नाम अवतार कलियुगी - १८
काल पर्यन्त दीर्घ विस्ताराने पाहिलेल्या सर्व भागांचा संक्षिप्त अर्थ हाच की , या युगात नाम वा नामस्मरण या शस्त्राला मूळ परमात्म प्राप्तिच्या मार्गात अनन्य साधारण महत्व आहे. विशेषतः साधनेच्या मार्गात, किंवा दैनंदिन जीवनात सुद्धा सहज साध्य ईश्वरी चिंतनाचं कोणत महत्वाचं साधन असेल तर ते नामस्मरण हेच आहे.
या नामाची महती ख़र तर युगानुयुगे भारतवर्षात अनेक महात्म्यानी, संतानी, सत्पुरुषानी स्वतःच्या आचरणातून, कार्यातून आणि जीवनातून दाखवून दिली आहे. हे सर्वात सोप्प, सहजसाध्य आणि कोणत्याही नियमांची बंधनं नसलेल अस सर्वसमावेशक साधन आहे.
नाम ही अफुची अशी गोळी आहे, जी जिभेवर ठेवताच मनुष्य सर्व कर्मफलाच्या बंधनातून पूर्ण मुक्त होतो. फक्त एकच करायच कोणत्याही कर्माचा अभिमान बाळगायचा नाही. तो या मार्गातील सर्वात मोठा अडसर आहे. नित्य कर्तव्य करत करत जिभेने, मनाने, आत्म्याने फक्त नामवसा चालू ठेवायचा. नित्य नामस्मरणात अनेक युगांच्या पापाचा नाश करण्याच सामर्थ्य आहे.
अनेक साधकानी, संतानी साधना करून हे नामरूपी शस्त्र आपल्या हाती दिले आहे. या नामस्मरणाच्या आधारे तरलेले अनेक भक्त आहेत उदाहरणार्थ प्रल्हाद, ध्रुव, सुदामा, मीरा बाई, कबीर, संत ज्ञानेश्वरांपासून ते आधुनिक काळातील अनेक तपस्वी साधकांपर्यंत सर्वानी आपल्याला तसं उदाहरण घालून दिलय.
याची महती आपल्या कार्यातून याच् लोकांनी प्रकट करून जगापुढे मांडली आहे. प्रश्न हा आहे की, आपल्याला याचा प्रत्यय घ्यायचा असेलच तर फक्त हे पावन साधन , साधना म्हणून घेऊन बघा आणि जस जसा याची सवय होत जाईल तस तसे आपल्यात बदल होत जातील.
आता नाम घ्यायच म्हणजे नककी काय करायच आणि ते करताना कोणत्या गोष्टी ध्यानात असाव्यात यावर उद्या विचार करू.
आजपुरत इथेच थांबु. भेटूच उदया पुन्हा
श्री गुरुवे नमः
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
२२/१०/२०१७
Comments
Post a Comment