ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ७०
अयोध्येला जाण्याची राजाज्ञा ही हनुमंताला इष्टापत्तिच होती. तो त्वरेने महाराज सुग्रीवांची अनुमति घेऊन , पुन्हा मातेकडे आला. मोठ कठीण काम होत मातेचा निरोप घेण. मातेच्या पाया पडून झाल्यावर हनुमंताने मातेला सर्व व्रुत्तान्त कथन केला आणि प्रश्नार्थक चेहऱ्याने मातेकडे पाहिले. मातेच्या चेहऱ्यावर पुन्हा वियोगाची छाया पसरली होती. पण त्यातही सुखाची बाब हीच की पुत्र राजा प्रभुराम यांच्यापदरी असेल आणि मधे मधे येत राहिलं कारण तो दोन्ही राज्यांमधला दुवा असेल. मातेने मोठ्या जड़ अन्तःकरणाने निरोप देत, वाटेत भोजनासाठी काही कंदमूळ व काही फळे दिली.
" आता माते हे कशासाठी"
" माहित आहे वाटेत तू काही खाशील की नाही ते. विसरशील सुद्धा प्रभुंच्या स्मरणात. पण त्याच प्रभुना प्रार्थना केल्ये की याला भोजनाचेही स्मरण द्या आणि द्रोणागिरी उचलणाऱ्याला हे काही जड़ नाही. क़ाय बरोबर ना ? "
दोघेही हास्यात विरुन गेले आणि हनुमंताने पुन्हा मातेला नमस्कार केला आणि
" जय श्रीराम " असे म्हणत उड्डाण केले थेट अयोध्येच्या दिशेने. मार्गात एक दोन ठिकाणी मुक्काम करून त्याने मातेने दिलेली शिदोरी थोड़ी हलकि केली आणि थोड़ी न्याहारी काही उद्देशाने उरवून अयोध्येत प्रवेश केला.
रामराज्याची सुरवात झाल्यापासून आधीच असलेली रम्यनगरी अयोध्या अजूनच खुलून दिसत होती. अनेक प्रकारचे वटव्रक्षासारखे महाकाय विस्तीर्ण व्रुक्ष, आम्रव्रुक्षांच्या बागा, गुलमोहरासारखी ऊंच ऊंच झाड़, लता , वेली आणि अगणित पुष्पवाटिका, या व्रुक्षांच्या छायेत घटका दोन घटका विश्रांति घेत थांबलेले पांथस्थ ,त्या व्रुक्षांवर डोलणारे, बागडणारे , स्वछंदे विहार करणारे पक्षी. त्यांचा तो किलबिलाट कानाला मधुर वाटत होता. गोधनासह सर्व पशुधन रामराज्यात सर्वात सूखी जीव होता. त्यामुळेच दूध दुभत अमाप असलेल राज्य म्हणजे अयोध्यानगरी.
हनुमंताला इथे आपल्या नगरीची आणि तिथल्या पशु पक्ष्याची आठवण आली. पण तरीही अयोध्येच सौंदर्य काही औरच होता.
अगदी रघुराजापासुन इथली शोभा , उत्साह, निसर्ग आणि सुबत्ता स्वर्गालाही लाजवेल अशीच होती आणि आहे सुद्धा अजून टिकून. यात लोकांबरोबर राजाचाहि सहभाग हा कौतुकास्पद होता . नव्हे तर ती रघुकुलाची परंपराच होती. लोकानूनय आणि लोकमताचा पूर्ण आदर. उत्तम राजाच हेच पाहिल लक्षण असत की तो कोणत्याही मताचा अनादर न करता योग्य तो आणि लोकहितार्थ अपेक्षित असेच निर्णय घेतो. अपवाद अर्थातच कैकईने केलेल्या क्षोभाचा आणि एकांगी विचारांचा. अन्यथा अयोध्येला असा कठीण काळ कधीही आला नव्हता, या आधी.
पण आज भूतकाळाच्या त्यापाऊलखुणा पुसून अयोध्यानरेश प्रभु श्रीराम यांच्या सयोग्य नेतृत्वामुळे पुन्हा त्याच वैभवाला प्राप्त होणार आहे , हे सर्व जनमन जाणून होते. काळच्या ओघात अनेक संकट आणि युद्ध यांच्या पार झालेले अयोध्यावासी पुन्हा एकदा सुखाने श्वास घेऊ लागले होते. राज्याचा कारभार यथास्थित हळू हळू स्थापित होते होता. प्रशासनव्यवस्था , न्यायव्यवस्था, संरक्षणव्यवस्था या सर्वांची घड़ी पुनर्स्थापित होत होती. लोकोपयोगी काम रामराज्यात सुरु झाली होती. जागोजागी सुसज्ज पाणपोया, पांथस्थासाठी धर्मशाळा व भोजन व्यवस्था, याचकाना अन्नदान, वस्त्रालंकार दान यासारख्या योजनांची आखणी आणि अम्मलबजावणी सुरु झाली होती. रामराज्याचा मुख्य उद्देश्य याचकरहित अयोध्या घड़वण हाच होता.
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment