Skip to main content

भोग आणि ईश्वर ९३

भोग आणि ईश्वर  ९३
 
आत्मबलशक्ती, आत्मसंयम पाहिल्यानंतर आता मनातून आत्म्यापर्यंत जाण्याचा प्रवास सुरु व्हायला हवा. तसा तो होताना दिसत नाही. याचं मुख्य कारण आपण नामस्मरण हे कर्तव्य म्हणून करतो, ते निष्ठा म्हणून करायला सुरुवात केल्यास, ते मनातून आत्म्यापर्यंत झिरपत जाईल. 

प्रत्येकाच्या जीवनात अश्या काही गोष्टी असतात जिथे माणूस हरवून जातो. अगदी तहानभूक विसरून, तो त्याचाच विचार करतो. म्हणजेच थोडक्यात मनातून हळूहळू देहात म्हणजेच नसानसात, धमन्यात, मेंदूत तोच विचार सुरू असतो, ती गोष्ट मिळेपर्यंत त्याला काहीच सुचत नाही. मग ते ध्येय परीक्षा असेल, मार्क्स असतील, डिग्री असेल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम वा जिव्हाळा असेल. पण रात्रंदिवस ती व्यक्ती त्याच गोष्टीचा, ध्येयाचा, लक्षाचा किंवा सदर व्यक्तीचाच विचार करते. म्हणजेच एकप्रकारे त्याच गोष्टीचं नित्य स्मरण करते.

हाच स्मरणभाव, हीच वृत्ती, हेच झोकून देणं माणसाने नामात लावलं म्हणजेच अखंड नामाचाच विचार केला, तर नक्कीच एकाग्रता होऊन, ते नाम हळूहळू आत मनात आणि मनातून सुप्तमानाच्या पातळीवर पोचू शकतं. पण तितक्या समर्पित भावनेने ते घेत गेल्यास हे साध्य होईल वा होऊ शकतं. यासाठी खूप वेळ वा खूप काळ नाम करावं का. तर याचं उत्तर हो आणि नाही असं दोन्हीही देता येईल. हो यासाठी की अभ्यास जितका जास्त तितकी मनाची गुंतवणूक त्यात जास्त आणि जितकं मन गुंतत जाईल तितकंच नाम आत आत जाईल. 

नाही यासाठी की, एखादा विद्यार्थी सात ते दहा तास अभ्यास करतो, पण मन दुसरीकडे भरकटत असेल तर त्या सात ते दहा तास अभ्यासाचा परिणाम मार्कात दिसणार नाही. पण मन लावून चार तास जरी अभ्यास केला तरी तो चांगल्या मार्कासाठी योग्य ठरू शकतो. म्हणजेच याचं एकच परिमाण नाही. व्यक्तिपरत्वे ते वेगवेगळं असू शकतं वा असतं.  मग यावर उपाय काय. 

यावर खूप सोप्पा उपाय आहे. आपलं नित्य नामस्मरण करत असतानाच, मधेच एक प्रयोग म्हणून दोन चार मिनिटं डोळे मिटून आपण म्हणत असलेल्या नामावर आणि त्या आवाजाच्या नादावर, मन पूर्ण एकाग्र करण्याचा सराव करावा. हा प्रयोग जाणूनबुजून करावा आणि याचा सराव हळूहळू वाढवत न्यावा. ही दोन चार मिनिटांची समाधीसदृश अवस्था, मनात याच स्थितीत राहण्याची आवड, निर्माण करेल. याच सरावातून पुढे हाच दोन चार मिनिटांचा अवधी मन आपोआप वाढवत नेईल.

कारण, मना लागो छंद गोविंद, या चरणाप्रमाणे मनाला एखाद्या गोष्टीकडे मुद्दामहून आकृष्ट करून त्यातील आनंद मनाला जाणवू दिला पाहिजे. मन हे चंचल असलं तरीही एखाद्या गोष्टीत त्याला आनंद मिळतो आहे हे जाणवल्यास ते नित्य त्याच गोष्टीचा ध्यास घेईल. जसं त्याची मूळ प्रवृत्ती विषयसुखाकडे धावण्याची आहे, तर ये नित्य त्याचा मागोवा घेतं आणि जिथे ते मिळेल तिथे तिथे ते धावत जातं. 

आपल्याला प्रयत्नपूर्वक व जाणीवपूर्वक त्याचं लक्ष विषयाकडून वळवायचं आहे. म्हणजे विषय छंद सोडून नाम छंद त्याला जडवायचा आहे. आता यामध्ये व्यक्तिपरत्वे आणि मनाच्या अवस्थेपरत्वे कमी जास्त प्रयत्न करावे लागतील. म्हणून यात कोणतीही जबरदस्ती न करता प्रथम आपल्या बुद्धीला हे पटवून द्यायचं की, मला हा प्रयोग काही क्षण करायचा आहे. 

ही जाणीव बुद्धीत ओतून, शरीराला तयार करून, नाम घेता घेताच, अलगद डोळे मिटून आपलाच आवाज ऐकण्याचा प्रयत्न सुरू करावा. हे साध्य झालं की, त्या आवाजावर एकाग्र होण्याचा प्रयत्न करावा. यात आधी कानांना जाणीव पूर्वक त्या आवाजाच्या दिशेने वाळवावे.  कान, हा आवाज ऐकत असताना, मन कदाचित विचारात भरकटेल किंवा सोबत असेल, पण आपलं लक्ष कानांवर असावं. काही क्षण साध्य झालं वा नाही झालं तरी पुनः प्रयोग सोडून द्यावा. ठराविक अंतराने दिवसातून काही वेळा , विशेषतः शांत वातावरणात, हा प्रयोग, मध्ये मध्ये करून पहावा. 

यावर अजून विस्तृत विचार उद्याच्या भागात करूया. तोपर्यंत नामात रहा, नित्य नाम घ्या, तेच तुम्हाला तारणार आहे. 

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०३/०३/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...