ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ६९
माता अंजनीचे मन भरेल असा सहवासाचा आनंद घेतल्या नंतर हनुमंत मातेला म्हणाला की, आता महाराज सुग्रीव यांच्याकडे जाण्याची अनुमति असावी. अर्थात पुत्र कितीही दिवस थांबला तरीही मातेला तो काळ क्षणात सरल्यासारख वाटत. इथेहि तसच झाल. माता लगेच हनुमंताला म्हणाली
" अरे मारुति आता तर आलास. लगेच निघालास सुद्धा. किती रे कमी वेळ देतोस मला"
यावर स्मित करून हनुमंत म्हणाला
" माते मला येऊन उणेपूरे दोन सप्ताह निघून गेले आहेत. सुग्रीव महाराज वाट पहात असतील."
" त्याना रे कस कळेल , तू आलायस हे"
"माते त्यांचं गुप्तहेर खातं खुप प्रबळ आहे. तयाना मी इथे येण्या आधीच समजल असेल की, मी निघलोय अयोध्येहुन . तेंव्हा आता जऱ मी गेलो नाही तर, त्यांचे सेवक मला बांधून घेऊन जातील."
"मग जा रे बाबा तू वेळेत. ऊगाच राजाज्ञेचा भंग नको. ते खुप मोठ पातक होईल. त्यातही राजा जऱ सुग्रीवासमान असेल तर नककीच महापातक ठरेल. तू आपला वेळेत जा हे बर."
" बर जशी तुझी आज्ञा माते. प्रणाम करतो, आशीष दे."
" सदा यशस्वी रहा."
"जय श्रीराम "
अस म्हणून हनुमंत त्वरेने उड्डाण करता झाला. काही क्षणात तो महाराज सुग्रीव यांच्या समोर भव्य सभागृहात दाखल झाला. जिथे आधीपासून अंगद, नल, नील, जाम्बुवन्त आदि उपस्थित होते. महाराजांना विधिवत प्रणाम करून हनुमंत म्हणाला
" महाराज सुग्रीवांचा विजय असो"
"हनुमंता ज्याच्या पदरी हनुमंत अंगदा, नल, नील, जाम्बुवन्त यासारखे वीर शिरोमणी आहेत त्यांचा सतत विजय होतच राहणार."
"क्षमा महाराज पण सर्व कर्ता धर्ता प्रभु श्रीराम आहेत. त्यांच्यामुळेच सर्व शक्य झाल."
" हे तू अगदी सत्य बोललास हनुमंता. बर, अयोध्येचा क़ाय समाचार आहे, प्रभु श्रीराम माता जानकीसह तिकडील सर्वजण कुशल मंगल आहेत ना ? आणि कशी आहे आमची माता अंजनी. तिच पूर्ण समाधान होईल असा राहिलास ना. खूपच लवकर आलायस इकडे अस नाहीये ना ?."
हनुमंत खुप बुद्धिमान आहे. तो मनात विचार करतो महाराज सर्व जाणून सुद्धा विचारत आहेत म्हणजे त्याना माझ्याकड़ून ऐकायच असावं, मी कधी आलोय ते. हनुमंत उत्तरतो.
" महाराज माता आहे ती, आपणही पुत्र आहात. जाणताच की मी कितीही सहवास दिला तिला तरीही, तो कमीच् असेल. पूर्ण दोन सप्ताह राहून आलोय. येऊन जितका काळ लोटला तो पूर्ण मातेला दिलाय. त्यानंतरच सांगून निघालोय की,महाराज सुग्रीव रुष्ट होतील अस मी काहीही करू शकत नाही. योग्यच केले ना मी ? महाराज "
हनुमंताच्या बोलण्यातील भाव महाराजांना पोचला आणि दुतांकडून आलेली वार्ता बरोबर आहे हेही सिद्ध झाल. त्यांमुळे महाराज सुग्रीव म्हणाले
" हे तू योग्यच केलेस हनुमंता.मातेचा स्वभाव मी जाणतो. पण तरीही त्याना भेटून तुझे क्षेमकुशल सांगताना मी म्हणालो होतो की , मन भरेपर्यंत ठेवून मगच पाठव ग माते."
" मातेच मन कधीही भरणार नाही हे तुम्हीही जाणता अन मीही. इकडील कार्यही तितकेच महत्वाच आहे. हे मी तिला पटवून दिले आणि तिची अनुमति घेऊन मगच येथे आलो आहे."
" हे तू योग्यच केलेस कपिश्रेष्ठा "
ततपश्चात महाराजांनी त्यांच्यां राज्यातील अनेक महत्वपूर्ण गोष्टी , घडामोडी , घटनांचा आढावा घेतला. हनुमंतासह सर्व मंत्रीगणाबरोबर उपयुक्त चर्चा करून अनेक प्रश्न मार्गी लावले. अनेक प्रश्नांच्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या. हनुमंत हा त्यांचा एक सेवक राहिला नव्हत , तर तो एक खुप महत्वाचा व्यक्तिविशेष होता, खासकरुन अयोध्येशी संबंध ठेवण्याच्या दृष्टीने व त्यांच्याकडून योग्य वेळी योग्य ते सहाय्य घेण्याच्या दृष्टीने सुद्धा. म्हणून त्यानी हनुमंताशी विशेष चर्चा करून अयोध्येकडून काही महत्वपूर्ण सहाय्य मागण्याच्या दृष्टीने पुन्हा प्रस्थान ठेवण्यास सांगितले. हनुमंत पडत्या फलाची आज्ञा असे समजुन त्वरेने निघाला सुद्धा, अयोध्येकडे.
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment