भोग आणि ईश्वर ५१० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
विरक्ती ही मुळात मनाचं वासनेतून, क्रोधातून, कामातून, विवंचनेतून, निवृत्ती आहे. मुळात सर्वसंगपरित्याग म्हणजे विरक्ती हा थोडा संकुचित अर्थ आहे, असं माझं मत आहे. कारण सर्वसंगपरित्याग म्हणजे फक्त देहाची निवृत्ती नव्हे तर मनाला सर्व प्रकारच्या मोहातून, वासनेतून क्रोधातून विचारपूर्वक व विवेकाने निवृत्त करणं. म्हणजे मनाला मनापासून मोहात,मायेत,वासनेच्या फेऱ्यात अडकण्याचा मोह न होणं म्हणजे खरी निवृत्ती
याच निवृत्तीची पुढची पायरी म्हणजे विरक्त. विरक्त माणूस संसारपासून, त्यातील तापापासून, प्रपंचापासून लांबच असला पाहिजे हा गैरसमज आहे. विरक्त मनुष्य संसारात व प्रपंचात राहूनसुद्धा मनाने संयमी, निग्रही आणि विरक्त असू शकतो. याचं खूप मोठं उदाहरण म्हणजे नाथमहाराज अर्थात शांतीब्रह्म श्रीएकनाथ महाराज. जे प्रपंचात असूनही मनाने निवृत्त, वृत्तीने विरक्त होते. अर्थातच ही विरक्तवृत्ती, हा देखील एका तपाचा साधनेचा आणि एकाग्रतेचा परिणाम असतो.
म्हणजे आधी मनाची निवृत्ती, मग त्यातून विरक्ती साध्य करण्या साठी, तपसाधना मनाचा संयम, निग्रह, लक्ष या सूत्रीचं पालन करावं लागतं. यासाठी सर्वात सहजसाध्य मार्ग म्हणजे, मनाला कर्मात रममाण होऊ देत असतानाच त्याच्या फलातून हळूहळू निवृत्त व्हावयास लावणं. हे कसं शक्य आहे,तर आसक्तीविरहीत कर्म करत राहणं. कर्मरत राहणं क्रमप्राप्त आहे.कारण जडदेही आलेल्याकोणत्याही जीवाला, कर्म कधीच चुकलेलं नाही व चुकणारही नाही.
अगदी देवाधिदेवसुद्धा मानवी अवतारात आल्यावर, कर्म करणं विसरत नाहीत, किंबहुना परिणाम वा फल माहीत असूनही,कर्म करण्यास न चुकणं आणि कर्मफल काहीही येवो, कर्मातील आपलं योगदान, देत राहणं, हेच प्रत्येक अवतारात ईश्वराने दाखवून दिलं आहे. म्हणजे असुरी शक्तींचा निःपात युद्ध वा तत्सम परिस्थिती आल्यावरच असल्याचं माहीत असताना, ती अनुकूल स्थिती येईपर्यंत थांबणं आणि अत्यंत कठीण स्थितीतही, आततायी पणा न करता, वाट पाहणं, देवानाही करावं लागलं, अगदी शंभर पापं भरेपर्यंत थांबण्याची तयारी व संयम ठेवावाच लागतो.
म्हणजेच कर्मात राहून, त्याच्या फलातून, आपलं मन निवृत्त करून, एक कर्म संपताच, दुसऱ्या कर्माचा विचार व कृती सुरू करणं, हा या निवृत्तिकडे जाण्याचा राजमार्ग आहे. उदाहरणच घ्यायचं झालं तर, नोकरीतून निवृत्ती व्हायच्या आधी मनाने त्याची स्वीकृती मान्य केल्यास, प्रत्यक्ष निवृत्ती होईल, तेंव्हा ती सहजी होऊन, मन आपो आप पुढील विचार सुरू करेल किंवा पुढील योजनेत मन आपोआप गुंतलं जाईल.
आता नोकरीतील निवृत्ती ही, आयुष्यात एकदाच होणारी घटना आहे, त्यामुळे त्यावेळच्या मानसिक स्थितीतून गेलेले, जाणू शकतात की, मनाला काय काय आणि कशाप्रकारे तयार करावं लागतं. तीदेखील एकप्रकारे तपश्चर्या आहे. म्हणूनच मनाला कर्मफल निवृत्तीसाठी तयार करणं हे, प्रत्येक कर्म नोकरीचा शेवट समजून, त्यातून मन काढून, ते पुढील काळातील म्हणजेच निवृत्ती नंतरच्या काळातील कर्मावर एकाग्र करण्यासारखं आहे. या पायऱ्या सहजी साध्य होतील असं नाही. पण त्यासाठी मनाला कसं तयार करायचं, यावर उद्याच्या भागात चर्चा करूया. तोपर्यंत नामाची धरलेली काठी तशीच टेकत जाऊन, पुढचा मार्ग क्रमत राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२४/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment