ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ९१
विचारांच्या या घणाघातात राजाराम , प्रभू श्रीराम प्रारब्धाच्या अजून एका पर्वातून जात होते. त्यांच्या या निर्णयाचे दूरगामी चांगले, वाईट असे दोन्ही परिणाम होणार होते.
निर्णय कठीण होता. आणि तोच निर्णय राम आणि राजाराम यातील फरक स्पष्ट करणार होता. खूप कठीण निर्णयाची अंमलबजावणी तितकीच कठीण होती. प्रभुनी मोठ्या जड अंतःकरणाने निर्णय घेतला आणि सेवकाला निरोप दिला त्वरित लक्ष्मण , भरत आणि शत्रुघ्न यांना बोलावून आण , त्यांना सांग कि राजा रामचंद्र यांनी त्वरित पाचारण केले आहे. सेवक त्वरेने प्रथम भ्राता लक्ष्मण यांच्या महाली गेला आणि लक्ष्मणास म्हणाला
"राजा रामचंद्र यांनी त्वरित आपणास त्यांच्या महाली हजर होण्यास सांगिलते आहे. आपण पुढे व्हावे मी भ्राता भरत आणि शत्रुघ्न यांना निरोप देऊन येतो. "
सेवक निघून गेल्यावर लक्ष्मण त्वरेने रथ घेऊन राजा रामचंद्रांच्या महाली जाण्यास निघाला. असाच निरोप भ्राता भरत आणि शत्रुघ्न यांना सुद्धा मिळाला आणि तेही त्वरेने राजाच्या महाली आले. सर्व बंधू जमल्या नन्तर प्रभुनी बोलावयास सुरवात केली. प्रभूंचा आवाज खूप क्षीण झाला होता आणि आवाजाला कंप सुटला होता. तीनही बंधूना समजेना कि एकाएकी काय घडले आपल्याला त्वरेने पाचारण करण्यात आले आणि आता प्रभू कंपित स्वरात बोलत आहेत. तरीही सर्वांनी काय सांगतात हे ऐकण्याचे ठरवले.
"आमच्या गुप्तचरांनी सांगितलेल्या माहिती नुसार, राक्षसांकडे काही काळ व्यतीत करून आलेल्या जानकीला आम्ही स्वीकारलेलं बहुतांश प्रजेला रुचलेल नाही. त्यावर प्रजा नाराज आहे. त्याचप्रमाणे त्या एका गोष्टीसाठी प्रजा आमची निंदा देखील करत आहे. अश्या स्थितीत एक राजा म्हणून प्रजेचा आक्षेप ग्राह्य मानून , मी अत्यंत कठोर अन्तःकरणाने जानकीचा त्याग करण्याचे ठरवले आहे. म्हणून उद्या सकाळी त्वरित लक्ष्मणा तू जानकीला गंगे पार असलेल्या वाल्मिकी ऋषींच्या आश्रमापर्यंत सोडून ये. पण या गोष्टीची तिला कोणतीही सूचना देऊ नकोस. "
तीनही बंधू आश्चर्याचा धक्का बसल्या प्रमाणे जागच्या जागी स्तब्ध आणि दिग्मूढ झाले. लक्ष्मण काही बोलणार इतक्यात प्रभु त्यांना गप्प करत म्हणाले
"लक्ष्मणा खूप विचारांती मी या निर्णयाप्रत पोचलो आहे आणि हा निर्णय घेतांना आणि तुला सांगताना मला होत असलेल्या यातना फक्त मीच जाणतो. त्यामुळे तू यावर काहींही समजावून सांगण्याचा यत्न करू नयेस. अन्यथा मी असं समजेन कि तू माझ्या निर्णय क्षमतेशी सहमत नाहीस किंवा मी त्या योग्य नाही आणि असा तुझं करण मी माझी मानहानी समजेन. तेंव्हा काहीही विचार ना करता मी सांगितलेल्या गोष्टीची अमलबजावणी त्वरित कर आणि जानकीला गंगे पार सोडून ये. "
इतकं बोलल्यानंतर प्रभू मंचकावर कोसळले आणि अतीव दुःखातीवेगाने आणि शोकमग्न अवस्थेत अश्रूमय झाले. प्रभू अर्थात ज्येष्ठ भ्राता अश्या अवस्थेत आहेत आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करणे प्राप्त आहे, कारण त्यांनी हा निर्णय राजा राम म्हणून घेतला आहे. त्यामुळे त्यांची राम म्हणून काय अवस्था असेल हे कल्पनातीत आहे. त्यांना काही सांगण्याचा प्रयत्न भरताने करून पाहिला. पण प्रभू शोकमंग स्थितीत वदले "कृपया मला एकांत हवाय आणि माझा निर्णय राजा म्हणून घेतला आहे. एक सामान्य व्यक्ती म्हणून यावर काहीही विचार करण्यामुळे माझ चित्त आणि घेतलेला निर्णय ढळू शकतो. त्यामुळे कृपया आपण सर्व इथून निघून जा आणि या विषयावर पुढे चर्चा नको. "
सर्व बंधू अत्यन्त दुःखी अंतःकरणाने निघाले. या क्षणी देवी जानकीची मनःस्थिति क़ाय होईल या विषयी कल्पनाहि करू शकत नव्हते. ज्येष्ठ भ्राता आणि राजा या दोन्ही दृष्टीने प्रभूंच्या निर्णयावर कोणी काही बोलण्याचा वा विचार करण्याचा प्रश्नच येत नव्हता. अत्यन्त दुःखी आणि शोकमग्न रात्र गेली सर्व बंधूंसाठी. राजाच्या आज्ञेनुसार आणि रघुकुल रितीनुसार ज्येष्ठ भ्राता प्रभू श्रीराम यांच्या निर्णयावर काही चर्चासुद्धा संभवत नव्हती.
पहाटे ब्राह्ममुहूर्ती लक्ष्मण जड अंतःकारणाने आणि जड पावलाने देवी जानकीच्या महाली जाण्यास निघाला. महालाबाहेर येऊन सेवकांकरवी निरोप पोचवला कि, आपण आलो आहोत. देवी जानकीने अत्यन्त आनंदाने लक्ष्मणास आत बोलावले. लक्ष्मण आत येऊन देवींना म्हणाला
"महाराज श्रीराम यांनी मला आपणास घेऊन गंगेपलीकडील आश्रमात नेण्यास सांगितले आहे. आपण तयार असाल तर मी मंत्री सुमंत यांना सांगून रथ जोडून तयार होतो. "
यावर देवींनी आनंदाने होकार दिला आणि पुढील तयारी साठी काही काळ मागून घेतला. त्यावर लक्ष्मण म्हणाला
"ठीक तर तुमची तयारी होई पर्यंत मी आणि आर्य सुमंत निघण्याची तयारी करून आपली प्रतीक्षा करत उभे राहतो. आपण आपलं यथास्तित यावं. "
"ठीक आहे. "
"धन्यवाद माते. "
असं म्हणून लक्ष्मण काही अधिक न बोलता पुढील तयारी साठी निघून गेला. देवी जानकी आपणास आश्रमात जावयास मिळणार या आनंदात पुढील तयारीसाठी अंतःपुरात निघून जातात.
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment