l ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ७८
" हे राजन आपण प्रत्यक्ष दशानन रावण याचा वध करून आणि अयोध्येचे राज्य ग्रहण केल्यापासून आपणाशी काही विषयावर महत्वपूर्ण चर्चा करायची आहे आणि त्याच कारणास्तव आम्ही आलो आहोत."
"जरूर मला क़ाय आज्ञा आहे ते सांगा मी जरूर आपल्या सर्व शंकाच समाधान करण्याचा यत्न करीन."
अगस्त्य ऋषि म्हणाले
" हे राजा रामचंद्र आपण लंकापति रावण याचा वध करून खूपच महत्वपूर्ण , लोकोपयोगी कार्य केल आहे यात शंका नाही. तरीदेखिल त्याही पेक्षा महत्वपूर्ण कार्य लक्ष्मणाने मेघनाद , अर्थात ज्याला इंद्रजीत अस संबोधल जात, त्याचा वध करून केल आहे अस आम्हा सर्वांच मत आहे"
यावर प्रभु शांतचित्ते अगस्त्य ऋषिना म्हणाले
"आपण मला विस्तारपूर्वक सांगाव मी ते शान्तचित्ते आणि लक्षपूर्वक ऐकिन अस आपणास वचन देतो."
" त्यासाठी राक्षसराज रावण याच्याबद्दल पूर्ण विस्ताराने सांगाव लागेल."
"ऋषिवर मी ते ऐकण्यास उत्सुक आहे आपण मला उद्बोधित करावे."
" ऐक राजन. ब्रम्हदेव पुत्र प्रजापति यांचे पुत्र पुलस्य, अर्थात ब्रह्मदेवांचे पौत्र , एक महान ऋषि व थोर तपस्वी होते. जणु साक्षात दूसरे ब्रम्हदेव. त्यांचा पुत्र होता विश्रवा. विश्रवा देखील पित्याप्रमाणे उग्र तप करून महातपस्वी झाले होते. त्याना वैश्रवण नावाचा पुत्र होता. पुत्र वैश्रवण याचेवर त्याचे तात पुलस्य यांचा फार जीव होता. वैश्रवण यानी देखील या दोघांप्रमाणेच घोर तप करून काही सिद्धि प्राप्त केल्या होत्या.
पण त्यांची इच्छा धनेश अर्थात विश्वातील सर्व धनाचा रक्षक होण्याची होती . म्हणून त्यानी तात पुलस्य यांच्या सांगण्या वरून ब्रम्हदेवाना प्रसन्न करण्यासाठी दहा हजार वर्ष उग्र तप केल. यावर प्रसन्न होऊन ब्रम्हदेवानी त्याना म्हणाले
"वत्सा , हे विश्रवानंदना मी तुझ्यावर प्रसन्न आहे जी इच्छा असेल तो वर माग मी तुझी इच्छा पूर्ण करीन."
" हे सृष्टिकर्ता ब्रम्हदेवजी आपण प्रसन्न असाल तर माझी एकच इच्छा आहे ती पूर्ण करावी."
" बोल वत्सा, शीघ्र माग. मी तुझी इच्छा पूर्ण करण्यास उत्सुक आहे"
" मला धनेश होण्याची इच्छा आहे अर्थात विश्वातील सर्व धनाचा, सम्पत्तिचा रक्षणकर्ता. ही माझी इच्छा आपण पूर्ण करावी. मला अन्य काहीही मागण्याची इच्छा नाही"
यावर ब्रम्हदेवाने म्हटले
" मी इंद्र , वरुण व यम यानंतर चौथ्या लोकपालाची निर्मिति करण्याच्या संकल्पात होतोच. तुझ्या इछेकारणे तेही कार्य संपन्न होईल. तुला तिन्ही लोक कुबेर या नावाने ओळखतील. तुजप्रत कल्याण होवो. तथास्तु"
या वर प्राप्तिनंतर वैश्रवण, अर्थात कुबेर, तात पुलस्य यांच्या कड़े परत आले. त्यानी पुलस्य ऋषि अर्थात तात याना आपले तप आणि ब्रम्हादेवांनी दिलेल्या वराचा सर्व व्रुत्तान्त कथन केला. यावर ऋषि पुलस्य म्हणाले
" पौत्रा वैश्रवणा मला तुझा अभिमान आहे. आता तुझी क़ाय इच्छा आहे."
" मला अश्या स्थानी कायमस्वरूपी वास करावयाचा आहे जे स्थान रम्य आणि दुर्गम असेल."
" पौत्रा यासाठी सर्वात उत्तम ठिकाण म्हणजे चारी बाजुनी सागरसीमा असलेले लंकाद्वीप. ते स्थान पूर्वी राक्षसांचे वसतिस्थान होते. पण महाविष्णुनी तिथुन त्याना पिटाळून लावल्यापासून तिथे कोणीही राहात नाही. तिथे तू जा आणि त्या रम्य नगरीत वास्तव्य कर."
येथे प्रभु प्रश्नकर्ते झाले
" महामुनी अगस्त्यजी म्हणजेच तेथे रावणा आधी राक्षस अस्तित्वात होते."
यावर ऋषिराज वदले
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment