भोग आणि ईश्वर ५१३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)
आता कर्म करून विसरायचं म्हटलं, तरीही त्यात दोन प्रकारच्या व्यक्तींची शक्यता सांगता येते. एक म्हणजे कर्म करून चिंता न करणारे आणि दोन म्हणजे कर्म करून चिंता करणारे. दोन्ही प्रकारात पापी आणि पुण्य वान असे दोन्ही प्रकारचे लोक येतात. म्हणजे आपण पाप करत आहोत हे माहीत असूनही आणि माहीत असल्या मुळे, पण त्याचे निश्चित परिणाम कधी समोर येतील, तेंव्हा बघू, असं म्हणणारे किंवा आपलं कर्म कुकर्म, दुष्कर्म वा पापकर्म या सदरात न येणारं आहे, हे जाणणारे आणि त्यामुळे भयमुक्त असलेले.
दोन म्हणजे आपलं कर्म पुण्यकर्म वा पापकर्म हे जाणता येत नसलेले, अजाण,अज्ञानी आणि त्यामुळे चिंता करणारे आणि दुसरे म्हणजे आपण परिस्थितीवश पाप कर्म वा वाममार्ग धरला आहे, असा भ्रम धरून, त्याबद्दल चिंता बाळगणारे. आता या चारही प्रकारच्या लोकांचा विचार करूया. मुळात एक निष्कर्ष काल आपण काढला त्याचा एकवार विचार करूया. तो निष्कर्ष म्हणजे मनुष्य हा फक्त कर्माचा धनी आहे. आज यावर विचार करूया.
यात खूप मोठं सार दडलेलं आहे एक म्हणजे आपण फक्त कर्मच करू शकतो, त्याच्या फलप्राप्तीची आपण निश्चितता बाळगू शकत नाही. हा एक संकुचित आणि सर्वज्ञात निष्कर्ष आहे. यात नवीन काही नाही पण यातून निघणारा खूप गहिरा व गहन अर्थ हा आहे की, कर्म करण्याचं स्वातंत्र्य तुला ईश्वराने दिलं आहे. म्हणजेच आपण आपलं भविष्य किंवा भविष्यातील फलरूपता, आज आता प्रत्येक क्षणी, प्रत्येक कर्म करताना ठरवू शकतो.
मी तर असं म्हणेन की,कर्म करतानाच विधात्याने, त्या घडणाऱ्या किंवा घडू शकणाऱ्या कर्माच्या फलाचा विचार आधी करून, मगच कर्म करण्याचं स्वातंत्र्य, निश्चितच विधात्याने माणसाला दिलं आहे. खरी समस्या ही आहे की, आपल्या संचितातील कर्मांच्या फलांचा पसारा अनेकदा आपल्या सद्य कर्मांना निश्चित करतो. म्हणजे मागील कर्मांची फलं वर्तमानात समोर येऊन, आपली आताच्या कर्मांची अगतिकता ठरवतात व वाढवतात. ज्यामुळे आपण आता काय करावं हे ठरवण्याचं, ईश्वरप्रदान असलेलं, स्वातंत्र्य, प्रत्यक्षात निर्बल वा निष्फळ ठरतं.
अनेकदा या अगतिकतेचं कारण आपली प्रत्येक कर्मात असलेली आसक्ती. हीच आसक्ती आणि अगतिकता जाणूनच, भगवंतांनी, दैवाधिन असलेल्या माणसाला समर्पण, शरण आणि स्मरण हा वास्तविकपणे सर्वात सोपा मार्ग सांगितला आहे. तो अर्पण शरण व स्मरण हा त्रयोगुणी मार्ग,अनेक प्रकारचं हित साध्य करतो. अर्पणात आपण मनातील सर्व किंतुपरन्तु, हेवे दावे, गर्व, मद मत्सर क्रोध इत्यादी सर्व नकारात्मक भाव व विकार, ईश्वराच्या चरणी अर्पण करतो. यामधे आपण आजपर्यंत केलेली सर्व कर्मसुद्धा, ईश्वरचरणी अर्पण करतो
शरणागत भावात आपण अत्यंत विनम्रपणे, विनयशील होऊन, आपल्या देह वाचा बुद्धी व मन, यांसह सर्व कर्मेंद्रिय, दृष्टी श्रुती जिव्हा यांसह सर्व ज्ञानेंद्रिय व संपूर्ण देहासह आत्मा, शरण भावात, मस्तक टेकवून, श्रीचरणी शरण जातो.ततपाश्चात आपण प्रत्येक कर्म,या श्रीचरणांचं स्मरण करत करत, पार पाडत जातो. म्हणजे स्मरणाच्या टप्प्यावर येईपर्यंत, सर्व अर्पण व देह, बुद्धी, मन व आत्मा यांसह शरण जाऊन, मगच स्मरणास आरंभ केल्यास, ते स्मरण अवीट आनंद व सम्पूर्ण सफलता प्रदान करतं .
यातील अर्पण शरण व स्मरण यात बाधा आणणाऱ्या वा आणू शकणाऱ्या गोष्टींबद्दल उद्याच्या भागात जाणून घेऊया. पण त्याआधी पहिल्या दोन परिच्छेदात म्हटल्या प्रमाणे चार प्रकारच्या लोकांचा आधी विचार करूया. तोपर्यंत अर्थातच, आपलं नित्यकर्म नाम ते करतच राहूया.
भोग आणि ईश्वर भाग १ (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२७/०४/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!
Comments
Post a Comment