(एक पूर्णपणे काल्पनिक कृष्णकथा लेखकाच्याच कल्पनेतून साकार झालेली कथामालिका)
मुरली - २
सर्व गत काळाच चित्र मनःपटला वरुन फिरत होत. तो मुरलीचा स्वर आणि त्या नादावर धुंद होऊन ती पायातील पैंजणांची छमछम, छमछम. नन्तर फक्त मुरली आणि पैंजण यांची जुगलबंदी कित्येक घटिका नव्हे प्रहरभर कदाचित दोन दोन प्रहरसुद्धा.
सम्पूर्ण वृंदावन त्या मुरलीच्या स्वरात आणि पैजणांच्या नादात धुंद होऊन डोलताना पाहिलेल, गोप आणि गौळणी याना भासत असे. वसुंधरेसाठी जणु तो वसंतोत्सव होता. दोन दोन प्रहर त्यावेळी क्षणासमान वाटायचे. वृन्दावनातील प्रत्येक व्रुक्ष, त्यांच प्रत्येक पान, फूलं कलिका, त्या प्रत्येक फुलातील परागकण, वृन्दावनातील प्रीतगुंजारव करणारे समस्त भ्रमर, धुंदीत झालेली हवा, त्या हवेत मिसळून वाहणारा सुगंध, गवताची पात अन पात जणू प्रारब्धी सुयोग घेऊन जन्म घेते झाले होते.
त्या सर्वाना वाटायच की, काळ इथेच थांबावा. त्या मंत्रमुग्ध क्षणांनी तिथेच गोठून जाव, अगदी कायमच. कधीहि पुढे न सरकता काळालाही आपण गतिमान आहोत याचा पश्चाताप व्हावा अशीच बेहोशी होती त्या तालात, त्या नादात आणि त्या जुगलबंदीमधे.
उत्कंठेचा श्वास रोखला जायचा. स्तिमितता स्वतः आश्चर्यचकित असायची, मंत्रमुग्धता स्वये हरवून जायची, धुन्दी बेहोश व्ह्यायची, कलेची देवता प्रत्यक्ष नटभैरव, नटेश्वर देवी पार्वतीसह ताल धरण्यास येत असे, सरस्वती वीणेचा झन्कार करण्यात मग्न व्ह्यायची, जणु की त्रिलोक जाग सोडून त्यावेळी वृन्दावनात उपस्थित असायच, यमुनेला आवेग अनावर व्हायचा, सम्पूर्ण चराचर भौगोलिक परिसीमा उल्लंघुन त्यावेळी वृंदावनी येऊन स्वनेत्रे हा मेळा पाहायच ज्यावेळी होय ज्यावेळी
कृष्णाची मुरली आणि त्यावर मंत्रमुग्ध होऊन नाचणाऱ्या राधेच्या पैंजणांची जुगलबंदी सुरु व्ह्यायची. वृन्दावनीचा सुवर्णकाळ होता तो. हो होता. आता कित्येक योजन मागे गेलाय कालपटलावर , ललाटिच्या रेशांवार आणि राजकीय अस्थिरतेच्या परिघावर.
पण ही मर्मबंधातली ठेव अजुन जपून ठेवल्ये मी , होय मी , यादवनरेश कृष्णाने
पण तीने ........................ तेच जाणून घ्यायचय. त्याचसाठी ही धावपळ, हा अट्टाहास. की ही शिक्षा फक्त मलाच आहे. हे कालपुरुषा वृंदावन आज इतकं दूर कस. की रथाची गति कमी आहे आज.
© कथाकल्पना आणि लेखन : प्रसंन्न आठवले
१४/०४/२०१८
श्रीकृष्ण
#PrasannaAthavale
Comments
Post a Comment