Skip to main content

भोग आणि ईश्वर ४९०

भोग आणि ईश्वर  ४९०  (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
  
यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात्।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे।। 

शरण शब्दाच्या अर्थात आपण आपल्या मनातील सर्व भाव समर्पित करणं अपेक्षित आहे. किंबहुना खऱ्या अर्थाने शरण जाणं, हे समर्पण भावाशिवाय अशक्य आहे.  शरण जाणं म्हणजे मनातील।सर्व किंतु, परंतु, हेतू वा इतर सर्व भाव, त्यागून, मात्र, ज्याला आपण शरण गेलो आहोत, त्याच्या इच्छा आकांक्षा, या आपल्या मानून त्यानुसार व त्यासाठी कार्य करणे. व्यवहारात, आपण अडचणीत आलो, कंटाळलो किंवा मेटा कुटीला आलो की आपल्याला मदत करू शकणाऱ्या व्यक्तीला आपण समर्पण भावाने शरण जाऊन, मदतीची याचना करतो. 

यामध्ये, त्याचं श्रेष्ठत्व आणि आपलं कनिष्ठत्व हे आपण एकप्रकारे मान्यच केलेलं असतं. पण ते काही कारणा साठी किंवा अपेक्षेने शरण जाणं म्हणता येईल. म्हणजे आपल्या आयुष्यात काही गोष्टी अनपेक्षित घडत असल्या मुळे, आपल्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी वा आपली गरज भागवता यावी म्हणून, आपण एखाद्या ज्येष्ठ वा परिस्थितीने श्रेष्ठ असलेल्या, व्यक्तीला आपलं गाऱ्हाणं मांडून, मदतीची अपेक्षा वा कामना करतो. यामध्ये मन साशंक असू शकतं की, आपली अपेक्षा पूर्ण होईल कीं नाही होणार. 

म्हणजे हे शरण जाणं, प्रासंगिक वा गरजेनुसार असतं. यामध्ये, मदत केलेल्या व्यक्तीचे आपण आभार मानून,  त्याच्या आर्थिक ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो. तो उद्देश साध्य झाला की, मनावरील भार हलका होतो.  म्हणजेच अश्या शरण जाण्यात अपेक्षाची पूर्तता व्हावी ही इच्छा असते आणि ऋणमुक्त होऊन, मनावरील भार हलका करण्याचा प्रयास असतो. 

ही झाली व्यावहारिक व प्रासंगिक शरणागती. कदाचित ही कर्मफल स्वरूपातील असू शकते. पण जी शरणागती भगवंतांना अपेक्षित आहे किंवा म्हणायचे आहे, त्यामध्ये, अपेक्षारहित होऊन, मनातील सर्व वृत्ती,सर्व भाव, मनाला पूर्ण निवृत्त करून, ईश्वराला शरण जाणं अर्थात स्वतःला समर्पित करणं अपेक्षित आहे. म्हणजे मनाची अवस्था शून्यकार झाली पाहिजे, आपलं मन पूर्णपणे ईश्वराच्या चरणी लीन झालं पाहिजे आणि त्या शरणागतीच्या मोबदल्यात काहीही परतफेड न अपेक्षित करता, सर्व भाव त्या चरणांवर वाहून, शून्य भावावस्था साधणं महत्वाचं आहे. 

शरण जाणं याचा अर्थ, काया वाचा व मन या तिन्हीद्वारे होणाऱ्या, साऱ्या कर्माच्या फलांचाही त्याग अपेक्षित आहे.  म्हणजे चांगल्या कर्माचं फल अपेक्षित असावं आणि वाईट कर्म वा वृत्ती समर्पित करायची, हा स्व, अहं आणि स्वार्थ आहे. जे काही करू, चांगलं वाईट, पाप पुण्य हे सर्व कर्म आणि कर्मफल ईश्वर चरणी वाहून, मनाची अवस्था बाह्याकरी व अंतर्यामी शांत, अचल, वृत्तीरहीत असावी. म्हणजेच कोणत्याही भावाने मनावर कोणतेही तरंग उठणार नाहीत, हे अपेक्षित आहे. 

शरणागतीबद्दल अजूनही जाणून घेऊया, उद्याच्या भागात, तोपर्यंत नाममयी राहण्याचा आटोकाट प्रयत्न करत राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
०४/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...