(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली कथामालिका)
मुरली - १
कृष्णपरीसा येतो कोठुन सय ही त्याची हॄदयामधुनि
उरली मुरलीची ती बाधा स्वर तो कोमल कानामधुनि
कृष्ण मथुरा , गोकुळ आणि वृंदावन सोडून दूर द्वारकेस जाण्यास निघाला. सर्व मथुरा राज्य आणि मथुरेचे प्रजाजन मथुरेहुन जाण्यास सज्ज असताना, ज्याने हा निर्णय घेण्यास भाग पाडल सर्वाना, तो मुरलीधर पाय अड़खळल्यासारखा थबकत थबकत पुन्हा पुन्हा मागे बघत विचारमग्न स्थितीत अचानक रथाजवळ येऊन सारथ्याला आज्ञा देतो.
" रथाला वृंदावनात घेऊन चल लगेच"
" जशी आज्ञा "
सारथी रथाला त्वरेने घेऊन वृंदावनाच्या दिशेने प्रस्थान करतो. वाटेत कृष्ण बलरामाच्या सारथ्याला निरोप देतो.
" दादास सांग आम्ही जरा वृंदावनी भेट देऊन येतो. दोन प्रहर थांबण्यास सांग."
"व्हय जी "
कृष्ण सारथ्यास रथ त्वरेने हाकण्यास सांगतो.
तोच अर्ध्या प्रहराचा मार्ग वृंदावनी जाणारा, आज युगांचा वाटत होता. प्रत्येक क्षणाच मोल आज जाणवत होत. रथ वाटेत धुराळा उडवत पवनवेगाहुन अमाप गतीने निघाला. आज अश्वाना सुद्धा कृष्ण मनाची जाणीव झाली होती. जगतपालक, जगद्वयापी, जगदीश्वर पण मानवी देहातून जाणवणारी हतबलता अनुभवत होता.
इतक्या वायुवेगे जात असलेल्या रथाचा वेगसुद्धा आज किती मर्यादित वाटतोय. क़ाय ही अवस्था आणि अस्वस्थता. प्रारब्ध किती क्रूर आणि निष्ठुर असत ते आज या मानवी देहात जाणवतय. अजून किती किती भोगायच.
" वृंदावन यायला किती अवकाश आहे अजून."
" काही घटिकाच शेष आहेत महाराज "
पुन्हा कृष्ण शांत आणि अगतिकपणे, पुढे दिसणाऱ्या मार्गा कडे, नुसताच पाहात होता. हताशपणे कापत चाललेल्या पथावर फिरून नजर फिरवत होता. त्याच्या स्वतःच्या श्वासाचा सुद्धा आवाज या सर्व कोलाहलात ऐकू येत होता कृष्णाला. सर्व गत काळाच चित्र मनःपटला वरुन फिरत होत. तो मुरलीचा स्वर आणि त्या नादावर धुंद होऊन ती पायातील पैंजणांची छमछम, छमछम. नन्तर फक्त मुरली आणि पैंजण यांची जुगलबंदी कित्येक घटिका नव्हे प्रहरभर कदाचित दोन दोन प्रहरसुद्धा.
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
१३/०४/२०१८
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment