ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ७७
त्या वीस ऋषि आणि त्यांच्या शिष्यगणाना घेऊन भरत अतिथिगृहाकडे मार्गस्थ झाला. त्यांच्यां यथोचित स्वागतानंतर भरत महालाकडे रवाना झाला. निघते वेळी भरताने अतिथिगृहाच्या सेवकवर्गाला आवश्यक सूचनां दिल्या आणि त्या ऋषिना आपण उद्या प्रथम प्रहरी येऊन आपणास महाराज रामचंद्रांकडे घेऊन जाऊ असे आश्वासन दिले. प्रभुंसमोर आल्यावर भरताने प्रणाम केला आणि म्हणाला
" महाराजांचा विजय असो."
" भरता त्यांच्या स्वागतात कोणतीही कसूर होता उपयोगी नाही. सर्वच ऋषी महाज्ञानी व महायोगी आहेत. "
" काळजी नसावी महाराज सर्व व्यवस्था व्यक्तिशः बघून आलो आहे ."
"त्यांच्यां येण्याचे काही खास प्रयोजन आहे का."
"महाराज त्याना आपल्याशी काही महत्वपूर्ण चर्चा करायची आहे. म्हणून उद्या प्रथम प्रहरी मी त्याना आपल्या खाजगी कक्षात घेऊन येतो. आपण त्यासमवेत ते इच्छीत असलेली चर्चा करावी."
" ठीक आहे."
अस म्हणून भरत प्रभुंची आज्ञा घेऊन तेथून गमन करतो. दुसऱ्या दिवशी ब्राम्हमुहर्ती उठून सर्व अन्हिके यथास्थित उरकून अतिथिगृही निरोप धाडतो की, भरत आपणास प्रभुकड़े घेऊन जाण्यास येत आहे. सर्व ऋषिगण भरत येण्याआधी स्नानसंध्यादि कर्मे करून प्रतिक्षेत असतानाच भरत येतो.
" आपल्याला दीर्घकाल प्रतीक्षा करावी लागली असेल तर हा भरत आपली क्षमा मागतो. आपण दयापूर्ण अन्तःकरणाने क्षमा करावी. आपण त्वरेने निघूया. महाराज आपली प्रतीक्षा करत असतील."
अस म्हणून भरताने सर्व सेवकवर्गास त्यांचे सामान सुमान सोबत आणलेल्या रथात ठेवण्याची आज्ञा केली. त्यास सर्व ऋषिनी नम्र नकार देत आपणहून आपल्या झोळया , जपाच्या कुबड्या व जपमाळा घेऊन रथात प्रवेश केला. सर्व स्थिरस्थावर झाल्यावर सर्व लवाजमा घेऊन भरत प्रभु रामचंद्रां समोर येता झाला. प्रभु स्वये आसनावरून उठून पुढे आले. सर्व ऋषिवराना प्रणिपात करून त्यांचे आशीर्वाद घेतले. सर्व ऋषिवरानी दीर्घायु भव, यशस्वी भव असे आशीर्वाद दिले. राजारामचन्द्र संतुष्ट झाले आणि ऋषिवराना विचारते झाले.
" आपली यात्रा कष्टकारक तर नाही ना झाली. इथे आपल्याला कसलाही त्रास वा ताप तर नाही ना झाला."
अगस्ति ऋषी सर्वांतर्फे म्हणाले
" नाही राजन यात्रा सकुशल झाली आणि आतिथ्य रघुकुलाला साजेस , यथोचित झालय. त्याबाबत काहीही तक्रार नाही. चिंता नसावी."
" तर मग भरतास जाण्याची आज्ञा असावी काही जरूर पडल्यास त्यास पुन्हा पाचारण करू."
" हरकत नसावी. तसहि आम्हास आपल्याशीच चर्चा करावयाची आहे , तद्वत त्याला जाण्याची आज्ञा द्यावी."
प्रभु भरताकडे पाहुन म्हणाले
" भरता तू तुझ्या कार्यास गेलास तरी हरकत नाही., जाताना द्वारपालास सक्त सूचनां दे कि कोणालाही आमच्या अनुमति शिवाय प्रवेश देऊ नये."
"जशी आपली आज्ञा."
अस म्हणून भरत त्वरित तिथुन प्रस्थान करतो व जाताना सर्व सेवकवर्गास योग्य त्या सूचनां देतो आणि रामाज्ञा पालन न झाल्यास देहदंडापर्यंतची शिक्षा मिळू शकेल असे बजावून जातो.
प्रभु रामचन्द्र ऋषिगणाना अभिवादन करून येण्याच प्रयोजन विचारतात. ज्यावर अत्रि(द्वितीय) म्हणतात
" हे राजन आपण प्रत्यक्ष दशानन रावण याचा वध करून आणि अयोध्येचे राज्य ग्रहण केल्यापासून आपणाशी काही विषयावर महत्वपूर्ण चर्चा करायची आहे आणि त्याच कारणास्तव आम्ही आलो आहोत."
"जरूर मला क़ाय आज्ञा आहे ते सांगा मी जरूर आपल्या सर्व शंकाच समाधान करण्याचा यत्न करीन."
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment