(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली , कथामालिका)
मुरली - ९
सर्वजणी लगेच जीभ चावून "हो हो चला चला" अस म्हणून लगबगिने वाट चालायला सुरवात करतात. काही घटिकानंतर त्या वृन्दावनात, जिथे कृष्णाने त्याना येण्यास संदेश पाठवला होतात्या ठिकाणी, पोचतात. लगबगीने चालत आल्यामुळे लागलेला दम खात, धापा टाकत उभ्या असलेल्या राधेला रथाचा आवाज स्पष्ट ऐकू येतो. ती त्या आवाजाच्या रोखाने धावत जाते,................ मात्र, तिला कृष्णाचा रथ मथुरेच्या दिशेने म्हणजेच उलट दिशेने परत जाताना दिसतो, आणि ती बाजुच्या एका पथ्थरावर मटकन खाली बसते. तिला रडायलाच येतं. हाय रे दैवा अस म्हणून तीचे नेत्र आपल्या अश्रुना वाट मोकळी करून देतात.
तिच्या या अवस्थेकडे पाहून लांब गप्पा मारत उभ्या असलेल्या तिच्या सख्या धावत पुढे येऊन तिच्यासोबत खाली बसतात. एक सखी पृच्छा करते आणि बाकीच्या प्रश्नार्थक चेहऱ्याने तिची साथ देतात.
" क़ाय झालय राधे . अचानक अशी बसलीस का आणि रडायला का लागलीस ?"
दूसरी सखी
" कृष्ण येणार नाहीये का . तुला त्याचा संदेश कळला होता ना नीट ? आजच येण्यास सांगितल होत ना त्याने ? "
तीसरी सखी
" अग तू काहीतरी बोल ना. आम्हाला कस कळणार क़ाय झालय."
पहिली सखी
" संदेश तर बरोबर होता आजचाच उल्लेख होता आणि प्रहर पण हाच होता, दिवसाचा दूसरा प्रहर सुरु होताना पोहोचावे, असाच होता."
राधेने रडता रडताच कृष्ण परतून गेला त्या मार्गाकडे अंगुलीनिर्देश केला. सर्व सख्यानी त्या मार्गाकडे पाहिलं आणि त्यानाही रडायला यायला लागल. कारण कृष्णाचा रथ धुराळा उडवत दुरवर जाताना सर्वाना दिसला. तो दिसेनासा होई पर्यन्त सर्वानी अगतिकतेने आणि असहाय्यपणे त्याकड़े पाहिलं, निराश आणि खिन्न मनाने. अचानक एका क्षणात त्यांच्या हास्य विनोदाच आणि चेष्टेच परिवर्तन निराशेच्या आणि अतीव दुःखाच्या छायेने ग्रासले गेले.
काही काळ असाच गेला. कोणीही काही बोलण्याच्या मनःस्थितित नव्हतच. कस असणार त्यांचा सर्वांचा लाड़का कृष्ण अर्थातच कान्हा ज्याची शेवटची भेट होणार होती , ती आता काळाच्या गर्तेत हरवून गेली. पुन्हा कधी होईल की नाही हेही काळच जाणत होता. मानवी जीवनातील अगतिकता आणि अतर्क्य योगायोग यांचा अनुभव राधेसह सर्वाना येत होता. राधेची मनःस्थिति तर कल्पनातीत होती.
किती योजिले सांगण्या या मनीचे
तुझी भेट ही ना घड़े भाग्य माझे
तू राजा, तू कार्यारति मग्न म्हणुनी
मला या सखेला न भेटिस येसी
मला भोगणे विरहिणीचेच आहे
असे भोगणे नशिबी मम आहे
तू इच्छिस ते ते तुझे कार्य आहे
मी का या तिमिरी दिवास्वप्न पाहे
तुझे भेटणे जागणे, तेची जगणे
असे भाग्य कैसे परी राधिकेचे
पहावे तुला एकवार फक्त म्हणुनी
युगे अन युगे हे जीणे साधिकेचे
मौनात ही मी तुझे नाम घेते
तुझ्यासाठी या जगी मीच झुरते
तुला झुरणे हे कसे रे कळावे
मुरली तुझी सुर माझे असावे
मुरली तुझी सुर माझे असावे
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
२१/०४/२०१८
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment