भोग आणि ईश्वर ४९९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
स्मरण आणि शरण याबद्दल इतकं दीर्घ विवेचन झाल्यावर खरंतर मनाला सहजी याकडे वळवता आलं पाहिजे. पण असं होत नाही. याचं कारण मन हे समजून घेण्यास आणि त्या मनाला समजावून सांगणं अत्यंत कठीणआहे कारण मन हे स्वयंचलित व स्वयंप्रेरीत इंद्रिय आहे. मुळात त्याची समजून घेण्याची आणि त्याप्रमाणे वागण्याची तयारी, ही त्याच्या लवचिकतेवर अवलंबून आहे. ती लवचिकता वा elasticity ही मनातील अहं, दंभ क्रोध, लोभ इत्यादी असुरांवर अवलंबून आहे.
मनातील हे असुर,नेहमी अश्यावेळी डोकं वर काढतात, ज्यावेळी मनाला स्थिर करण्याची जास्त गरज असते. अश्यावेळी मुळात मनाला काही समजत नाही किंवा समजलं तर उमजत नाही. पण हे न उमजणं आपण स्वीकारून पुढे जातो आणि मग तो आपल्या वृत्तीचा, स्वभावाचा व वागणुकीचा भाग होतो. मग यावर काय उपाय करावा, जेणेकरून आपल्याला मनाला नित्य, ईश्वर स्मरणात व शरणात ठेवता येईल.
आपण ऑफिसमध्ये काम करताना, वेगवेगळ्या कामांचे तपशील नोंदवून, त्यांची रोजनिशीत किंवा दैनंदिनीत, कामाच्या त्या त्या दिवशी नोंद करून ठेवतो आणि ते रोज पाहून, त्या त्या दिवशीची कामं, करतो . अर्धवट राहिलेली किंवा झालेली कामं, दुसऱ्या दिवशीसाठी लिहून ठेवतो. हे नित्य होत जाणारं काम आहे. म्हणूनच त्याचप्रमाणे आपण नित्य स्मरणाच्या आणि शरणाच्या वाटेवर चालण्यासाठी स्वतःच्या मनाला कार्याला लावलं पाहिजे.
मुळात मन हे असं इंद्रिय आहे, जे निश्चयाच्या आणि दृढ इच्छाशक्तीच्या वाटेने नेल्यास, अनेक अशक्य गोष्टी जर शक्य होऊ शकतात, तर या दोन गोष्टींना आत्मसात करायला, याच मनाला आपण वळवू आणि मार्गी लावू शकतो. दृढ निश्चय आणि सशक्त इच्छा या आपल्याला प्राप्त करता येतात. इच्छा उत्पन्न होणं ही यातली पहिली पायरी आहे. एकदा इच्छा उत्पन्न झाली की, त्या इच्छेने कार्य सुरू होईल. पण इच्छा उत्पन्न होणं हे महत्वाचं आहे.
कारण इच्छा या भूक आणि वासनेतून जन्म घेतात आणि वासना या गरजा किंवा माया मोह लोभ मत्सर यातून जन्म घेतात. यातील गरजा सोडून, बाकीच्या सर्व शत्रूतून काम क्रोध हे असुर जन्म घेतात. या असुरांच्या पोटी कर्म आणि त्या कर्मा तून फलांची बीजं जन्म घेतात. भूक ही शारीरिक व नैसर्गिक असेल तोपर्यंत, ती नैसर्गिक कर्म आणि त्यांची तितकीच नैसर्गिक फलं जन्माला येतात. पण ज्यावेळी ही भूक वासनेच्या पोटी जन्माला येते आणि ती वासना गैर वा वाममार्गी असते त्यावेळी, अनिष्ट कर्म आणि अनिष्ट फलं जन्माला घालते. त्यातून मनुष्य अनेक जन्मात, त्या कर्मांची फलं भोगत फिरतो.
भोगांच्या याच मालिकेतून जाताना मनुष्य आपला मार्ग, कर्म आणि त्यांची योग्ययोग्यता विसरून आपलं आज आणि आजचे भोग यावर सर्व लक्ष केंद्रित करतो. यातून जो प्रपंच आणि संसार घडतो त्याला आयुष्य म्हणतात. यावर अजून चिंतन व चर्चा उद्याच्या भागात करूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
१३/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment