ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ९०
त्यावेळी मी तिला म्हणालो होतो कि,
" तुझी हि इच्छा नक्कीच पूर्ण करीन. अगदी उद्यासुद्धा
लक्ष्मणाला सांगतो तुला सोडायला , येथून जवळच असलेल्या , वाल्मिकी ऋषींच्या
आश्रमात. तुझं मन भरेपर्यंत रहा तिथे."
अगदी कालच घडलेला हा संवाद आणि गुप्तहेराने सांगितलेल्या वृत्तांत याचा गहन विचार करत प्रभू बसलेले आहेत.
एका कठीण पेचात परिस्थितीने प्रभुना आणून सोडलं होत. निश्चितच प्रश्न खूप गहन होता. आजपर्यंत खर, दूषण, कुंभकर्ण , रावण आदी राक्षसांना सहज पराभूत करून काळाच्या गर्तेत यमाच्या पाशात नेऊन सोडलेलेल्या प्रभुना एका विचित्र पेचात पकडलं होत नियतीने. गेली अनेक वर्ष जणू नियतीचा हा खेळ सुरु होता. एखाद्या प्रसंगातून बाहेर पडून थोडं समाधान मिळत नाही तोच नवीन पेच, नवीन समस्या, नवीन प्रश्न समोर आणून उभा करत होती नियती. प्रारब्धाच्या ह्या शृंखला तोडण्यासाठी जणू हा जन्म होता कि काय हे ईश्वर जाणे. अर्थात स्वयं ईश्वरी अंश असल्यामुळे प्रत्येक निर्णयाचे योग्य, अयोग्य, दूरगामी परिणाम बघून निर्णय घेणं हि जणू कसोटीच असे.
अर्थात बुद्धिमत्ता, शक्ती व युक्ती या जोरावर आज पर्यंत अश्या अनेक दैवी कसोटया पार करणाऱ्या प्रभू श्री राम यांना हा पेच आणि प्रसंग वाटतो तितका सोप्पं नव्हता. त्यांच्या मनात विचारांची उलथापालथ सुरु होती.
एक मन म्हणत होत.
" चौदा वर्षांपूर्वी पित्याच्या आज्ञा पालना करता राज्यावर पाणी सोडून गेलास पितृ वाचनाला जगताना एक क्षण सुद्धा राज्याचा विचार मनात आला नाही. तीच अथवा थोड्याफार फरकाने तशीच स्थिती आज पण आहे. "
त्याच वेळी दुसरं मन सांगे
"आज परिस्थिती वेगळी आहे. आज तू निश्चित एक राजा आहेस रामा. तेंव्हा तू फक्त एक पुत्र होतास. तुझा युवराज म्हणून सुद्धा राज्याभिषेक झाला नव्हता. राजा हा प्रथम आणि अनंतकाळ पर्यंत आधी आणि नन्तर फक्त आणि फक्त प्रजेलाच उत्तरदायी असतो. नव्हे त्याच साठी त्याचा जन्म असतो. राजा असण हे याच साठी वाटत तितक सहज नसत. राजाची इतिकर्तव्यता हि कुटुंबाच्या कर्तव्यापेक्षा देखील सर्वोच्च असते. राजा हा सर्वात प्रथम प्रजेला उत्तरदायी असतो. म्हणून राजाला ईश्वराचा प्रतिनिधी अथवा अंशरूप मानलं आहे ते याच साठी. "
पुन्हा पाहिलं मन म्हणाल
"हे जरी खरं असलं तरीहि संपूर्ण कुटुंबाला नाही तरीही निदान जे आपल्यावर अथवा आपल्यासाठीच आहेत अश्या नात्यांचा नक्कीच विचार हा केला पाहिजे. कर्तव्यता हि कोणाचा बळी न देता पार पडता आली पाहिजे. अन्यथा या दोहोंमधील एक निवडण्याची वेळ आल्यास प्रथम जे सर्वस्वी आपल्यावर अवलंबित आहेत त्यांना प्रथम प्राधान्य दिल पाहिजे, हे नक्कीच. "
दुसर्या मनाकडून आवाज आला
"राजा हा एक क्षणाचाही कुटुंब सदस्य नसतो. तर तो पूर्णतया आणि दिवस रात्र फक्त प्रजेचाच असतो. दुसरं एक क्षण समजूया कि प्रजेच्या आक्षेपामुळे राज्य सोडून धर्मपत्नीला घेऊन राज्याबाहेर निघून जाण हा निश्चित एक पर्याय असू शकतो. पण यात राजा आपल्या इतिकर्तव्याला भ्यायला अथवा अपुरा पडला आणि कौटुंबिक कर्तव्य त्याने श्रेष्ठ मानले हा समज रूढ होऊन, पुढील काळात कोणताही राजा कर्तव्याच्या कसोटीवर उतरण्याची परिस्थिती आली असेल त्यावेळी कौटुंबिक कर्तव्याला प्राथमिकता देऊन संकाटातून सुटका करून घेण्याचा सर्वात सहज मार्ग स्वीकारेल. म्हणूनच हे राजा कितीही कठीण निर्णय असला आणि तो स्वतःच्या मनाविरुद्ध घ्यावयाचा असला तरीही तुला प्रजाहित, राजाची आद्यकर्तव्यता , निर्णयाचे दूरगामित्व, सद्सद्विवेक बुद्धीचे स्मरण आणि रघुकुलाची प्रजापालनाची महती या सर्वांचा एकत्रित विचार करून सुयोग्य निर्णय घ्यावयाचा आहे. लक्षात ठेव, तुझ्याच कुळात राजा हरिश्चंद्राने स्वप्नातील वचन पूर्ण करण्यास्तव सर्वस्वाचा त्याग अगदी कुटुंबाची वाताहत होईपर्यंत न ढळू देता , पुत्र गमावून सुद्धा शब्द पाळला होता. याचे भान ठेव. तू देखील त्याच परंपरेचा पाईक आहेस. तुझ्या निर्णयाने एक कुटुंब सदस्य म्हणून लौकिक गेला तरी देखील अधर्म होणार नाही. कारण तू आता सर्वात आधी राजा आहेस आणि नन्तर तू एक पुत्र , पिता , बंधू, सखा , आप्त व स्वकीय आहेस आणि असशील. उद्या एखादा निर्णय कुटुंबातील सदस्यांविरुद्ध घ्यावयाचा असल्यास. तुला तो राजा या भूमिकेतूनच घ्यावा लागेल. कारण तू क्षणाचा नव्हे तर अनंत काळचा राजाच आहेस आणि आजन्म राजाच राहणार आहेस. तुझी इति कर्तव्यता हि राजाच्या भूमिकेतून निर्णय घेण्याचीच असावी. आणि याच क्षणी तुझ्या सद्सद्विवेक बुद्धीची कसोटी आहे. भावना श्रेष्ठ कि कर्तव्य. "
बाहेर सर्वत्र शांतता असताना मनात मात्र हीच उलथापालथ आणि विचारांचं प्रचंड आंदोलन चालू होत. वरपक्षी अतिशय शांत दिसणारे प्रभू आत कर्तव्याच्या आणि नात्याच्या बंधनात अडकले होते. निर्णय घेण्याची वेळ जवळ जवळ येत होती. प्रत्येक क्षण समोर येऊन उभा राहून आठवण करून देत होता.
राजा तुझा निर्णय काय आहे. राजा लवकर निर्णय घे. राजा कर्तव्य श्रेष्ठ आहे, बाकी सर्व भावनेची बंधन आहेत जी राजाला नरकद्वारी घेऊन जातात. कित्येक पराक्रमी व थोर राजे कर्तव्याला थोडक्यात चुकल्यामुळे रौरव नरकात अडकून पडले आहेत. राजा म्हणून निर्णय घे, कुटुंब म्हणून नव्हे.
विचारांच्या या घणाघातात राजाराम , प्रभू श्रीराम प्रारब्धाच्या अजून एका पर्वातून जात होते. त्यांच्या या निर्णयाचे दूरगामी चांगले, वाईट असे दोन्ही परिणाम होणार होते.
निर्णय कठीण होता.आणि तोच निर्णय राम आणि राजाराम यातील फरक स्पष्ट करणार होता.
निर्णय कठीण होता.आणि तोच निर्णय राम आणि राजाराम यातील फरक स्पष्ट करणार होता.
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment