(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - ४
.
प्रत्यक्ष अश्रुनाही धन्यता मिळाली आज नरेश्वराच्या नेत्रातून ओघळताना.
त्या ओघळणार्या आसवांच्या स्पर्शाने भानावर आलेल्या कृष्णाने समोर दिसणाऱ्या वृन्दावनाकडे अगतिक कटाक्ष टाकला. नजर शून्यात गेली, रंध्रात फक्त एकच बोल घुमत होते, राधेच्या पैंजणांचे आणि सोबतीला बासरीचा करुण हृदय पिळवटून टाकणाऱ्या नादाचे. राधेच्या मनस्थितीची कल्पना आलेला मधुसूदन अजूनच हळवा झाला. काय करावं ते काहीही न सुचणारा एक आर्त उसासा सोडून मुरलीधर रथ थांबण्याची वाट बघत होता.
राधा वेडा झाला मोहन अगतिक वाटे सारे जीवन
का आता जावे परतून दवारकेस लागावे का मन
विरह मैत्रीचा कधी न भेटण्या का बांधियले ऐसे हे बंधन
का प्रारब्धी हे लिहिले माझ्या का जन्मा या आलो परतून
कशास ऐसे घडले सारे इतके कठीण कि या देही गुंतून
मन जडले ते आत्मा जाणे, आत्मा जाणे, जाणे पुरुषोत्तम
अश्या विचित्र परिस्थितीत अडकलेला परम दयाळू विश्वनाथ, पण राधेच्या भेटीसाठी व्याकुळ झाला होता. कारण त्याला ठाऊक होत कि, हि कदाचित शेवटची भेट असेल, या जीवनातील. नंतर द्वारका , मग जीवनाची व्यस्तता. उर्वरित संपूर्ण आयुष्यात पुनः भेटीचा योग येईल कि न येईल हे प्रत्यक्ष जर विधात्यालाच माहीत नव्हतं तर काळ काय उत्तर देणार.
कृष्ण धीम्या गतीने रथातून पायउतार झाला आणि वृंदावनाच्या त्या विस्तीर्ण आणि घनदाट वृक्षमित्रांच्यात प्रवेश करता झाला. संपूर्ण वृंदावन परमात्म स्पर्शाने जणू शहारलं. कृष्ण तसाच आत गेला अनेक वृक्षांना स्पर्श करून गत काळातील आपल्या आठवणींना जागवून , विमनस्क मनस्थितीत एक एक पाऊल पुढे चालत, काही आठवलं कि पुन्हा एखाद्या वृक्षाला प्रेमळ स्पर्श करत कधी स्मित तर कधी उदास भावाने जड पावलांनी पुन्हा पुन्हा समोर दिसणाऱ्या मार्गिकेवर सतत नजर रोखून पाहात होता, कोणीतरी येणार आहे अश्या खात्रीने.
सारथी कृष्णाची ही अवस्था पाहून काय बोलावं ते न सुचल्यामुळे पुढील आदेशाची वाट पहात दूरवर उभा होता. अचानक कृष्णाच्या लक्षात ही गोष्ट आली. त्याने लगेच सारथ्याला सांगितलं.
" आपल्याला थोडा वेळ थांबावं लागेल तू रथ सोडून न्याहारी करून घे आणि घोडयाना चारा पाणी करू दे "
" महाराज आपण "
"नाही मला नकोय आता काहीही. तू आणि घोडे न्याहारी करा. कारण तुम्ही दोघेही श्रमाने दमला आहात, मी जाणतो आणि पुन्हा जातानासुद्धा आपल्याला असच जावं लागेल वेगात, नाहीतर बालरामदादाला तू जाणतोस. "
"होय महाराज. विलंब झाला, तर काही खैर नाही. तरी किती घटका लागतील आपल्याला इथे. "
" जरा वेळ लागेल. तू न्याहारी नंतर विश्राम कर मी माझं आटोपल कि तुला जाग करीन. "
" चालेल. मी आहे मग. या आपण आपलं काम उरकून."
कृष्णाने उत्तरादाखल फक्त मान हलवली आणि पुढे चालण्यास सुरवात केली. शांत अश्या त्या वृंदावनात निरनिराळ्या पक्ष्याच्या किलबिलाटात कृष्ण काही पळे आपलं दुःख विसरून ते ऐकण्यात आणि पाहण्यात दंग झाला.गतकाळाच्या आठवणी जणु सर्वांगी स्पर्श करून पुन्हा एक नवीन आस निर्माण करत होत्या.
काही काळ असाच गेला. जवळ जवळ एक घटिका पूर्ण सरली. सारथी आणि घोडे न्याहारी करून , सारथी काही काळ विश्राम करते झाले. तरीही महाराज येत नाहीत हे पाहून सारथी बिचकत बिचकत शोधण्यास निघाला. त्या शांत वातावरणात त्याच्या पावलांचा आवाज सुद्धा मोठा वाटत होता.
कृष्ण काही अंतर पुढे जाऊन एका विस्तीर्ण हिरवळीवर पहुडला होता. कमरेला बासरी तशीच होती. जी नेहमी कृष्णाच्या ओठानी सूर छेडत असायची. पुन्हा पुन्हा गोकुळाकडून येणाऱ्या मार्गाकडे कृष्ण आशाळभुता प्रमाणे पाहात होता.. इतक्यात पावलांनी होणारा पानांचा आवाज ऐकून एक आशा निर्माण झाली. कृष्णाच्या चेहऱ्यावर त्याही अवस्थेत कृत्रिम स्मित आलं. कृत्रिम यासाठी कि आवाज उलट बाजूने येत असल्यामुळे त्याला खात्री होती कि हा सारथी असावा. पण मन तरीही वेड्या आशेकडे डोळे लावून बसलं होत. पण मनाचा अंदाज पुन्हा चुकला आणि समोरून सारथी येताना दिसला. त्याने जवळ येऊन विचारला कि,
" महाराज कोणी आलंच नाही का."
" नाही रे. "
"मग आता काय करायचं ? "
" काही पळे बघूया वाट अन्यथा उलट पावली माघारी जाऊया. "
" जशी आपली आज्ञा. मी आहेच रथाजवळ. रथ जोडून घेऊ का. "
कृष्ण राधेच्या येण्याची शक्यता कमी आहे या जाणिवेने निरुत्साहात म्हणाला
"ठीक आह. ठेव जोडून. निघूच इतक्यात."
असं म्हणून पुन्हा गोकुळाच्या वाटेकडे डोळे लावून, निराश अंतःकरणाने कृष्णाने परत निघण्याचा विचार केला. त्यात दुसरा अजून एक विचार सुरु झाला, दादा काय म्हणेल. आणि त्याला काय उत्तर द्यायचं. सारथ्याला रथ ओढण्यास सांगून आपण रथात प्रवेश कर्ता झाला, परतीच्या वाटेवर. निराश भावात.
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
१५/०४/२०१८
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment