अध्यात्म विराम १७०
प्रत्यक्ष प्रभू श्रीराम, यांच्या अवताराआधी पासून, कैलास पती भगवान शंकर, हे नित्य, अविरत,ध्यान आणि जागृत अवस्थेत कोणतं नाम जप करतात, असा प्रश्न, एकदा, माता पार्वतीने भगवान शंकरांना केला. या प्रश्नाने अती प्रसन्न होऊन, त्यावर उत्तर देताना, राम जन्माच्या युगानु युगे आधीच, भगवंतांनी मातेला उत्तर दिलं की, ते श्रीराम नामाचा जप अविरत आणि अखंड करतात. म्हणजेच श्रीराम जन्म ही एक औपचारिकता होती. पण त्यांचं नाम हे त्याही आधीपासून होतं आणि त्यानंतरही, युगांता पर्यंत ते असणार. याचाच अर्थ सगुण रूप व देहातील अस्तित्व हे क्षणमात्र आहे आणि असणार.
कारण विश्वाच्या करोडो वर्षांच्या परिघात, आपल्या देहातील अस्तित्वाची काही वर्षे, हे नगण्य समीकरण आहे. पण ईश्वराच्या सगुण रुपातील नामाचं अस्तित्व अखंड आणि अनंत काळापर्यंत असणार आहे. आता ईश्वराच्या राम अवतारा आधीपासून जर श्री शंकर, त्या नामाच्याच प्रभावाने आपलं तेज, ओज आणि शक्ती सुद्धा आहे,असं दृढ अभिमानाने,माता पार्वतीस सांगतात. याचं एक अर्थ असा होतो की, अगदी अवतार होऊन, प्रत्यक्ष प्रभू कार्य आणि त्याची देहातील प्रभा, या भूलोकी अवतीर्ण होण्या आधीपासून, त्यांच्या नामाची प्रभा व त्या प्रभेचा परिणाम आपलं कार्य करतच होता, हेच यातून सिद्ध होतं.
म्हणजेच प्रत्यक्ष भगवंत या भुलोकि असोत वा नसोत, त्यांच्या नामाच्या सहाय्याने, त्यांचं तेज, त्याचा प्रभाव आणि त्यामागील शक्ती कार्यरत होतीच. आता दुसरी बाजू पाहूया. प्रत्यक्ष अवतार समाप्ती पश्चात, भगवान शंकरांनी आपल्या नित्य जपाचं नाम बदललं असणार का, तर नक्कीच नाही. म्हणजेच अगदी अवतार प्राप्ती आधी आणि अवतार समाप्ती पश्चात सुद्धा त्याच नामाचा प्रभाव अजूनही भगवान शंकरांसाठी, तितकाच प्रभावी आणि सिद्ध आहेच. आचाच अर्थ सगुणातील अस्तित्वा नंतरही ईश्वरी नामाच्या माध्यमातून, ईश्वराची ऊर्जा, शक्ती आणि लहरी यांचा प्रभाव असतो आणि अनंता पर्यंत असणारच.
अजून एक चिंतन करूया. प्रत्यक्ष रुद्र अवतारी श्रीहनुमंत अखंड श्रीराम नामाचा जप करतात, हे आपण जाणतोच. तेसुद्धा आपल्या प्रत्येक क्षणाचं,नव्हे तर श्वासांचं अस्तित्व याचं श्रेय सुद्धा फक्त आणि फक्त स्वामी श्रीराम यांनाच देतात. अर्थात ते सत्य आहेच. कारण हनुमंता सारखा ईश्वर अवतारी आणि रामाचा दास असत्य कथन करणार नाही. म्हणजे आपल्या हातून घडलेल्या अशक्यप्राय कर्तृत्वाचं श्रेय विनाकारण आपल्या उपास्य दैवताला, निव्वळ एक उपचार म्हणून देणार नाही.कारण त्रेतायुगात अश्या प्रकारचं मिथ्या श्रेय दिलेलं हनुमंताला रुचणार नाही आणि प्रभूना सुद्धा पटणार नाही.
म्हणजेच त्या नामाच्या पाठी त्या नामाची अकौकिक शक्ती नक्कीच कार्यरत असते. मानवी अवतार रुपात भूलोकि असलेले प्रभू, वास्तविक कोणतीही गोष्ट स्वतः करायला सक्षम होते.पण तरीही मर्यादाचं पालन करताना सुद्धा, वीर हनुमंताला त्याने घेतलेल्या नामाच्या बदल्यात, अलौकिक कार्य करण्याची प्रेरणा, चैतन्य आणि शक्ती प्रभूंनी प्रदान केली. याचाच अर्थ ती शक्ती, ते तेज आणि ते कार्य निव्वळ नामाच्या सामर्थ्याचा प्रभाव होता. यामधे दुमत असण्याचं करणं नाही.
इतक्या अखंड नाम घेणाऱ्या श्री शंकर व श्री हनुमान याना फक्त आणि फक्त अखंड नामाच्या बळावर प्रभूंच्या असीम कृपेचा लाभ प्राप्त होऊन, प्रभू कार्यार्थ त्यांना आपली सेवा देता आली. इतका प्रभाव त्या नामाचा आहे. या दीर्घ चिंतनातून एक गोष्ट नक्कीच सिद्ध होते की, कैलास पती असोत किंवा वानर रुपातील हनुमंत असोत, त्यांनाही आपल्या अलौकिक कार्याची प्रेरणा, चैतन्य व शक्ती यासाठी नामाच्या प्रभावाची आवश्यकता भासली आणि त्या नामाच्या तेजाने, साधनेने प्रत्यक्ष ईश्वराला आपल्या शक्तीचा प्रभाव, त्या दोन दासांच्या कार्याला द्यावा लागला. इतका गहन आणि सखोल अर्थ, या दोन्ही राम भक्तांच्या अखंड नाम जपाचा आहे.
उद्या, याचं विषयात अजून काही दाखले व दृष्टांत पाहून, हा विषय समजावून घेण्याचा प्रयत्न करूया.
क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!!
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२९/०४/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179
Comments
Post a Comment