Skip to main content

भोग आणि ईश्वर ९५

भोग आणि ईश्वर  ९५
 
पहिल्या दोन पायऱ्या हळुवारपणे साध्य कराव्या लागतील, कारण त्यात घाई केली तर आपलंच मन नन्तर कधीतरी रंग दाखवू शकतं. म्हणून पहिल्या दोन पायऱ्यांचा अभ्यास व्यवस्थितपणे, नेमाने, नेटाने आणि मनावर कोणतीही जोरजबरदस्ती न करता करावी. मी वारंवार हे यासाठी सांगतो आहे की पुढे जायला आणि एकाग्र व्हायला मनाची उत्तम साथ असणं गरजेचं आहे.

मनाला नामाचा नित्य छंद लागण्यासाठी व आवड निर्माण होण्यासाठी मनाच्या गुंतवणुकीची खूप आवश्यकता आहे. यासाठी पुढील प्रयोग म्हणून आता डोळे मिटून आपण वैखरीने, पण कमी ध्वनीत वा आवाजात घेत असलेल्या  नामाच्या प्रत्येक अक्षरावर मन एकाग्र करून ते ऐकण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे आतापर्यंत आपण त्याला आवाजाचा वेध घेण्याची सवय जडवली, पण आता शब्दांवर एकाग्र होण्याचा प्रयत्न करूया. 

यामध्ये आपण एक पायरी अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे आवाजाचा वा ध्वनीचा नाद व्यवस्थित ऐकण्याची गोडी निर्माण झाली की, त्या आवाजातील शब्दांवर एकाग्रचित्त होण्याचा प्रयत्न. यामध्ये आपलं मन पूर्ण नामावर केंद्रित झालेलं दिसेल. इथे आपण हळुवार पणे नामातील शब्दांचं बोट धरून अलगद आणि प्रेमाने त्या नामाच्या सोबत विहरत आहोत अशी कल्पना करा. त्या नामाच्या लहरींवर आपण डोलत आहोत असं वाटेल. काहींना खरच आपण डोलत आहोत हे जाणवेल सुद्धा.

या स्थितीचा अनुभव व आनंद घेण्याची मजा काही और आहे. यात प्रामुख्याने जगाचा, स्वतःचा व स्वतःच्या डोक्यातील व मनातील चिंतांचा सुद्धा काही क्षण विसर पडेल. ही एकप्रकारे नामाने मनाला व मनाने नामाला घातलेली साद आणि आपण त्याचे साक्षी असल्याची स्थिती. 
या स्थितीत असताना आणि या स्थितीची पूर्ण सवय झाल्या नंतर आपण आपल्या नामाचा ध्वनी हळूहळू अजून कमी करूया. जेणेकरून तो शेजारी कोणी बसलं असेल तर त्यालाही ऐकू येणार नाही.

म्हणजेच ओठ हलत आहेत,नाम सुरूच आहे पण कुठेही आवाज येत नाही. आता या स्थितीत मनाला हा आवाज ऐकायला लावण्याचा प्रयत्न करावा. जर पहिल्या तीन पायऱ्या पूर्णपणे व घाई आणि जबरदस्ती न करता हळुवार पूर्ण केल्या असतील तर इथे मनात घेत असलेले नाम आपल्याला मनातच ऐकु येईल.  प्रत्येक पायरीचा अभ्यास नियमित करत गेल्यास चवथ्या पायरीला नक्की पोहोचू. त्याचा अभ्यास नित्य वेळ काढून शांतपणे करावा. मनाला नामाची गोडी लागावी म्हणून सद्गुरु कृपेने मी लिहिलेल्या खालील ओळी  मनात नीट साठवून ठेवा म्हणजे सर्व पायऱ्या नीट चढत चढत मन पुढे पुढे जाईल. 

नामाविण दुजे नाही सत्य जाणा
नामचिया पायी मन झिजवाना

नाम सदा घ्यावे
नाम श्वास व्हावे
नामाचेच व्हावे
नाम जिवा भावे
नामाची गोडी मनी लागूद्याना
नामचिया पायी मन झिजवाना ||१||

देह जन्मला वाढला
जगी समर्थ जाहला
इतुके होता, दुःखाला
पाहता, भयभीत झाला 
सुखदुःख सारे कर्मबद्ध जाणा
नामचिया पायी मन झिजवाना ||२||

भोग भोगताना मनी
संदेह येई परतुनी
काय मम जीवनी 
हे काटे पायातुनी
प्रारब्धाचे भोग गतकर्मात जाणा
नामचिया पायी मन झिजवाना ||३||

मना  व्यथा चिंता होई
मना आनंद प्राप्ती होई
मना सुखदुःख सर्वकाही
प्रतिसादातून प्राप्त होई
जलावरील तरंग तैसेच हे जाणा
नामचिया पायी मन झिजवाना ||४||

मन पालटोनी जाई 
मन संचित पुढे नेई
रागद्वेष अपमानही
साठवून पुढे नेई
परिणाम याचा वृत्तीत जाणा
नामचिया पायी मन झिजवाना ||५||

सापडे ना काही हाती
जाता जन्म, शून्य हाती
संचित जे येई तुझ्या हाती
भोगणे हीच त्याची प्राप्ती
खेळ सोडा हा, एक नाम घ्याना
नामचिया पायी मन झिजवाना ||६||

नामासाठी उरलेला जन्म
घालवा क्षण क्षण वेचून
नामसखा जोडे जे मन 
नित्य आनंद तो सुदिन
कर्मबंधनाची तुटे शृंखला, जाणा
नामचिया पायी मन झिजवाना ||७||

इतुकेही सांगूनिया मना
काही फरक तो पडेना
नित्य धावे, मनी वासना
त्याचा उपाय सापडेना
नामानेच तरशी, आधी घे नामा
नामचिया पायी मन झिजवाना ||८||

नामपरते साधन नाही
नामाविण गती नाही
नाम कलीयुगी पाही
नाम अवतार सूक्ष्मही
रिपूही सूक्ष्म, उपायही सूक्ष्म जाणा
नामचिया पायी मन झिजवाना ||९||

आता ठेवावा बुद्धिभेद
धरा हाती नाम नित्य
असो देह तो कामात
नाम चालूद्या मनात
नामा काही न ये आड, हे जाणा
नामचिया पायी मन झिजवाना ||१०||

राहुद्या मोक्षाच्या गप्पा
आनंद दुःख सुवार्ता
सर्व मनाच्याच गप्पा
परी भोगले जाण चित्ता 
कर्मभोगसाखळी हे सत्य जाणा
नामचिया पायी मन झिजवाना ||११||

मन होई ते साशंक 
नाम का, हा आक्षेप
नाही केला नामजप
करू का मी खटाटोप
कर्माचिया नियमांना तरी माना
नामचिया पायी मन झिजवाना ||१२||

आता सोडा सारे खेळ
भोगण्याचे गेले बळ
मन भ्रांती ते सकळ 
पाठी नामाचे पाठबळ
नाम मना देई आधार, भोगताना 
नामचिया पायी मन झिजवाना ||१३||

नाम नाम एकची नाम
जिव्हेने नित्य घ्यावे नाम
श्वास जावो घेता नाम
हे साधे, नित्य घेता नाम
क्षण शेवटचातरी हाती धराना
नामचिया पायी मन झिजवाना ||१४||

उद्या पुढे जाऊ, पण तोपर्यंत नामात रहा, नित्य नाम घ्या, तेच तुम्हाला तारणार आहे. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०५/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...