ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ८३
इच्छीत वर प्राप्तिमुळे दशानन आणि इतर दोन असुर पूर्ण भयरहित होऊन समस्त जगतात आणि तिन्ही लोकांत त्राहि त्राहि असा अत्याचार सुरु केले. पृथ्वीवरील समस्त राजे महाराजे यांना हार अथवा युद्ध असं आव्हान देऊन दशाननाने संपूर्ण पृथ्वीवर हाहाकार उडवून दिला. यात मुखत्वे अयोध्येतील इकश्वाकु वंशीय राजा अनरणय याला सुद्धा युद्धात अपमानित पराजित करून यमसदनी पाठवलं. पण जाते वेळी त्यांनी दशाननाला भविष्यवाणी सांगितली कि, इकश्वाकु वंशातील बेचाळिसाव्या पिढीतील राजा दशरथाचा ज्येष्ठ पुत्र राम तुझा वध करून या अपमानाचा बदला घेईल. यावर दशाननाने दर्पोक्ती पूर्ण उदगार काढून कोणताही तुच्छ मानव माझं काहीही वाकड करू शकत नाही कारण जिथे देव दानव यापासून मी अवध्य आहे तिथे मानवाची काय कथा.
सर्व पृथ्वी पादाक्रान्त करून झाल्यानंतर लंका त्यागून कैलासावर प्रस्थान केलेल्या कबर अर्थात वैश्रवण याच्या राज्यावर आक्रमण करण्याचे दशाननाने योजले. तेथे गेल्यानंतर आश्चर्य चकित होऊन विस्मयकारकपणे आणि स्तिमित होऊन त्या रम्य नगरीची शोभा पाहून दशानन स्तब्ध झाला. विविध रंगछटांनी चमकते मोठमोठे वृक्ष, कदंब , मौलसिरी, मंदाकिनीच स्फटिकासम जल, फक्त अनेक रंगी कमळ असलेलं उद्यान, चाफा, नागकेशर, अशोक, मंदार , गुलाब प्रियंगु, अर्जुन केवडा, बकुळ, तगर, इद्यादी फुल आणि तसेच , आम्रफळ यांनी बहरलेली वने , उपवने, उद्याने, त्या वनामध्ये हर्षभरित स्त्रिया व पुरुष नृत्य गायनादी कार्यक्रमात मग्न होत्या.
कुंभेराच्या राजमहाली गंधर्व गायन आणि अप्सरा नृत्य यांचे मनोहारी अविष्कार करण्यात मश्गुल होत्या. उद्यानातून , वनातून आणि उपवनातून येणारा वारा एक वेगळाच धुंद करणारा सुगंध घेऊन येत होता. फुलातून येणार तो गंध वसंत ऋतूच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता. या भारलेल्या वातावरणाचा परिणाम आणि त्यातच मनमोहक पौर्णिमेच चांदणं सौन्दर्यात अजूनच भर टाकत होत. अश्याच धुंद वातावरणात दशाननाने सर्व अप्सरांमध्ये श्रेष्ठ रंभेला जाताना पहिले. ती साजशृंगार करून कुबेर पुत्र नलकुंवर यास भेटण्यास निघाली होती. त्याचा स्वतःवरील ताबा केंव्हाच सुटला होता. त्याचा अयोग्य परिणाम रंभेला भोगावा लागला.
घाबरलेल्या अवस्थेतील रंभेने नलकुंवराकडे येऊन सर्व कथन केले. नलकुंवराने ध्यान लावून सर्व जाणले आणि हेही जाणले कि, ब्रह्मदेवाच्या वरदानाने याचा अंत आपण करून शकत नाही. म्हणून क्रोधायमान नालकुंवराने हातात जल घेऊन आचमनपूर्वक मंत्र पठण करून शापवाणी केली कि यापुढे कोणत्याही स्त्रीशी दशानन तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरी करेल तर त्याच्या साक्षात मृत्यू होईल. हि शापवाणी आकाशवाणी समान दशाननाच्या कानावर गेली आणि तो पूर्ण खजील झाला.
रावण पुन्हा लंकेस परत आला तेंव्हा पुत्र मेघनाद शुक्राचार्याच्या मदतीने यज्ञ संकल्पना व्यस्त होता. रावण थोडा नाराज स्वरात म्हणाला अरे रणभूमीवर दिसायचं सोडून तू येथे काय करीत आहेस.
यावर शुक्राचार्या म्हणाले हे दशानना मेघनादाने आज पर्यंत अनेक यज्ञ करूंन अनेक दुर्लभ सिद्धी आणि अस्त्र शस्त्र प्राप्त केली आहेत. यावर मात्र दशानन प्रचंड खुश होऊन म्हणाला.
" मग पुत्रा मला तुझा अभिमान आहे. आता आपण दोघे मिळून स्वर्ग लोक आणि इंद्र लोक यावर चढाई करून त्यांना जिंकून घेऊया
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment