि देहाला जखडून ठेवलं होतं वा आहे.

त्या नकारात्मकतेच्या नभातून वा प्रभावातून मनाला बाहेर काढणं किती गरजेचं आहे, ही जाणीव जर आज जागृत झाली असेल तर, त्यासोबत वाया घालवलेल्या क्षणांबद्दल पश्चात्ताप देखील जागृत झाला असेल. ही जाणीव, हीच प्रभात आहे. देर आये पर दुरुस्त आये, या उक्तीनुसार जागृतावस्थेत आलेल्या या मनाला भोगाचा, दुःखाचा विचार सोडायला लावून, त्या पश्चातापाच्या परिमार्जनासाठी सकारात्मक वाटेवर चालायला लावून बाकी सर्व विचारांचं मळभ दूर करून, सर्वात सोप्प असं साधन म्हणजे नामस्मरण करायला प्रवृत्त करा.

त्या पश्चातापाच्या जाणिवेचा प्रकाश जागृत ठेवा, म्हणजे मन  पुनः भरकटणार नाही आणि मन, बुद्धी, देह आणि आत्मा एकाच विचाराने भारले जातील आणि साधना करूनही त्यात मन न गुंतवल्याची जाणीव जागी राहील आणि तीच साधनेला मार्गावर ठेवेल. 

एक प्रातिनिधिक प्रश्न आला आहे, उद्या त्यावर चर्चा करू. पण मी  सांगितलेल्या कल्पनानादजपाचा सुद्धा अभ्यास करा आता जाणिवा जागृत झाल्या असतील तर हा नादजप सुद्धा जमू लागेल, तो करा, प्रयासाने सर्व साध्य होतं. , गुरुवंदन करा, नित्य नाम घ्या, तेच तुम्हाला तारणार आहे. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१३/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...