Skip to main content

गोग्रासवाडी (डोंबिवली) ३

गोग्रासवाडी (डोंबिवली) ३

गेले ते दिन गेले ...................

खरच त्या गत काळाच्या आठवणींचा पडदा दूर होतो आणि लहानपणी जगलेलं, अनुभवलेलं विश्व अजून मनोहारी होऊन समोर येत. पुन्हा जाऊ आठवणींच्या त्याच वाटेने गोग्रासवाडीत पुढे.

वडाच्या झाडाच्या थोडस पुढे संस्थेने बांधलेल्या २ क्वाटर्स होत्या. ज्यातील एकामध्ये संस्थेचे प्रबंधक राहात होते. त्यांचं आडनाव दुबे होतं. दुसऱ्या मध्ये काही भाडेकरू रहात असावेत, अस अंधुकस आठवतय. याच क्वार्टर्स समोर एक पत्र्याची शेड असलेलं आणि पूर्वी गोडाऊन असलेलं, पण आमच्या लहानपणी जिथे गोग्रासवाडी सार्वजनिक गणेशोत्सव होत असे ते ठिकाण होत. एरवी फार वापर नसलेली ती शेड वा गोडाऊन त्यावेळी अगदी राजमहाल भासायचा. का तर तिथे लाडका गणपतीबाप्पा बसायचा. तसा इतर एक दोन जागी गणपती बसवल्याच आठवतय, पण मुख्य ठिकाण हेच. 

गणेशोत्सवा वर लिहिण्याआधी एक सहज आठवलं ते सांगतो. संस्थेच्या कर्मचाऱ्यामध्ये एक गणपत नावाचा हरकाम्या टाइप पण मुख्यतः गुरांचं सर्व काम बघणारा एक व्यक्ती होता.  आमच्या लहानपणी म्हणजे १९८० च्याच वेळी तो साधारण ७० एक वर्षांचा असावा. त्याच्याबद्दल अस ऐकलं होतं की, सर्व गुरं त्याच्या सवयीची असल्यामुळे असेल वा गुरं त्याच ऐकत असल्यामुळे असेल प्रभातच्या "गोपालकृष्ण" या चित्रपटात तो कृष्णाच्या अनेक गोपाळांपैकी एक होता. ज्यायोगे सर्व गायी गुरं , पाहिजे त्याप्रमाणे शूटिंग मध्ये वागत होती. खर खोट माहीत नाही. असो.

गोग्रासवाडीचा गणेशोत्सव म्हणजे एक पर्वणी होती. मुळात गणेशोत्सव हा प्रचंड जिव्हाळ्याचा विषय. मनाच्या आत खूप खोलवर रुजलेला, कदाचित मराठी माणूस वजा गणेशोत्सव हे समीकरण ईश्वरालासुद्धा मांडता येणार नाही . गणेशोत्सव हाच मुळात एक स्वतंत्र विषय आहे लेखाचा आणि ते मी करिनच. पण वाडीचा गणेशोत्सव हा भारलेल्या दिवसांचा काळ. अगदी सुवर्णकाळातला डायमंड काळ.

त्या काळात मुलांना मनमोकळं फिरायला जायला मिळायचं ते याच काळात.   एरवी आम्ही खेळात कुठेही जात होतो. पण वाडीबाहेर जाण्याची परवानगी तीसुद्धा रात्री ८, ९ नन्तर त्याच काळात मिळायची, नव्हे ती मी मिळवायचो. कशी ते कळेल उद्या. वाडीतल्या गणेशोत्सव मंडपात दिवसभर असायचो.  रात्री त्यावेळी भरगच्च कार्यक्रम असायचे. एक दिवस हिंदी , एक दिवस मराठी असे दोन सिनेमे आणि एक दिवस स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम, सत्यनारायण पूजा.  रात्री होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला रात्री जेवून धावत पेपर घेऊन जागा अडवणं हे मुख्य काम होत. हा सिनेमा त्यावेळी प्रोजेक्टरवर असायचा............

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले
०१/०८/२०१८

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...