Skip to main content

जानकी पुनःवनवास ८६

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ८६

या क्षणी सर्व बन्धु प्रभुंकडे मोठ्या कौतुके पहात होते.

अगस्त्य ऋषी पुढे म्हणाले

परंतु मेघनादाने असा वर मोठ्या चतुराईने मागितला की त्याला परास्त करणे कोणालाही शक्य झाले नसते. जे महान कार्य शेषावतारी लक्षणाने प्रसंगी प्राण पणास लावून साध्य केले. एकवार नव्हे अनेकवार आणि अनेक मायावी रूपात अनेक ठिकाणी प्रकट होऊन  व अनेक प्रकारचे भास निर्माण करून लक्ष्मणास आपल्या मायेच्या पाशात ओढण्याचा अनेक प्रकारे यत्न केला. परंतु या सर्व मायेच्या पार जाऊन इन्द्रजीतास यमसदनी पाठवणे हे दिसते तितके सहज साध्य कार्य नव्हते. म्हणून आधी म्हटल्याप्रमाणे हे लक्षणाचे थोर कार्य आहे."

प्रभुराम यावर स्मितवदन म्हणाले

"मुनीवर रावण अर्थात दशानन या संदर्भात आपण जे निवेदन केलेत आणि त्याच्या जन्माच्या आधीची असुरांची उत्पत्ती या विषयी संपूर्णसत्य कथन करून खूप महान कार्य केलं आहे. एक गोष्ट निर्विवाद आहे कि असुर शक्ती या नेहमी तपोबलाने इच्छित वर प्राप्ती करून, त्या शक्तीचा दुरुपयोग करून, संपूर्ण जगताला आपल्या  ताकदीच्या आणि वरदानाच्या धाकाने त्राही त्राही करतात. यात एक गोष्ट खूप महत्वाची लक्षात ठेवली पाहिजे कि, सर्व जीव पूर्णतः कर्मानुबंधांत असतात. त्या न्यायाने , अर्थात जसा  जसा त्या शक्तीचा वापर पापकर्मासाठी आणि स्वार्थ , लाभ व दुर्व्यवहार यासाठी केला जातो , तसा  तसा त्या त्या प्रत्येक कर्माने त्या शक्ती हळू हळू क्षीण होत जातात. हे त्या असुरांना लक्षात येत नाही. कारण ते त्या शक्ती प्राप्तीच्या उन्मादात या सर्व गोष्टी तसेच हा नियम पूर्ण विसरून जातात आणि उन्मत्त होऊन आपल्या मर्यादांच उल्लन्घन करू लागतात.

कोणतेही कर्म हे फलद्रुप होतेच होत. म्हणजेच प्रत्येक कर्म ते सत् असो वा असत्,  आपले काम केल्याशिवाय केंव्हाही मोक्ष प्राप्त करत नाही अर्थात अंत पावत नाही. यदाकदाचित फल प्राप्ती पूर्वी प्राण्याचा, त्या जन्मात, मृत्यू झाल्यास सदर कर्मफल त्याला पुढील जन्मी भोगूनच संपवावे लागते. हाच विधात्याचा सिद्धांत अर्थात विधिलिखित आहे. जे प्राणी स्वतःच्या कर्माने लिहून ठेवतो , पण मिळालेले फल  आणि कर्म यांचा संबंध त्याला जड देहाच्या मर्यादांमुळे समजू न शकल्यामुळे तो हे जणू शकत नाही आणि या मायेच्या पाशात अडकून कर्मबंधानाची महती जाणत नाही. विधाता वा सृष्टिकर्ता कधीही तुमच्या कर्म फल साखळीत कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष हस्तक्षेप करत नाही. किंबहुना तसा अधिकार विध्याताला देखील नाही. मग तो प्राणी सर्वसामान्य जीव असो वा कोणी अवतारी पुरुष, अथवा ऋषी मुनी यांपैकी कोणीही.

रावणाच्या बाबत जे घडले ते त्याच्याच दुष्कृत्याचे कर्मफल, त्याला त्याच्या मृत्यूपर्यंत घेऊन गेले. जे महामुनी अगस्त्य यांनी सांगितल्या प्रमाणे प्रत्यक्षात , त्याच्या वरानुसार,  दुस्तर होते. पण त्याच्याच उन्मत्त आणि दर्पोक्तीपूर्ण वर्तनाने त्याने विधात्यास त्याचा मृत्यू समीप आणण्यास भाग पाडले. रावणाचा अंत मुख्यतः त्याला एक संदेश या रूपात मिळाला होता. ज्यावेळी त्याने रंभा या अप्सरेशी दुर्व्यवहार केल्याकारणे ,  नलकुंवाराने त्यास शाप दिला. तो त्याच्यासाठी मृत्यूसमीप नेणारा पहिला संदेश होता. त्यावेळी सुद्धा तो सावरता तर पुढील अनर्थ टळला असता. त्यामुळे त्याला संपवण्याचे  कार्य माझ्यापेक्षा त्याने स्वतःच प्रथम केले. मी फक्त त्यावर शिक्कामोर्तब केले इतकेच.

आता मेघनाद अर्थात इंद्रप्रस्थाचा पराक्रम आणि शौर्य असामान्य होत यात अर्थात शंका नाही. कारण रावणाला जस देव , दानव, असुर, इत्यादींपासून अभय मिळाले होत,  ज्यामुळे त्याला लढताना एक प्रकारे विशेष फायदा होत असे. जे कवच इंद्रजिताला उपलब्ध नव्हते. आणि तरीही त्याने पराक्रम व मिळविलेल्या मायावी शक्तींद्वारे इंद्रास परास्त केले. वास्तविक पाहता या सर्व शक्ती व मायावी अस्त्र इंद्राकडे सुद्धा उपजतच होत्या. तरीही त्याचा उपयोग करून शत्रूला तो पराजित करू शकला नाही. त्याचप्रमाणे इंद्रावरील विजयानंतर ब्रह्मदेवांकडून मिळालेल्या वरदानामुळे इंद्रजिताचे पारडे कोणत्याही लढाईत शत्रूपेक्षा श्रेष्ठ ठरणार होते. एक प्रकारे तो अमर प्राप्तीच्या जवळ पोचला होता. म्हणून त्याला  संपवणे हे रावणाला मारण्यापेक्षा जास्त कठीण व क्रमप्राप्त होते. किंबहुना रावण आणि मृत्यू यांच्या मध्ये इंद्रजित एक भिंत बनून उभा असे.

ते महत्वाचे कार्य लक्ष्मणाने, त्याच्या अस्त्र शस्त्र विद्या यांचा आणि अनुभवाचा वापर करून, प्रसंगी स्वतःचे प्राण संकटात टाकून, पार पाडले. आणि त्याच वेळी रावण वध सुनिश्चित झाला. पण या सर्वांमध्ये विभीषणाचे खूप महत्वाचे योगदान आहे. जे कदापिही  विसरणे शक्य नाही. अर्थात त्याचे हे सत्कर्म  त्याने ब्रह्मदेवाकडून मागून घेतलेल्या वरदानाद्वारे, त्याने स्वतास धर्मबद्ध करून घेतले यात दडलेले आहे. तरीही  त्याला यत्किंचितसुद्धा मानसिक त्रास झाला नसेल असे म्हणता येणार नाही. परंतु त्याने धर्माच्या व न्यायाच्या बाजूने उभे राहण्याची आपलीच प्रतिज्ञा राखली, इतकेच नव्हे पूर्ण करून आपले नाव अजरामर केले. माझ्या मते हे कोण्या एकट्याचे नव्हे तर ते एक संघटित कार्य आहे आणि यात एका खारी  पासून ते लक्ष्मण , हनुमन्त इथंपर्यंत सर्वांचे योगदान आहे. आणि ते योगदान. अपूर्व व अमूल्य आहे. हे माझं प्रामाणिक मत आहे."

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...