Skip to main content

जानकी पुनःवनवास ८९

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ८९

" हे भद्रा  तुझ्याकडे जी आहे ती तू पूर्ण माहिती मला दे. आणि कोणताही संकोच न करता  तू कथन कर आणि जी वार्ता तुला सांगायची असेल अथवा जो परामर्श तुला करायचा असेल तो तो निःसंकोच कर. "

यावर भद्र म्हणाला

"महाराज आपल्या  आणि भ्राता लक्ष्मणाच्या पराक्रमाविषयी लोक खूप आदराने आणि अभिमानानेच बोलत आहेत. "

" तरीही हे भद्रा तू काहीतरी सांगण्यास संकोच करतो आहेस. माझी तुला विनंती आहे कि, जे काही असेल ते तू निःसंकोचपणे सांग, कोणताही आड पडदा न ठेवता. "

" महाराज एकच गोष्ट जी प्रजेला काट्यासारखी टोचत आहे , ती म्हणजे आपण ..... "

"जे काही असेल ते सांग आमची ऐकण्याची तयारी आहे."

"कि आपण, रावणाच्या ताब्यात  अशोकवनात काही काळ व्यतीत केलेल्या, माता सीतेला, पुनः स्वीकारलंय ही गोष्ट प्रजेला विशेष आवडलेली नाही. त्यांचं असं म्हणणं आहे कि, आपण तिचा स्वीकार करायला नको होता. त्यांच्या मते मातेच्या चारित्र्याबद्दल कोणताही संशय नाही. नव्हे तर त्या देवीसमान आहेत.  तरीही शत्रुघरी ते सुद्धा राक्षस जमातीत राहून आलेल्या व  पळवून नेण्यात आलेल्या स्त्रीचा एक राजा म्हणून तुम्ही स्वीकार करायला नको होता. "

प्रभू एक क्षण विचार करतात आणि म्हणतात

" लोक खरच असाच विचार करतात."

"हो महाराज अगदी असाच

"बर अजून काही विशेष असेल तर तेही सांग तू "

" नाही महाराज ही एकच गोष्ट प्रजेला डाचत आहे. "

प्रभू यावर शांतपणे भद्र आणि इतर गुप्तचर यांना म्हणाले,

"ठीक आहे तुम्ही या.  काही विशेष असेल तर मला कळवायला केंव्हाही निःसंकोचपणे या. "

सर्व जण महालातून गुप्त मार्गाने बाहेर पडते झाले.

हे अचानक समोर आलेलं ऐकून सुद्धा  प्रभू अविचल होते. पण ,  विचारमग्न अवस्थेत लग्नाआधीचा   सर्व कालावधी, पिताश्रींची आज्ञा ऐकून आपण वनवास पत्करला तेंव्हापासूनच्या  सर्व घटना , वनवासातील प्रत्येक क्षण अन क्षण , जानकी सोबतचा काळ, ती चौदा वर्ष , त्या चौदा वर्षातील भोगलेले सर्व कष्ट, काळज्या, जानकीचा विरह , त्या विरहाची आठवण येऊन प्रभू काही काळ अंतर्मुख झाले. भावना आणि समोर आलेलं वास्तव याचा परस्पर संबंध जोडताना आणि ते स्वीकारताना काय काय निर्णय होऊ शकतात याचाच विचार सतत मन करत होत.

त्यातच त्यांना कालच जानकी सोबत झालेला संवाद आठवला. तिने कालच त्यांना एक सुखद समाचार दिला होता कि, ती रघुकुलाच्या पुढील कुलदिपकाला जन्म देण्याच्या तयारीत होती. कारण नुकतीच ती गर्भवती राहिली होती. त्यावर प्रभुनी हर्षाने जानकीला विचारले

"अश्या समयी तुला काय इच्छा होत आहे. "

" मला एखाद्या ऋषींच्या आश्रमात जाऊन राहावसं वाटतंय, तिथला निसर्ग,  तिथले वृक्ष , तिथल्या वेली , लता, पान , फुलं , तिथला निसर्ग, डोळे भरून पाहावा, मनात साठवावा, त्यांच्यातलंच एक होऊन राहावं. तिथल्या वनराईची शोभा पहावी, झुळझुळ वाहणारे छोटे जलाशय, तलाव, ओढे, यांच्याजवळ बसून रहावं . सर्व निसर्गात रममाण व्हाव. हि इच्छा होते आहे मला, या समयी. "

त्यावेळी मी तिला म्हणालो होतो कि,

" तुझी हि इच्छा नक्कीच पूर्ण करीन. अगदी उद्यासुद्धा लक्ष्मणाला सांगतो तुला सोडायला , येथून जवळच असलेल्या , वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात. तुझं मन भरेपर्यंत रहा तिथे."

अगदी कालच घडलेला हा संवाद आणि  गुप्तहेराने सांगितलेल्या वृत्तांत याचा  गहन विचार करत प्रभू बसलेले आहेत.

ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...