(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - ५
.
असं म्हणून पुन्हा गोकुळाच्या वाटेकडे डोळे लावून, निराश अंतःकरणाने कृष्णाने परत निघण्याचा विचार केला. त्यात दुसरा अजून एक विचार सुरु झाला, दादा काय म्हणेल. आणि त्याला काय उत्तर द्यायचं. सारथ्याला रथ ओढण्यास सांगून आपण रथात प्रवेश कर्ता झाला, परतीच्या वाटेवर. निराश भावात.
अगतिकता काय आणि प्रारब्धात जे आहे ते समोर आल्या
नंतर मानवी मनाची काय अवस्था होत असते. त्याचा प्रत्यय कृष्णाला येत होता. मानवी मनाच्या इच्छा , आकांक्षा , मनीषा यांसाठी प्रयत्नां बरोबर काही अजून उपयोगी असावं लागत आणि ते म्हणजे दैव. अन्यथा सर्व इच्छा या फलदायी होतातच असं नाही. विषण्ण मनाने आणि अनिच्छेने यदुवीर परत जाण्यास निघतो.
आज राधाची भेट व्हावी याचा शेवटचा प्रयत्न म्हणून कृष्ण रथ काही काळ थांबण्यास सांगून उतरून थोडं पुढे जाऊन, बासरी वाजवून बघावी असा विचार करतो. बघू याचा इच्छीत परिणाम होतो का. डोळे मिटून पूर्ण ध्यान लावून आणि मनाची एकाग्रता साधून बासरीतून सुंदर स्वर्गीय सूर वाजवण्यास कृष्ण सुरु करतो. संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध होऊन जात. जणू समस्त चराचर त्या तालावर डोलायला लागलय. हवा मंद मंद वाहू लागते. पानांची सळसळ निःशब्द होते, पशु पक्षी सुद्धा त्या आर्त स्वरगुंजारवाने तल्लीन होऊन जातात. गंधर्व आणि अप्सरा त्या स्वरांच्या नादाने भारावून वृंदावनी जमा होतात.
परंतु आज त्या स्वरांमध्ये एक करुणेचा स्वर मिसळल्या मुळे सारा चराचर जणू कृष्णाच्या मनाशी आणि मनातील भावाशी एकरूप झालेत. प्रत्येक जण आज गहिवरून कृष्णाच्या भावना जाणून स्तब्ध झाले. त्या स्वरांनाच हे भाव सहन न होऊन त्यांची आर्तता अजून परमोच्च पदाला गेली. जणू सर्व सृष्टी अश्रूमय झाली तरीही राधा जिच्यासाठी कृष्णाने हा प्रयत्न केला होता तिचा कुठेही मागमूस सुद्धा नव्हता. वाजवता वाजवता अचानक सूर थांबले. कृष्णाने बासरी कमरेला परत खोचून खिन्न मनाने पुन्हा रथाचा मार्ग धरला. सारथ्याला पूर्ण वेगात घ्यायला सांगून आता बालरामदादाला काय सांगावं त्याचा विचार सुरु केला. तरीही मनाच्या एका कोपऱ्यात हि खिन्नता घर करून होती.
वाटेत सुंदर उद्यान, जलाशय, विस्तीर्ण वन याकडे किंचितसुद्धा न बघता यदुवीर फक्त शून्यात दृष्टी लावून नजरेसमोर फक्त राधेला बहात होता. मधुसूदन मुरलीधर गिरीधर गोपाल सर्व चराचराचा पोशिंदा आणि धनी पण एक भेट राधेची घडली नाही. परिस्थितीवश निराश होऊन पुन्हा मथुरेकडे जाण्यास निघाला होता. वाटेत जाताना दूर वाटलेला तोच मार्ग आता अचानक जवळ वाटू लागला. जाताना अनेक योजन दूर असलेला तोच मार्ग घटकाभरात काटून रथ बघता बघता मथुरेच्या सीमेवर येऊन पोचलासुद्धा. माधव सारथ्याच्या शब्दांनी भानावर आला
" महाराज आलं कि मथुरा. "
"आलं ? इतक्यात ? " आणि एक दीर्घ उसासा टाकून समोरून क्रुद्ध नजरेने बघणाऱ्या बलरामाकडे अपराधी नजरेने पाहत कृष्णाने कान धरले आणि त्वरित चरणस्पर्श करून म्हणाला.
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
१६/०४/२०१८
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment